भोग आणि ईश्वर ५२९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनाची भूक किंवा आसक्ती यावर खरतर अनेकांनी अनेक प्रकारे लिहून ठेवलं आहे. पण तरीही ती कमी होत नाही वा आवरता येत नाही. म्हणजे ही सरसकट वृत्ती किंवा प्रवृत्ती आहे मनाची, असं समजायला हरकत नाही. पण सर्वच प्रकारची आसक्ती, हिन किंवा त्याज्य दर्जाची असते असं म्हणता येणार नाही. याचं कारण म्हणजे, काही आसक्तितून, सृजनशील, वर्धन शील, जगत कल्याणार्थ काही गोष्टी घडू शकतात नव्हे घडतात. त्या घडाव्या ही विश्वनियंत्याचीसुद्धा इच्छा असते.
उदाहणादाखल, जगात जन्ममृत्यूचं चक्र अव्याहतपणे सुरू राहावं यासाठीची आवश्यक कामासक्ती, असावीच. कारण त्यायोगे संसार, जगत हे पुढे पुढे जात राहील. प्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा, या जगतात, जगत कल्याणार्थ देह धारण केल्यानंतर, देहाचं कर्म आणि त्या कर्माप्रित्यर्थ आपल निहित कर्म केलं आहेच. पण त्यामध्ये आसक्ती नव्हती, तर कर्मगतीनुसार आवश्यक तितकीच मर्यादित आसक्ती, जरूर होती. त्यामुळे आसक्ती ही काही सकारात्मक हेतूने किंवा निहित वा नित्य कर्माचा भाग म्हणून असेल तर ती गैर वा बाध्य ठरत नाही.
म्हणजेच आसक्ती जी कर्मार्थ, धर्मार्थ आणि जगतार्थ आवश्यक असेल, त्याने बद्धता येणार नाही. बध्दता म्हणजे, जी गोष्ट, कर्म वा कृती, सद हेतूने, निरहेतुकपणे आणि देहाच्या कर्तव्याचा भाग असेल, ती कर्म जीवाला बाध्य होत नाहीत. पण ही बद्धता कसली,तर या संसारात जगतात आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवून ठेवण्याची. एखादी गोष्ट बाध्य करते, म्हणजे ती त्या व्यक्ती, वस्तू इत्यादींना, एकाच जागी, खिळवून अथवा थोपवून ठेवते, किंवा हलू देत नाही.
त्यामुळे या जगताच्या पसाऱ्यात, अशी कर्म, निव्वळ कर्तव्य पूर्ती अथवा चार पुरुषार्थ साध्य केल्याचं श्रेय देतात. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली कर्म जीवाला अनावश्यक बद्धता निर्माण करत नाहीत. उदाहरणार्थ, संसाराच्या, प्रपंचाच्या शमनार्थ अर्थार्जन करण्यासाठी, आवश्यक नित्य कर्म करण्याचं स्वातंत्र्य प्रकृतीने दिलेलं आहे. परंतु ते साध्य करण्यासाठी गैरमार्ग वापरला किंवा पाप मार्गाचा वापर केला, तर निश्चित बद्धता निर्माण होते.
किंवा प्रजोत्पादन कार्याव्यतिरिक्त काम, हा मनाच्या देहाच्या वासनेतून जन्माला आला असेल, तर तो नक्कीच बाध्य असतो वा बाध्य करतो. त्याच्रमाणें अधर्म अन्याय व अमानवीय हेतूने प्रेरित होऊन केलेलं धर्मकार्य,हे वास्तविकपणे अधर्मच आहे. पण धर्म, सद रक्षणार्थ व खल दमनार्थ केलेली हिंसा ही वास्तविक अहिंसेहून श्रेष्ठ गणली गेली आहे. याचं न्यायाने, आत्मसिद्धी व आत्मौ द्धार साधून, मोक्षाकडे जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण त्यासाठी अधर्मी वा हिंसक आणि इतरांना इजा वा त्रास देणारा मार्ग अवलंबन करणं हे नक्कीच पापकर्म आहे.
यावर अजूनही चिंतन आवश्यक आहे, तोपर्यंत आपलं नित्य स्मरण करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment