ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ११
पुष्पक आपल्या गतीने जात असताना लक्ष्मण सर्वाना खालील प्रदेशाची व त्या अनुशंगाने तेथे घडलेल्या व लक्षात राहिलेल्या प्रसंगाची आठवण सांगत होते. सुग्रीवाशी भेट, हनुमंताशी ओळख आणि भक्तीची साद जी हनुमंताने हॄदयातून घातली आणि प्रभुनी हॄदयात ऐकली तो मोठा विलक्षण अध्याय, तो मारीच वध ते मैथिलीच रावणाकडून अपहरण , आणि या ठिकाणी प्रभु अचानक भावुक झाले, तो पंचवटीतील काळ, ते दंडकारण्यातले दिवस, आणि इथेच झालेला भरतभेटीचा योग, पुन्हा प्रभुना अश्रु आवरता आले नाहीत, लक्ष्मण सुद्धा भावूक झाले पण माता कैकईने केलेल्या कृत्याची आठवण येऊन त्याच्या चेहऱ्यात झालेला बदल प्रभुनी ओळखला आणि म्हणाले
" लक्ष्मणा इतकं सगळ घडल तरीही तू अजून त्याच स्थळी अडकलायस, जे घडल त्यात खरच मातेची काही चूक आहे अस खरच तुला अजूनही वाटत. नियति आणि कालपुरुष यांच्याही प्रारब्धी काही काही प्रसंग बघण्याच भाग्य वा दुर्भाग्य असतच , आणि आपण तर काही कर्म करून ते पालटण्याचा यत्न तरी करू शकतो, पण काळ आणि नियति हताश होऊन बघण्याशिवाय काहीही करू शकत नाही. त्यांमुळे घडल्याप्रसंगात पुढे घडलेल्या महाप्रसंगांची श्रृंखला दडलेली असते. घड़तय अथवा घडलय यात आपली वा इतर कोणाचीही तात्कालिक चूक असो वा नसों पण ते कुठे ना कुठे तरी आपल्याच पूर्वकर्माचा परिपाक असतो. "
भगवन सांगत होते आणि सर्वजण प्रभुमुख़ातून आलेल्या त्या प्रत्येक शब्दानी भारावून सम्मोहित झाल्यासारखा मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. प्रभु पुढे म्हणाले.
" जऱ त्या पश्चात विपरीत घड़लेच तर ते आपल्याच कर्माचे प्रायश्चित्त होते असे समजावे. पण जऱ त्यानंतर काही उपयुक्त घड़ले तर ज्यायोगे हे घड़ले ती मूळ गोष्ट अथवा प्रसंग हा कितीही कटु वाटला तरीही तो भल्याकरताच होता हे जाणून त्यातील कटु भाग विसरून त्या व्यक्तिना व त्या काळाला मनापासून क्षमस्वित करावे, असच वेद पुराण उपनिषदें ऋषिमुनि आणि मुमुक्षु व जाणते सांगतात. ते ज्याअर्थी अस सांगतात त्याअर्थी त्यातूनी आपलेच व पर्यायाने आपल्यावर अवलंबित अथवा आपल्याशी संबंधित लोकांचे हित आहे हे जाणावे. खुप वेळा प्रसंग घडतो तेंव्हा दोषी व्यक्तिचा हेतू हा काहीही असला तरीही नियतीला अभिप्रेत आणि कर्माच्या फलादेशानूसार अंतिम परिणाम सुखावह होणार असतो, अश्या वेळी आपणास नन्तर आपल्याच वर्तनाचा पश्चात्ताप होऊ शकतो, ज्यायोगे मनाचा तोल ढासळून जे कर्मयोगे योजले आहे, त्याविपरित घडू शकते, जे आपल्याच अहिताचे ठरू शकते. कर्मधर्म संयोगाने सकारात्मक न घडता नकारात्मक घड़लेच म्हणजेच अंतिम परिणाम विपरीत आलाच तरीही मनाचा संयम न जाऊ देता अजून नकारात्मक परिणाम टाळता येतो.
सुग्रीव येथे प्रश्न करते झाले की ,
" जऱ सर्व पूर्वकर्मानुसार ठरत असेल तर मग आता कर्म करण्याची गरज क़ाय आणि कर्महीन वा कर्मरहित राहिल्याने क़ाय होणार वेगळ, कृपया विस्ताराने आणि सहज साध्य भाषेत उलगडून सांगावे, भगवन." अस म्हणून ते भगवंताना प्रणिपात करतात.
भगवन त्यांच्यां नमस्काराचा स्वीकार करून स्मितवदन उत्तरास आरंभ करतात.
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
३०/०१/२०१८
जय श्रीराम
Comments
Post a Comment