श्रीरुक्मिणी स्वयंवर ५७ (प्रसंग दहावा समाप्त)
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
अनेकानेक देह जे देहइंद्रियांसहित मृत्यू पावले , ते हरिचरणी शरण आले. जे शीर उडून वैकुंठाला पोचले ते ते त्या स्थळी म्हणजेच वैकुंठी हरी नाही हे देखून पुनः रणभूमीवर श्रीहरी चरणी येऊन पडत असे.
निजगमन देहाचे झाले
तेथे अभिमान रिक्त झाले
ते ते हरी सन्मुख पातले
स्वरूपाशी मिसळले
आत्मन देह त्यागीता
अभिमान रहित होता
स्वपापाची जाणीव होता
कळो आले प्रत्ययास
निजरूप निजचित्ती
जाणले त्यागीता गती
परमार्थाची परिणती
देहाभिमान सोडता
तुज जे न कळे आता
कळे देहत्याग होता
तैसेची प्रत्येक मृता
कळो आले मरणांती
हरी समोर उभा असता
कैसे स्वर्ग कैसी ब्रम्हता
कैसे वरदान स्वर्गसुखता
एक सत्य हरिचरण
जाणले न या देही राहून
निज देह त्यागीता जाणून
पातले हरी चरणांशी येऊन
मुक्ती चारी येथ मिळती
येऱ्याचे नव्हे हे भाग्य जाण
हरी सन्मुख जाईल प्राण
ते भाग्य लाभले रणी अर्पण
करिता देह हरिसी तर्पण
युद्धात मृत्यू कोणत्याही बाजूच्या सैनिकांचा वा वीरांचा होवो , पण त्याला मोक्ष मुक्ती तिथल्या तिथे प्राप्त होत होती. कारण प्रत्यक्ष वेदवचनच आहे तसं की, हरी सन्मुख मृत्यू हा सर्व पापांतून मुक्ती ,पापांच्या अनेक पर्वतराशी असोत , त्याचा ऱ्हास हा हरी समोर आलेल्या मृत्यूने होतो. श्रीहरी समोर मृत्यू आला तर प्रत्यक्ष यमराजाचीदेखील त्या आत्म्यास घेऊन जाण्याची प्राज्ञा नाही.
इथे तर समोर प्रत्यक्ष जगदीश्वर साक्षी. कित्येक दुष्कर्मी, दुराचारी जे जरासंधासोबत यादवांच्या विरोधात युद्धाला उतरले होते त्यांचा दुराभिमान, देहातून आत्मा बाहेर पडल्यावर प्रत्यक्ष साक्षीभूत ईश्वर समोर पाहताच , पार गळून पडत होता. हरीमय सृष्टी आणि हरीच सर्वसाक्षी याचा प्रत्यय आणि प्रचिती देह उतरून गेल्यावर येत होती. किती वृथा अभिमान बाळगून प्रत्यक्ष परम ईश्वर ज्या बाजूला उभा आहे त्याच बाजूवर म्हणजेच परम ईश्वरावर चालून गेलो, वार केले याची जाणीव त्या जडदेह त्यागलेल्या विमुक्त आत्म्यास होत होती.
वृथाची बाळगला अभिमान
देहाचा वाढवला मी सन्मान
जीणे व्यर्थ याची झाली जाण
देह असता हे नच का तू जाण
उगा करसी माझे माझे जग
तरी सांडिता देह न उरे जग
सोडणे आहे तुज सारे जग
रिक्त होऊन सोडणे हे जग
या सर्व पापी जनांना मोक्ष देऊन मुक्त होण्यास्तव हा खेळ आरंभला होता. याची जाण त्या जीवांना देहाच्या पतनानंतर, आत्मा देहातून मुक्त होताच, कळलं, जाणवलं आणि हे देखील उमजलं की हा विवाह हा एक कार्यकारण भाव होता, एक उपचार होता. ज्यांचा चितअनंत काळासाठी जोडा जमलाय, त्यांना विजोड कोण करू शकणार. या रणात कार्या आलेले गज अश्व हे देखील वैकुंठ प्राप्त करते झाले. श्रीबलरामाच्या कृपेने कित्येक वीर ज्यांना सद्गती प्राप्त झाली ते मोक्षाप्रत गेले हरिचरणी लीन होऊन. अश्या तऱ्हेने श्रीहरीने कित्येक जीवांचा उद्धार केला या एका विवाह कार्याच्या निमित्ताने.
या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज यांच्या कृपेने दहावा प्रसंग समाप्त होत आहे. पुढे प्रसंग अकरावा
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२८/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment