अध्यात्म विराम १७१ नामाच्या महतीसाठी कित्येक उदाहरणं देता येतील. प्रत्यक्ष भक्त प्रल्हाद, देवर्षी नारद, महर्षी वाल्मिकी, भक्त सूरदास, संत कबीर, संत मीराबाई, महाराष्ट्रातील महान संत परंपरा, विभिषण इत्यादी अनेकानेक दाखले देता येतील. यांनी फक्त ईश्वर नामाच्या स्मरणात आपल्या देहासह आत्म्याचा उद्धार करवून घेतला. पण या सर्वांचं एक समान सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे देहाच्या, संचिताच्या आणि प्रारब्धात आलेल्या कोणत्याही भोगाला, त्यांनी अव्हेरलं नाही. आलेल्या भोगात त्यांनी कधीही सूट, कपात वा पळवाट मागितली नाही. त्यांनी प्रपंचातील अनेक अकल्पनीय व अपरिमित दुःख, भोग सहन करताना, कोणतीही पक्रार केली नाही. किंबहुना आपल्या दुःखाच्या भोगाच्या अस्तित्वामुळे आपल्याला ईश्वरी नामाच्या साधनेचं स्मरण होतं आणि आपण त्या दुःख भोग यांमुळे हे ईश्वरी स्मरण अखंड करू शकतो,याची जाणीव त्यांच्या मनात नित्य असायची. किंबहुना ते दुःख हाच आपल्या साधनेचा प्राण आहे, हीच त्यांची नित्य भावना होती. महाभारतात आपण जाणतो की, कुंती मातेने, श्री कृष्णाकडे अपार दुःख आणि भोग मागितले. कारण त्याच काळात, या दुःख व भोग यांम...