श्रीरुक्मिणी स्वयंवर ४४
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
कृष्ण कृष्ण कृष्णच केवळ
आता भावे या मनाला
कृष्ण रुक्मिणी व्हावे मीलन
काळही क्षणभर थिजला
रुक्मिणी कृष्णांकीत झाली
अगणित वेळा नामाने
कृष्ण जपाचा अभिषेक ती
करते अर्पण या मनाने
नकोच ऐश्वर्याचा डौल मज
श्रीकृष्णाचे नयन मनोहर
त्या नयनांचे व्हावे दर्शन
आता भावे केवळ यदुवीर
भवतापाचे झाले ओझे
हरिरूपाचे औषध घ्यावे
हरीविना या देहमनाला
अन आता काही न भावे
या विलक्षण भाव स्थितीत रुक्मिणी केवळ आणि केवळ हरीचेच चिंतन करते आहे. दुसरे काहीही स्वीकारण्यास मनाची तयारी नाही, देह हरीविना जगणे अशक्य झाले. अश्या स्थितीला ज्या वेळी एखादा प्राणी पोहोचतो, त्याचवेळी त्या प्राण्याच्या मनाची साद हरी पर्यंत पोहोचते आणि हरी कोणत्याही रुपात सुटकेसाठी धावून येतो, नव्हे यावेच लागते.
गेले कित्येक दिवस फक्त श्रीकृष्णाचाच विचार तिने केलाय.
एकही क्षण असा गेला नाही रिता
या देहाचा हरिविण चालला भाता
इतुके करूनही कष्ट देह झिजला
हरीवीण जल मी अस्पर्श मानला
ऐशा स्थितीप्रत हरीनेच आणला
मग आज हरी येऊन जाईल मला
जितुके वेचले क्षण तितुके नामकण
मन भ्रांती विभ्रांती भटकले वणवण
आता स्वरूप भेटेल मज घेऊन जाईल
जप तप सारे माझे आता व्यर्थ न जाईल
विचार करा की, श्रीकृष्णाला पत्रिका पाठवणं तेही त्या काळात , किती व्याकुळता असेल मनाची. इतक्या व्याकुळते शिवाय परमात्मा आत्म्याच्या सादाला प्रतिसाद देत नाही. त्याचं उत्तम उदाहरण जर काही असेल तर हे रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेलं अद्भुत पत्र.
हे पत्र म्हणजे एखाद्याला आपला मुद्दा पटवून देण्यासाठी काय काय युक्त्या , दृष्टांत, मुद्दे मांडावे याचं प्रात्यक्षिक आहे. यात आर्जव आहे , विनवण्या आहेत, आपल्या मनाच्या स्थितीचा लेखाजोखा आहे, मनाला वाटणारी आणि समोर उभी असणारी भीती आहे, अव्यक्त नव्हे तर पूर्ण व्यक्त स्वरूपातील प्रेमालाप आहे कोणतेही आढेवेढे न घेता मांडलेले, भावविभोरता आहे, प्रेमाची साद आहे.
आपला जोडा कसा शोभणारा आहे याचं सोदाहरण स्पष्टीकरण आहे, श्रीकृष्णाचं व्यक्त रूप आणि त्याचं परमात्म स्वरूपाशी असलेलं नातं, श्रीकृष्णाची महानता त्याच्या ख्यातीची सत्यता , त्याच्या बद्दल वाटणारा आदरभाव , का प्रेम जडलं , तुला न पाहतादेखील मी कशी मोहित झाले, तुला अनेक जणी मिळतील पण मीच तुझ्या योग्यतेची कशी याचं पटेल अस सुस्पष्ट विवेचन
आणि सर्वात शेवटी तू न मिळाल्यास काय होऊ शकतं म्हणजेच मी काय करू शकते त्याची गर्भित सुचनावजा धमकीही रुक्मिणीने पत्रात मांडली आहे. अर्थात ज्याच्यात धमक आहे तोच खऱ्या अर्थाने धमकी देण्यास पात्र असतो. ज्या पत्रातील मांडणीने मोहित झालेला आणि प्रथमदर्शनी पत्रप्रेमात पडलेला श्रीकृष्ण, आता समीप आला आहे या अद्भुत विचाराने रुक्मिणी भारावून गेली आहे. याच क्षणांची प्रतीक्षा काळदेखील करतो आहे.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१४/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment