ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ३२
प्रभु रामचंद्रांकडे जाणार प्रत्येक पाऊल आणि जाणारा प्रत्येक क्षण, भरत, अंतर्मुख होऊन, गहन विचारातून अन्तरातम्यात जात होता. प्रभुंचा उद्देश ,भरत त्यांच्याप्रत पोहोचण्याआधी सफल होत होता. प्रभुना ते जाणवत होत आणि तेच त्यांच साध्य होत, कदाचित या जन्माच अथवा जन्मोजन्मिच. भरत जस जसा भ्राता रामाकडे जात होता तसा तसा व्रुथा अभिमान आणि त्याच्या एक एक पाकळ्या गळून पडत होत्या.
भरत प्रत्येक पावलागणिक अश्रुमय शुद्ध आणि सिद्ध स्वरूपाकड़े जात होता. मायामोचन प्रभु श्रीरामाकड़े जाण्याची पहिली अट हिच की, जो कोणी त्यांच्यांप्रत जाईल त्याला त्याला षड्रिपुरहित होऊनच जाव लागेल ,नव्हे तो तो जीव तसा तसा होत जाईल. किमयागाराची किमया न्यारी आहे. पण इथे चौदा वर्ष उराशी जपलेला अभिमान , राग उत्तुंग शिखरावर होता. म्हणून तो गळून पडण्याची योजना प्रभुनी आखली होती. कारण पुष्पक विमानातील भेटित भरताला प्रभुनी एक प्रश्न केला होता कि, माता कशी आहे. त्यावर भरताने फक्त सकुशल अस मोघम आणि त्रोटक उत्तर दिल होत.
आस्ते आस्ते भरत महालाच्या द्वाराजवळ आला आणि आत निरोप गेला भ्राता भरत येत आहेत. पोचत आहेत, पोचलेत.
आणि या क्षणाच्या भीतीने धास्तावलेल्या माता कैकईने श्रीरामाचा हात घट्ट धरला. काळजातील भीति आणि हॄदयातील धगधग दोन्ही परमसीमेवर होते. प्रभु मातेला पुन्हा पुन्हा आश्वस्त करत होते की,
"मी आहे आणि माझा माझ्या भरतावर पूर्ण विश्वास आहे. माते व्यर्थ चिंता नको."
पण काळजी ही काळीज जाळणारी असते याचाच प्रत्यय कैकईला येत होता. प्रत्यक्ष्य त्रैलोक्याचे स्वामी स्वयं बाजूला असुन आणि त्यांच्यां हृदयीं मातेबद्दल अपार प्रेम असुन सुद्धा. कारण मायेच्या अधीन असलेल्याला विकारवश, चक्षुसमोरिल सत्य देखील कळून येत नाही आणि कळल्यास उमजत नाही. माता असूनही क्रोधवश घडलेल्या प्रमादाचा प्रभाव खुप गहिरा होता आणि काळाच्या दुर्दैवी आघातामुळे आणि प्रारब्धातील दुराव्यामुळे मोहाचा आणि मायेचा पडदा आणि थर अजून गळून पडत नव्हता. आणि तिथे प्रत्यक्ष प्रभुसुद्धा काही करू शकत नाहित जिथे स्वयं प्राणी काही करत नाही
भरत महालात प्रवेश करता झाला. साश्रु नयनानी डोळ्यापुढे अंधार झाला होता. ख़र तर तो चौदा वर्षाचा बंधु प्रेमाचा, त्याच मोहाचा. त्याचाच एक एक पदर , त्याचा प्रत्येक धागा निघताना भरत अधिक अधिक गलितगात्र होत होता. अश्या संभ्रमावस्थेला पोचला होता कि, इतके दिवस जे योग्य भासत होत तेच भास आज धूसर होउंन समोर उभे होते. आतला अंतरात्मा अधिक प्रखर आणि परखड़ होत होता. जे घडल, प्रत्यक्ष ज्या ज्येष्ठ भ्राता श्रीरामांशी संबंधित तेच आज मातेला प्रथम भेटण्यास गेले. आणि मी मात्र
व्रुथा का बाळगला अभिमान
धरुनी मोहा कष्टिले प्राण
लोचनी दाटूनी अश्रु वदती
कैसे केलेसी तू मातेप्रति
निजले तुझे कसे हे भान
प्रारब्धाचा न उरला मान
आता त्यजुनी मोह माया
विनवू भ्राता मी तव छाया
या भरता क्षमा करा रघुनाथा
मागणे इतुके ऐकावे दीनानाथा
याच मानसिकतेमधे भरत एक एक पाऊल टाकत होता,प्रत्यक्ष्य प्रभु रामाच्या दिशेने .
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment