Skip to main content

भोग आणि ईश्वर ५२५

भोग आणि ईश्वर  ५२५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

आता या सर्वातून, आपल्याला जर काही ज्ञानप्राप्ती झाली असेल, तर इतकं नक्कीच ध्यानात आलं असेल की, भोग वा उपभोग आणि पुण्य वा पाप, हे सर्व आपणच आपल्या कर्माने लिहितो. त्यामध्ये ईश्वर दखल देत नाही. पण ईश्वराने निर्माण केलेल्या व्यवस्थेनुसार प्रत्येकाला उद्धाराचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येकाला मिळावा यासाठी, ईश्वराने स्वतःच, तशी व्यवस्था निर्माण केलेली आहेच. इतकं करूनही, ही पूर्ण व्यवस्था कर्मानुसारच राहील, हेसुद्धा योजून ठेवलं आहे. 

मग अशी काय गोष्ट आहे, कर्माची, ज्याअनुसार किंवा ज्यामुळे, ईश्वराच्या या उन्नती व उद्धार व्यवस्थेचा लाभ प्रत्येकालाच घेता येईल. कारण ईश्वर हा निरपेक्ष आणि निष्पक्षपाती असल्यामुळे काही ठराविक जीवांचा उध्दार आणि काहींना अज्ञान व अंधःकार अशी व्यवस्था ईश्वर निर्माण करूच शकत नाही. मग यातील गुह्य व गहन भाग काय आहे, ज्यामुळे आपण ही व्यवस्था जाणून, त्याचा लाभ घेऊ, शकतो. 

असा विचार करा की, एका मंदिरात आरतीनंतर प्रसाद वाटप सुरू आहे. यामध्ये, प्रत्येकाला जो वा जितका प्रसाद मिळेल तो एकूण प्रसादाचा परिपूर्ण हिस्सा असेल. म्हणजेच, जर मूळ प्रसादात ईश्वरी कृपेचा अंश असेल तर, तसाच वा तितकाच अंश, वाटल्या गेलेल्या प्रत्येक कणाकणात असणारच. आरती, प्रार्थना इत्यादी माध्यमा तून निर्माण होणाऱ्या अतिशुभ व अतिसात्विक लहरीं मुळे, प्रसादात ईश्वरी कृपा निर्माण होते. 

पण ती त्या प्रसादातील कणाकणात एकसमान, एक सारखी सामावलेली असते. म्हणजेच ईश्वरी कृपा वा ईश्वराशी संबंधित कोणतीही गोष्ट ही सर्वांसाठी एक समानच असते. त्याच न्यायाने, कर्मफलरुपात मृत्यू मिळूनही, रावण आदींना प्रभुकृपेने, मोक्ष प्राप्ती झाली. सर्वांना एकसमान कृपाप्रसादाचा, हा भाग वा लाभ, प्रत्येकाला मिळावा किंवा मिळाला पाहिजे, ही जगाच्या जनकाची सदिच्छा असते आणि आहे. 

पण ते प्रत्यक्षात संपूर्ण जगताला लाभदायक व्हावं ते का होत नाही. यात दोन शक्यता लक्षात येतात. एक त्या कृपेच्या लहरींच्या प्रसारात दोष म्हणजे ट्रान्समिशन प्रॉब्लेम किंवा स्वीकारण्यातील दोष म्हणजे रिसेप्शन प्रॉब्लेम.  यातील ट्रान्समिशन प्रोब्लेमची शक्यता, शून्य आहे. कारण या ब्रह्मांडाचा रचयिता आणि स्वामी असलेला,  ईश्वर, आपल्या कृपेच्या प्रसाद लहरी, समस्त जगतासाठी व जगतातील प्रत्येकासाठी एक समान फ्रिक्वेन्सीने विश्वात संचार करण्यासाठी निघतात. 

किंबहुना, त्या अखंड वा अक्षयपणे विश्वात परिभ्रमित होतच असतात. त्यामुळे त्या लहरी मूळ स्रोतापासून निघण्यात काही दोष।असू शकत नाही. याचं कारण जगतावर नियंत्रण करणारी ती अद्भुत शक्ती, शुद्ध आणि सात्विक आहे. याकारणाने, त्या लहरी सदोष असणं अशक्य आहे. म्हणून पहिली शक्यता ही अशक्य म्हणून अमान्य करून, पुढच्या अर्थात दुसऱ्या शक्यतेचाच विचार करूया. 

कोणत्याही लहरी, या आपल्या स्रोतापासून निघून आपल्या लक्षाला भेडण्यासाठीच निघतात.पण त्या प्राप्त करण्यासाठी विशिष्ट फ्रिक्वेन्सीला प्राप्त करणारी व्यवस्था त्या त्या यंत्रात किंवा यंत्रणेत असावी लागते. तरच ती विशिष्ट फ्रिक्वेन्सी पकडली जाऊ शकते. अन्यथा रेडिओवर सुदधा त्या त्या ठिकाणी ती ती फ्रिक्वेन्सी पकडली जाते आणि त्या त्या लहरींची स्टेशन्स लागतात. 

अगदी याच तत्वावर आधारित मानवी देहव्यवस्था, घडलेली किंवा घडवलेली आहे. म्हणजे काही विशिष्ट लहरी विशिष्ट मानसिक स्थितीत पकडल्या जातात आणि त्या त्या लहरींचे भाव पकडले जाऊन, त्याच्या प्रतिक्रिया स्वरूपात, ते ते भाव प्रसारित केले जातात. उदाहरणार्थ, मनात क्रोध भाव असेल तर, या विश्वातील आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या क्रोधाच्या लहरी मन लगेच पकडतं. याच प्रमाणे मनात कामविकार भाव असेल तर, त्या प्रकारच्या लहरी मन लगेच आकर्षित करतं. 

म्हणजे जसा भाव मनात , तश्याच विश्वलहरी, मनापर्यंत पोचतात आणि मनाला, त्या भावात मनाचा व्यास व्यापून, त्याच्या प्रभावाच्या प्रमाणात मनात, वाचेने आणि कायेने, त्या भावात कर्म घडतं. म्हणजे मनाला ज्या भावाने व्यापलेललं असेल, ती त्या क्षणाची फ्रिक्वेन्सी ठरते आणि  त्या भावाच्या लहरी मनाकडे आकर्षित होतात. 

यावर उद्याच्या भागात पुढे चिंतन करूया. पण नामाच्या लहरींना आकर्षित करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...