ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास १८
रथांच चालण हे एखाद्या बैलगाडिपेक्षाही धिम्या गतीने होत होतं. याच कारण म्हणजे पथावर दोन्ही बाजूला प्रजाजन गर्दी करून आपल्या लाडक्या युवराजाला आणि युवराज्ञी याना चौदा वर्षानि पाहून डोळ्यात साठवण्यास आतुर होते आणि त्यातही हा आनंद अजुन द्विगुणित नव्हे तर पंचगुणित होत होता भ्राता भरताला प्रभु श्रीराम यांच्या सोबत पाहून. या अलौकिक दृश्याचे साक्षीदार, आजन्म स्वतःला धन्य समजुन आयुष्य जगणार होते.
या सर्व आनंदोत्सवात समस्त अयोध्यावासी नाच आणि गायनादि कार्यकम करून साजरा करत होते, तो जल्लोष, उत्सव सुरु झाला होता. प्रासादाकडे जाणाऱ्या वाटेवर स्वतः श्रीराम , माता जानकी प्रणाम करून लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करत होते. सर्वत्र फक्त एकच निनाद ऐकू येत होता
राजपुत्र श्रीरामचन्द्र यांचा विजय असो
देवी जानकी यांचा विजय असो
लक्ष्मण भरत व शत्रुघ्न यांचा विजय असो
या रथांची मिरवणूक जस जशी जवळ येत होती तस तशी प्रासादात औत्सुक्याच आणि हर्षाच वातावरण तयार होत होत. इतक्या वेळ प्रतिक्षेत असलेले माता कौसल्या, सुमित्रा, राजकन्या मांडवी, श्रुतकीर्ति आणि उर्मिला डोळ्यात आसव आणि प्राण आणून या समस्तांची प्रतीक्षा करत होते. पण त्यांची मनस्थिति प्रतिक्षेच्याही पुढील पातळीवर जाऊन पोचलेली होती. या सर्वांसोबत महालातील समस्त दास दासिगण सुनियोजित व यथोचित स्वागत , आरती आणि पूजा सामग्री घेऊन सज्ज होते. प्रत्येकाच्या धीर आता मात्र सुटत चालला होता. आणि चौदा वर्ष प्रतिक्षेत घालवलेले सर्व जण एका एका क्षणाला दर्शन हेतू उतावीळ झाले होते.
पण पथावरिल जनसागरामुळे रथ अत्यंत धिम्या गतीने मार्गक्रमणा करत होते. त्यांमुळे इकडे प्रासादातील राजपरिवार आणि समस्त कर्मचारी गण यांची उत्सुकता परमोच्च पातळीला पोचली होती. आता समस्त रथ दृष्टिक्षेपात येत होते. माता कौसल्या आणि सुमित्रा याना लोचनातील अश्रुनमुळे दिसण दुरापास्त झाल होत, म्हणून त्या क्षणोक्षणी उपवस्त्राने अश्रु पुसून पुनः पुनः बघण्याचा यत्न करीत होत्या. पण न राहवून त्या लक्ष्मण पत्नी उर्मिलेला पृच्छा करून माहिती घेण्याचाहि यत्न करीत होत्या.
सर्व रथ आता अत्यंत निकट आले होते माता कौसल्या आणि सुमित्रेचे चक्षु आपापल्या पुत्राना शोधण्यात मग्न होते, तरीही समस्त लोचनाना प्राणप्रिय श्रीराम आणि मैथिली यांच्या दर्शनाचीच आस होती. ते स्वाभाविक होत. या सर्व वाद्यांच्या गजरात, प्रजाजनाच्या जल्लोषात आणि जयजयकारात एका व्यक्तीच्या लोचनात फक्त एकाच व्यक्तीच्या दर्शनाची आस आणि आसवे जमा होती.
अर्थात ती व्यक्ति म्हणजे राजपुत्री आणि लक्ष्मणपत्नी देवी ऊर्मिला !!!!!!
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment