श्रीरुक्मिणी स्वयंवर ५२ (प्रसंग नववा समाप्त)
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
त्याचे पुढील लक्ष चक्रदेव आहे हे जाणून महाबली यादववीर कंक हत्तीवरून अंगाकडे झेपावला. महाताकदवान कंकाने काही क्षणातच अंगाला त्याच्या हत्तीसहित यमसदनी धाडले. इकडे सात्यकीने कलिंगाच्या सैन्यात विध्वंस करण्यास सुरुवात केली. ते पाहून कलिंग क्रोधाने पुढे सरसावून सात्यकीपर्यंत पोचला.
सात्यकीला त्याने वीस बाण एकत्र मारून पार हतबल केले. सात्यकी रथातून रथाबाहेर पडला. त्वरित स्वतःला सावरत सात्त्यकीने आपल्या बाणाने कलिंगाचा मुकुट आणि रथाचा मेढा पाडला. यावर रागाने कलिंगाने सात्यकीच्या रथाचा चक्काचूर केला. कलिंगाच्या या वर्तनाने क्रोधीत होत सात्त्यकीने आपली कुऱ्हाड अर्थात परशु बाहेर काढला आणि परशूच्या शक्तीप्रहाराने कलिंगाचा रथ ध्वस्त केला. तद पश्चात रथाच्या चारही घोड्यांना मुष्टिप्रहाराने यमाकडे धाडले.
हे देखून कलिंग क्रोधाने लाल होऊन सात्यकीवर चालून गेला. त्याला तसे येताना पाहून सात्त्यकीने त्याला मुष्टिप्रहाराने पाडले आणि बाजूस पडलेले रथाचे चक्र घेऊन त्याच्या अंगावर धावून गेला. सात्यकीच्या या पावित्र्याचा अंदाज येऊन त्वरेने उठत कलिंगाने रथाचे चक्र चुकवले. अन्यथा कलिंगाचा कपाळमोक्ष निश्चित होता.
इकडे वंग राजा महापराक्रमी यादवसेनेवर तुटून पडला. ते पाहून सारण त्याच्या बंदोबस्तासाठी धावून गेला. दोघांच्यात बाणांचे तुंबळ युद्ध सुरू झाले. सारणाने बाणांच्या वर्षावाने वंगाच्या सैन्याला शतीग्रस्त करण्यास सुरुवात केली. ते पाहून अति क्रोधाने लालबुंद झालेला वंगाने प्रयत्नांची शर्थ करत सारणाला बाणाने जर्जर करून रथातून खाली पाडले. विरथ झालेल्या सारणाने त्वरित धनुष्यास बाण लावून वंगाच्या रथाला ध्वस्त केले.
वंग खाली पडला. त्वरेने धावून लगबगीने तो गजावर स्वार झाला. गजावरून त्याने सारणास बाणांनी त्रस्त केले आणि तद्नंतर गजाच्या पायांनी चिरडण्याचा यत्न केला. या वंगाच्या प्रयत्नाने आणि गजाला घाबरून न जाता महापराक्रमी आणि बलवान सारणाने पडल्या पडल्या गजाला पाय धरून पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. गजाचा प्रहार चुकवण्यासाठी कधी इकडे उडी घे तर कधी रथाखाली लप असं करत असतानाच गजाला धरून उचलण्याचा यत्न देखील करत होता.
पण एक क्षण कलिंगाच्या गजाच्या आणि कलिंगाच्या बाणांनी सारण संकटात येईल असे वाटून यादवसेनेत हाहाकार माजला. तो आवाज ऐकून बलीभद्र एका हाताने वृक्ष उचकटून आणि एका हातात मुसळ घेऊन संकटातील सारणाच्या सहाय्यार्थ धावला. त्याला येताना पाहून कलिंगाने बलीभद्राच्या दिशेने बाण मारला. तो बाण एका हातातील वृक्षाने अडवून तोच वृक्ष कलिंगाच्या गजावर फेकून मारत बलीभद्राने गजासहित कलिंगाला धरणीवर पडला.
हे देखून राजा केशिक बलरामकडे धावला आणि त्याने बलरामाला युद्धाचे आव्हान दिले. दोन्ही शूरवीर महा पराक्रमी एकमेकांसमोर युद्धास ठाकले. या सर्व युद्धाचे आणि त्यातील मृत्यू पावणाऱ्यांचे सदभाग्य एकच की हे सर्व केशवासमोर होत असल्याने त्या सर्व मृतांना त्वरित मोक्ष प्राप्ती होत होती.
आता सर्व लक्ष केशिक आणि बलराम यांच्या युद्धाकडे लागले, जे पुढील भागात आपण पाहू.
या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज यांच्या कृपेने नववा प्रसंग समाप्त होत आहे
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२३/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment