Skip to main content

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४६ (रुक्मिणी हरण मुख्यकथाभाग आणि प्रसंग सातवा समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४६ (रुक्मिणी हरण मुख्यकथाभाग   
                                   आणि प्रसंग सातवा समाप्त)  

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

इकडे कृष्णाने रुक्मिणीस पाहून,  मात्र नजरेने, शेवटच्या पायरीजवळ क्षणीक थांबण्यास खुणावले. मी येतोय. या नजरे नजरेतील खेळाचा थांग पृथ्वीवर कोणासही आला नाही, दादा बलराम सोडून. अर्थात स्वर्गस्थ देव, ब्रम्हलोकी ब्रम्हाजी आणि कैलासावर कैलासेश्वर सपत्नीक हा रुक्मिणी हरण सोहळा पाहण्यास अति उत्सुक होते.

रुक्मिणीच्या हातात पुरोहितांनी दिलेली वरमाला होती. ती घेऊनच तिने एक एक पायरी उतरायला सुरुवात केली. तीन चार पायऱ्या बाकी असताना कृष्णाने सारथ्याला चुटकी वाजवून खुणेचा इशारा केला आणि शब्दशः विद्युत गतीने कृष्णाचा अष्ट अश्वांचा रथ मंदिराच्या पायऱ्यांकडे निघाला. घटका योग्य होती आणि घटिका पूर्ण झाली होती, मुहूर्त सुमुहूर्तच होता, सूर्य स्वये मध्यांनी आकाशात शीर्षावर अभिजित नक्षत्रात आला होता आणि क्षण एक तोदेखील स्तब्ध झाला. 

रुक्मिणी खाली बघत असल्याचे दाखवत होती , परंतु कृष्णाच्या, आपल्या समीप येण्याच्या, हालचाली तिच्या डोळ्यांच्या कडा नोंदवून घेत होत्या. अद्भुत पण परीक्षेची घडी आली. रुक्मिणी शेवटच्या पायरीवर आली आणि इकडे कृष्णाचा रथ रुक्मिणी समीप आला. कृष्णाने रथाची गती किंचित देखील कमी न करण्याची आज्ञा केली आणि एक हात रथाच्या खांबाला धरून एका हाताने रुक्मिणीला कृष्णाने आपल्या वज्रासम, कणखर आणि दणकट बाहुपाशात  उचलून घेतले, त्याच क्षणी रुक्मिणीने हातातील वरमाला कृष्णाच्या गळ्यात घातली. 

रुक्मिणीला रथात घेत कृष्णाने सारथ्याला गती अजून तीव्र करण्याची आज्ञा केली.  या क्षणीची यादवनरेशांची चपळता , रथाचा वेग जाणून आणि समयाची उचितता ओळखून रुक्मिणीस रथात ओढून घेण्याची कृती ही न भूतो न भविष्यती होती.

कृष्णाची आज्ञा आणि आपल्या स्वामींची होणारी पत्नी अर्थात आपली स्वामिनी हिचं रक्षण ही आपलीच  जबाबदारी आहे , हे जाणवून , अश्वानी आपला वेग वाऱ्यालाही लाजवणारा केला. त्वरेने तेथून , रुक्मिणीला घेऊन निघून जात असलेल्या कृष्णाकडे पाहून जमलेले आणि मी मी म्हणणारे योद्धे आ वासून पहात राहिले. काही तर या विद्युत वेगाला पाहून जागच्या जागी खिळून राहिले आणि काही मूर्च्छित होण्याच्या स्थितीला आले. 

त्वरेने यादवसेनेकडे निघालेल्या कृष्ण आणि रुक्मिणी या विष्णू लक्ष्मीवर स्वर्गातून, अवकाशातून आणि कैलासावरून पुष्पवृष्टी सुरू झाली. गंधर्व गायन करू लागले, किन्नर आणि अप्सरा नृत्य करण्यात मग्न झाले, सर्वत्र आनंदी आनंद सूरु झाला.  

इकडे यादव सेनेकडे येत कृष्णाने ज्येष्ठ बंधू बलराम , सेनापती आणि निवडक कारभारी यांना आनंदाने टाळी देत आपला कार्यभाग साधल्याचे जाहीर करत हर्षोल्हास करण्यास सांगितले. या शूरवीरासम कार्याने संतुष्ट झालेली रुक्मिणी कौतुकाने श्रीकृष्णाला पहात, लाजत, पुन्हा पुन्हा पाहात होती. तिच्या तश्या पाहण्याने यादवसेनेला अतीव आनंद होत होता. शत्रूच्या पक्षात जाऊन, शस्त्रसज्ज शत्रूच्या डोळ्यासमोर, त्यांच्याच नोवरीला, तिच्याच संमतीने, उचलून अर्थात हरण करून आणणे, ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नव्हती. तेही सर्व शत्रुसैन्य उपस्थित असताना. त्रिखंडात हे कार्य मात्र आणि मात्र कृष्णच करू जाणत होता. हे रुक्मिणी जाणत होती आणि कृष्णाचा धाडसी स्वभाव जाणणारे ज्येष्ठ बंधू श्री बलराम  जाणत होते. रुक्मिणीने रथातून पायऊतार होत श्रीकृष्णासह ज्येष्ठ बंधू अर्थात तिचे दिर श्रीबलभद्र यांचे चरणस्पर्श करून उभयतांनी आशिष घेतले. 

प्रसंगाचं गांभीर्य ओळखून बंधूनी दोघांना पुनः रथारूढ होण्याची आज्ञा केली. यादवानी लगोलग रणवाद्ये , तुताऱ्या, भेरी,  शंखनाद , जयजयकार, सिंहनांद यांना सुरवात केली. नारद हे सर्व देखून अति हर्षे उल्हसित झाले आणि मनोमन हसून वदले.

" आता एक तुंबळ युद्ध पाहण्यास मिळणार, कृष्ण आणि बलरामदादा यांच्यासह यादवसेनेचं शौर्य , यादववीर आणि मगधातील शूरवीर व त्यांचे सैनिक व त्यांची शस्त्रे अस्त्रे, अश्वाला अश्व, वीरांना वीर, गजांना गज  भिडलेले पहायला मिळतील. आता बाणांचे आहेर आणि भेटी एकमेकांना दिल्या जातील, शस्त्रांना शस्त्रे भिडलेली पहावयास मिळतील. मोठे भीषण युद्ध बहु दिसांनी पहायचा योग आला आहे. 

या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि  नाथ महाराज यांच्या कृपेने सातवा प्रसंग समाप्त होत आहे

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१६/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...