ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास २७
.
माता कौसल्या आणि सुमित्रा देवी सीतेला घेऊन आपल्या महालातील अन्तःपुरात गेल्या. चौदा वर्षान्च्या वनवासाचा शीण सीतेच्या चेहऱ्यावर जाणवत होता. किंबहुना चौदा वर्षान्च्या मानसिक क्लेशाच्या खुणाचा माग सर्वांच्याच चेहऱ्यावर जाणवत होता. जे घडू नये, किंवा जे घडेल अस चौदा वर्षानपुर्वी स्वप्नातसुद्धा कोणाला वाटल नसत ते सर्व एखाद्या कथेत शोभुन दिसेल अस अयोध्येत घडून गेल. या सर्वाचा विचार करून मस्तकच नव्हे तर काळीज सुद्धा सुन्न व्हाव अस विपरीत दान विधात्याने अथवा नियतीने क्रुरपणे सर्वांच्याच झोळीत आपसुक सोडून दिल होत आणि काळ जणु काहीच झाल नाही अश्या आविर्भावात , पुढील परिस्थिति भोगणाऱ्यांच्या माथी मारून, प्रारब्ध अस भोगयुक्त नाम देऊन निघुन गेला, चौदा वर्ष काहीही सुख न देता.
म्हणून आज जानकीला समोर बघुनसुद्ध माता कौसल्येचा विश्वास बसत नव्हता. त्यानी तिला सामोरच बसवून सर्व घटित घटना जाणून घेण्याचा यत्न सुरु केला होता, आणि देवी जानकी निर्मळ मनाने अयोध्या सोडल्यापासूनचे सर्व घटनाक्रम प्रामुख्याने आणि महत्वानुसार सांगत होती. तीचं बोलण सुरु असताना माता कौसल्येला कौतुक आणि आश्चर्य वाटत होत की आपण तर प्रायः राजप्रासादातच व्यतीत केलेल्या काळातच जानकीने किती घटनां प्रत्यक्ष्य पहिल्या अनुभवल्या आणि भोगल्या सुद्धा. इतक्या स्थित्यन्तरातून जावून , आणि तावून सुलाखून जे उतरत कसोटिवर, तेच ख़र सोन असत.
उगीच नाही नियतीने हिची गाठ माझ्या रामाशी बांधली. नककीच नियतीला स्वतःचाच हा डाव माहित असल्यामुळे वा काळाच्या ओघात घडणारं नियतिला कल्पित असल्यामुळे, सर्वच जोड्या त्या त्या भोगानुसार घडवून आणल्यात, अगदी चपखल आणि सयोग्य. त्यातून वैदेही आणि उर्मिला तर सर्व मानवी गुणधर्माच्याही पार आहेत. परिस्थिवश कोणतेही झालेले आघात सहन करूनसुद्धा, त्याचा तीळमात्र
देखील परिणाम दोघिंच्या मनावर आणि वागण्या बोलण्यावर जाणवत नाहीये. खरतर पिता राजा जनकाच्या घरी अत्यंत सुखात वाढलेल्या मूली या , पण संस्कारी, विचारी आणि दैवी गुण घेऊनच जन्माला आलेल्या.
जानकीच कथन चालू असतानाच माता कौसल्या विचारात गढून गेल्यात, इतक्या की जानकी प्रश्न विचारते तेंव्हा त्या भानावर येतात आणि जानकीला म्हणतात
" काही विचारलस का मला"
"होय , मी म्हणत होते तुम्ही थकल्या असाल तर आपण बाकिच नन्तर बोलुया का, चालेल का"
" थकले आहेच ग मी , या चौदा वर्षाचं ओझ मनावर घेऊन आणि ओढून ताणून काळ पुढे ढकलुन. परन्तु आता तुझ कथन एकताना जाणवल की काळ आमच्याहीपेक्षा तुमच्याशी जास्त निष्ठुर वागलाय. आमच्याही पेक्षा जास्त भोग तुमच्या माथी लिहून ते भोगायला लावलेत तुम्हाला. आमच्या कर्माच उत्तरदायीत्व तुमच्या पदरात घालुन , जणु क्षण क्षण परीक्षा घेतली तुमचीच"
" अस का म्हणता आई, हे आमच्याही कर्माचे भोग होते आणि ते हसत हसत स्विकारले आम्ही. कोणाबद्दलहि कोणतीही कटुता मनात न धरता. पण माझ्यापेक्षा जास्त भोगलेय ते उर्मिलेने आणि मला तिच्याशी बोलायच राहिलय या सर्वात , आल्यापासून. कारण मी बराच काळ पतिसमवेत व्यतीत केला, लंकेतील काळ सोडल्यास. पण तीने चौदा वर्ष एकटिने कंठित केलीत. खरच ती जास्त कौतुकास पात्र आहे"
" ख़र तर तुम्ही दोघिही कौतुकास पात्र आहात आपापल्या परिने आणि योग्यतेने. आता पुढील गोष्टिंचा विचार करू आणि घटित सर्व नकारात्मक घटनांचा माग सोडून काळाच्यासोबत वाटचाल करू. तेच हितार्थ आहे"
"जशी आपली इच्छा. आणि तेच सयोग्य आहे सर्वांच्या दृष्टीने"
अस म्हणून दोन्ही माता आणि देवी जानकी अन्तःपुरातून बाहेर पडण्यास निघाल्या.
ह्या दोन्ही महलातील संवाद चालू असताना ख़र तर लक्ष्मणाच्या महालात लक्ष्मण भेटत होता आपल्या पत्नी उर्मिलेला चौदा वर्षानी.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment