ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ३३
गतकाळातले भावनेच्या भरात घेतले गेलेले चुकीचे निर्णय व दिलेली वचनं मागाहून पश्चात्तापाला कारणीभूत ठरतात , अस अनुभव आणि जाणती मंडळी यांचा निष्कर्ष आहे. त्याचाच प्रत्यय राजा दशरथाने चौदा वर्षानपुर्वी घेतला होताच, पण भरतानेदेखील भावनेच्या भरात माता कैकईने केलेल्या असमर्थनीय कर्माबद्दल किंवा कृत्याबद्दल जे बोल तिला लावले ते सर्व आज चलचित्राप्रमाणे भरताच्या डोळ्यापुढून स्पष्ट फिरत होत.
आपलं भ्राता रामचंद्र यांच्याबद्दलच प्रेम आणि पुत्र म्हणून पित्याप्रति असलेली वचनबद्धता, हे माझ कैकईपुत्र म्हणून असलेल्या कर्तव्यावर प्रबळ ठरल. जे मातेकडून घडल त्याच समर्थन होऊ शकणार नाही, पण आपणही केलेल्या चुकीचा त्रास भ्राता रामचंद्राना झालाय. म्हणूनच तातडिचा निरोप पाठवून त्यानी बोलावलेल दिसतय. अन्यथा ते मला बोलावतेच ना. भरत या मनस्थितित आहे की आपल्या बोलण्याच समर्थन करायच की घड़लेली चूक मान्य करायची.
याच द्विधा आणि निर्णयाच्या चक्रात अडकलेला , मातेचा प्रमाद , तिच्याशी आपण प्रायश्चित्त स्वरुपात केलेला दंड आणि भ्राता राम याना मातेप्रति असलेला जिव्हाळा , ममत्व, वात्सल्य इतकं पराकोटिच आहे हे जाणून देखील आपण क्रोधाच्या भरात केलेली कृति आणि उद्दंडता आज आपल्यासमोर उभ आहे, आणि त्याच उत्तरदायित्व स्विकारण अवघड़ होऊन बसलय. क़ाय कराव आणि कस कराव यांच अवस्थेत भरत महालात प्रवेश करता झाला.
माता कैकईच्या महालातील प्रत्येक दालनात, गलितगात्र अवस्थेप्रत पोचलेला भरत, डोकावत पुढे जात होता. वास्तविक ज्या महालात आयुष्य काढल आणि माता कैकई कोणत्या प्रहरी कोणत्या दालनात असणार याची पूर्ण माहिती असलेला भरत, विचित्र मानसिक अवस्थेमुळे स्वतःला ढकलत ढकलत पुढे नेत होता. सरते शेवटी महालाच्या त्या दालनात प्रवेश करता झाला, जिथे माता कैकई देखील दुःखी आणि पश्चाताप अवस्थेत उभी होती आणि मनात भीतिचा डोंब घेऊन.
भरत दालनात प्रवेश करता झाला, आणि आस्ते आस्ते तो भ्राता रामचन्द्रासमोर येऊन उभा राहिला. भरताने भ्राता रामाकडे अश्रुपूर्ण नयनानी पाहिल. प्रभु शांत स्थितीत, निश्चलमूर्ति आणि पराकाष्ठेची धीरोदात्तता धारण करून उभे होते. येणाऱ्या भरताकडे पहात. भरत समोर आला आणि रडत रडत प्रभुंच्या चरणांवर लोटांगण घालता झाला. त्याने अक्षरशः प्रभुंच्या चरणकमलाला अश्रून्चा अभिषेक घातला. त्या उष्ण धारांच्या स्पर्शाने येणारा पश्चातापात होरपळून निघालेल्या भरताची मानसिकता आणि वृत्तितील झालेला बदल प्रभुंच्या हॄदयापर्यंत पोचत होता.
प्रभुना जे सांगायचं होत आणि भरताक़डून जे घडल होत, ज्याने स्वयं प्रभु दुखावले गेले होते, त्या चुकीची भरताला झालेली जाणीव या हृदयीची त्या हृदयीं शब्दावीना, शब्दातीत आणि शब्दरहित प्रभुंपर्यंत पोचली होती, अश्रुस्पर्शातून. प्रभु स्वयं दया आणि वात्सल्याचा सागर आणि कृपेचा करुणाघन, तेही काही क्षण चरणांवर शीश ठेवून रडत असलेल्या भरताकडे फक्त पहात होते. इतकि विलोभनियता त्या दृष्याची , जणु भक्त प्रायश्चित्तयुक्त अंतकरणाने दयारूप भगवंतांकडे आपल्या चुकांच वाचन करतोय आणि प्रभु त्या भक्ताच्या भक्तीने ओथंबुन गेलेले, त्याच्या भक्तित हरवून गेलेले, आणि साक्षीला केवळ माता कैकई होती आणि स्वये काळ उभा होता दिग्मूढ़ अवस्थेत.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment