श्रीरुक्मिणी स्वयंवर ५१
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
पौंड्रकाला मूर्च्छित पाहून यदुरथ त्वरित कृतवर्माकडे त्वेषाने धावू लागला. त्याला तसे करताना पाहून वीर अक्रूर वायूवेगे आपला रथ घेऊन शीघ्र गतीने यदुरथाकडे धावला आणि आपला रथ त्याच्या रथा समोर उभा करून म्हणाला. "तुला मी युद्धाचं आव्हान देतो." याला प्रत्युत्तर म्हणून यदुरथ अक्रुराला म्हणाला " अरे अजिबात क्रूरता नसलेला तू म्हणून तुझं नाव अक्रूर. तुझा काय माझ्यापुढे पाड लागणार. खरतर तू युद्धभूमी योग्यच नाहीस."
यदुरथाचं हे दरपोक्तीपूर्ण प्रत्युत्तर ऐकून अक्रूर त्वेषाने म्हणाला " अक्रूर म्हणजे अति अर्थात महाभयंकर क्रूर. आता तुला कळेल रणात राहण्यास कोण अपात्र आहे."
इतकं बोलून अक्रूराने धनुष्यास बाण लावून वायूवेगे यदुरथावर सोडला. यदुरथ यावर त्वरित बाणानेच उत्तर देता झाला. त्यानंतर या दोन वीरांचे घनघोर बाणयुद्ध सुरू झाले. त्यांचे बाणांच्या प्रत्युत्तराने समस्त आकाशच जणू व्यापून गेले. अगदी सूर्य झाकोळला गेला. एका क्षणी काहीश्या श्रमलेल्या यदुरथाला बेसावध गाठून , आकृराने आपल्या बाणाने त्याचे धनुष्य उध्वस्त करून नन्तर यदुरथाला रथासह उडवून दिले.
त्याच्या रथाने संपूर्ण रणभूमीची प्रदक्षिणा केली आणि मूर्च्छित होऊन धरणीवर पातला. हे युद्ध चालू असतानाच , श्र्वफल्प , सात्त्यक, चक्रदेव, कंक , सारण आदी यादववीर अंग वंग कलिंग आदी शत्रूच्या राजांसोबत लढून त्यांना परास्त करण्यात मग्न होते. सणसण करत बाण सुटत होते, खणखण करत खड्ग वाजत होते, रथ रथावर आदळत होते, वीरांचे सिहनांद चहुदिशेला घुमत होते.
चोहीकडे अग्नीचा लोळ उठलेला आणि युद्धनादाचा धुराळा उडालेला दिसत होता. इतका धुराळा उडाला होता की, वाऱ्यालादेखील वहायला वाव नव्हता. बाणांवर बाण आदळत होते, भाल्यांवर भाले आपटत होते, अश्वांवर अश्व आणि वीरांवर वीर त्वेषाने तुटून पडत होते. बाणांच्या आणि बाणांमधून सोडल्या जाणाऱ्या अस्त्रांमुळे संपूर्ण आकाश अग्निज्वालानी वेढले गेले होते. प्रत्येक यादववीर शौर्य आणि रौद्र यांचे अनोखे प्रदर्शन करत होता आणि त्याला तितक्याच त्वेषाने शत्रूकडून प्रत्युत्तर दिले जात होते.
याचदरम्यान कारुषाने चक्रदेवाला गाठून बाणप्रहार करण्यास सुरवात केली. चक्रदेव प्रत्युत्तर देत होता परंतु एका बाणाने चक्रदेव रथातून खाली पडला. त्याने स्वतःला त्वरित सावरत वेगात कारुषावर उडी घातली. कारुषाला रथातून ओढून खाली पाडले आणि दोघांचे द्वंद्व सुरू झाले. दोघेही गाढे योद्धे. कारुषाला चक्रदेव भारी पडतोय हे पाहून हत्तीवर आरूढ अंग तिकडे झेपावला. त्याने मार्गात चक्रादेवाचा रथ हत्तीच्या पायाखाली ध्वस्त करून टाकला. त्याचे पुढील लक्ष चक्रदेव आहे हे जाणून महाबली यादववीर कंक हत्तीवरून अंगाकडे झेपावला.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२२/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment