Skip to main content

भोग आणि ईश्वर ५१९

भोग आणि ईश्वर  ५१९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

शरण जाणं म्हणजे खरंतर, मनाने पूर्ण शून्य होणं. वृत्ती, चित्त, बुद्धी आणि देह यांनी जे माया, विकार, विखार, अवगुण, दुर्गुण, आणि अनिष्ट असं सर्व आराध्याच्या चरणी अर्पण करून, त्यांचा त्याग करणं. सर्वकाही जे त्याज्य आहे ते विधात्याला सोपवून, आपल्याकडे फक्त सद्गुण, सत्शीलता, सदप्रवृत्ती, सद् आचार, यांना आपल्यापाशी ठेवणं, म्हणजे खरं शरण जाणं. 

आता आपल्याला आपले दुर्गुण, दुराचार आदि नकारात्मक गुण, दिसतील, जाणवतील व ओळखू येतील, हे संभवत नाही. याचं कारण स्वतःला स्वतःकडे त्रयस्थपणे बघण्याची बुद्धी आणि वृत्ती माणसात अभावानेच आढळते. म्हणजे मग शरण जाताना, ईश्वराला आपण आपले दुर्गुण वा आपल्यातील अनिष्ट गोष्टी त्यागून, कसं काय शरण जाऊ शकतो. म्हणजे शरणागत होताना, नक्कीच हातचं काही राखलं जाईल आणि शरण जाण्याचा योग पूर्णपणे साधला जाणार नाही. 

मग यावर काय उपाय योजावा जेणेकरून, शरणागती पूर्ण साधून, जे त्याज्य ते चरणी सोडून, पुढे जाता येईल. यावर साधुसंतांनी उत्तम मार्ग सांगितला आहे. सर्व भाव, सर्व वृत्ती आणि संपूर्ण मन शरण जाताना, ईश्वराच्या चरणावर अर्पण करून, अशी प्रार्थना करावी की, हे ईश्वरा, मी एक साधा जीव आहे, याच नव्हे तर मागील अनंत जन्मात, त्या त्या देहात, कर्मप्रवृत्त असताना, मोहमायेच्या प्रभावात, हातून अनेक सद् व दुष कर्म घडली असणार. त्याची बरीवाईट फळं त्या या देहात भोगून, संचितात मिळालेली ठेव, याजन्मापर्यंत आली आहे. 

पण आता या सर्वातून सुटण्यासाठी मला तू सहाय्य करावंस, म्हणून मी माझे सर्व गुण, सर्व भाव, सर्व वृत्ती, सर्व आसक्ती, सर्वकाही तुझ्या चरणी अर्पण करून, सर्वभावे तुला शरण आलो आहे. आता इथून पुढे तू मला तार वा मार, जे करशील, ते तुझा कृपाप्रसाद असेल. 

इतकी प्रार्थना, ईश्वराच्या चरणी मस्तक टेकवून, नित्य करावी. हे एकदा केल्यावर, कार्य होईल वा सार्थक झालं, असं समजता कामा नये. कारण मायेचा जोर, मोहाचा आवेग कधी येईल व घात करेल, हे सांगणं अशक्य आहे. किंबहुना नित्य क्षणक्षण हा परीक्षेचा आहे आणि क्षण क्षण अभ्यास सुरू ठेवायचा आहे, हे ध्यानात घेऊन, रोज नेमाने ही शरणागतीची प्रार्थना ईश्वरचरणी म्हणावी. म्हणजे देहाला, देहाकडून बुद्धीला व बुद्धीकडून आत्म्याला, याची सवय जडेल. 

मन हे सतत ध्यानात ठेवेल की, आपण शरणागत आहोत. त्यामुळे जे घडतंय वा घडेल, ते सर्व आता फक्त ईश्वरीकृपेनेच घडेल आणि तो त्याच्या कृपेचा प्रसाद असेल. प्रसादात ज्याप्रमाणे आपल्याला विकल्प मिळत नाही, जो प्रसाद समोर येईल, तो निमूटपणे स्वीकारणे इतकंच भक्ताचं काम असतं. तेवढंच करावं. 

अर्पण, शरण या पायऱ्या जाणून घेतल्यावर आता तिसरी पायरी स्मरण यावर उद्यापासून चिंतन करूया. तोपर्यंत नामाचं आपलं ब्रीद आपण राखुया आणि नाम सुरूच ठेवूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...