ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास १४
इकडे प्रजाजन, राजपरिवार, अयोध्येतील समस्त सजीव व निर्जीव लोचनात जणू प्राण आणून क्षण क्षण कासावीस होऊन आणि निर्जली राहून आपल्या प्रिय राजपुत्र प्रभु श्रीराम , देवी जानकी आणि भ्राता लक्ष्मण यांची प्रतीक्षा करत होते. पण या सर्व आनंदावस्थेत खरे प्राण लोचनात आले होते ते राजकुमारी देवी ऊर्मिला आणि भीतियुक्त भावनेने राणी कैकईच्या लोचनात. त्या दोन्ही स्त्रियांची लोचने अखंड वाहून जणू धरणीवर जलसंचय झाला होता. कोणीही या दोघिंच्या मनोवस्थेप्रत पोचुहि शकत नव्हते. कारण त्यांचे भोग फक्त भोगुनच समजू शकतात , कल्पनेच्याही पलिकडील अवस्था होती ती.
प्रजाजनांचा उत्साह, वाद्यांचा गजर, जणू कर्णपटलाचा वेध घेतात की क़ाय असाच भास होत होता. नृत्य आणि हर्षोल्हासामुळे अवनीवरची मृत्तिका आसमंताला स्पर्श करण्याच्या अवेशात होती. सर्वत्र जणू नववर्ष स्वागताची धूम होती. गुढ़या तोरणे व पताका यानी अयोध्या नटली होती , जणू एखाद्या नवयौवने सारखी.
सर्वत्र संचारलेल्या ह्या धुंदीत , वसंतालाही जाग आली होती. पशु पक्षी या बरोबरच वेली, झाड़े, पाने, फूले, सम्पूर्ण निसर्ग रघुरायाच्या आगमनासाठी आणि सुस्वागतासाठी आतुर झाले होते. म्हणून निसर्गाने आपल्या अनंतहस्ते नवरंगांची उधळण केली होती. रवीराजा सुद्धा सौम्य किरणांनी या महत्वाच्या क्षणाची शोभा वाढवत होता. समस्त राजपरिवार आणि अयोध्यावासी फूले, हार, गुलाल यासह अनेक रंगाची उधळण करण्यासाठी आतुर झाले होते. सम्पूर्ण अयोध्या रांगोळीसह सजून प्रतिक्षेत होती.
प्रजाजनाना ह्या दिवसाची व क्षणांची प्रतीक्षा चौदा वर्ष होती. या चौदा वर्षातील प्रत्येक क्षणाचा जणु प्रतिशोध प्रत्येक अयोध्यावासी काळाशी घेत होता. आणि जणू काळालासुद्धा आज हा प्रतिशोध प्रिय वाटत होता. कारण ह्या क्षणाची प्रतीक्षा काळ देखील करत होता . जस जशी श्रीरामांच्या आगमनाची घटी जवळ येत होती तस तशी तिन्ही लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. जणू सर्व देव , देवी , यक्ष, गन्धर्व,इंद्रादि देव , सप्त स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, आदि आतुर जहाले होते या नयनरम्य अद्भुत सोहळयात सामिल होण्यासाठी.
या सर्व धामधुमितच पुष्पक विमानाने अयोध्येच्या आसमंतात प्रवेश केला आणि ते पुष्पसंरचनेने सजलेल, हंसासमान आकार असलेल आणि समस्त विश्वाचे स्वामी आणि स्वामिनी याना आपल्या पाठीवर घेऊन अनेक कोसांचा आणि अनेक प्रदेशांचा प्रवास करून आलेल पुष्पक विमान आकाशमार्गे अवतीर्ण झालेल, प्रत्येक अयोध्यावासी समक्ष चक्षुरवै सत्य पाहात होते. प्रभुनसह समस्त प्रवासी या भारलेल्या दृश्याने अचंबित आणि आनंदित जाहले होते. एक वैश्विक चमत्कार साकारून आला होता. अलौकिक आणि गूढ मोहकपणा सर्वत्र भरून वाहात होता.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment