श्रीरुक्मिणी स्वयंवर ३८
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
रुक्मि असेच अजूनही बरळत होता.
"त्या अंबा भवनाजवळ यादववीर उतरले आहेत. ते सुंदर सुंदर नारी हुडकून उचलून नेतील. त्यांचा काय भरवसा द्यावा. त्यापेक्षा हे कार्य होता होईल तितकं लवकर उरकून घेऊ. मंदिरात तर लग्नानंतरदेखील जाता येईल."
रुक्मि इतके बोलला मात्र , राजा भीमक यांना क्रोध अनावर झाला आणि राजा भीमक वदले
"तू व्यर्थ माझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आलास, करंटा पुत्र म्हणून. तू वीर राजापोटी जन्म घेऊन भ्याडपणाच्या गोष्टी करतोस. अरे उद्या वेळ आलीच तर काय युद्ध करणार नाहीस का आणि कोणी असे कसे चोरून नेईल. माझ्यासारख्या पराक्रमी राजाला या वयात देखील भीती नाही वाटत. कारण ज्याचा स्वबळावर विश्वास असतो , त्याला कोणत्याही संकटांची आगाऊ भीती वाटत नाही आणि कुलरीत लग्नाआधी मुलीने अंबा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग विवाहविधी पार पाडण्याची आहे. हे लक्षात ठेव. "
राजाने हे बोललेले रुक्मिच्या वर्मी लागले. त्याने लगेच आपलं म्हणणं मागे घेतलं आणि तो चेदिराज शिशुपाल याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाला
" हे चेदिराज एक प्रश्न उपस्थित झालाय. आमच्या कुळातील प्रथेप्रमाणे रुक्मिणीला नगराबाहेरील अंबा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यायचे आहे. माझी आपल्याला विनंती होती की , आपण ससैन्य तेथे आलात तर सार्थ होईल. "
अर्थातच ही गोष्ट शिशुपालाला अमान्य असण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने त्वरित सैन्याला मंदिराकडे कूच करण्याची आज्ञा केली. नव्या वधूच्या वेशात सजलेली रुक्मिणी तिच्या सोबत राजा राणी चारही बंधू शस्त्रसज्ज होऊन, चालले होते. पायदळ हातात खड्ग घेऊन, कमठयाना तीर लावून सज्ज, तसेच शस्त्रसज्ज अश्वदल त्यावर खडगधारी वीर योद्धे , गजदल गजावर अनेक योद्धे भाले, तिरकमठे व अन्य शस्त्रास्त्रे हातात घेऊन सज्ज अवस्थेत असा पूर्ण लवाजमा मंदिराकडे निघाला.
या आधी आगतस्वागत झाल्यावर कृष्ण आपल्या रथासह अंबामाता मंदिराकडे रवाना झाला होताच. मंदिर परिसरात जाताना सर्व सैन्याची व्यवस्था एखाद्या उपासनायंत्रप्रमाणे योजून सर्वात मध्यभागी राया त्या मध्ये चारही बंधू चार वेदासमान आणि त्यामध्ये लक्ष्मीरुप रुक्मिणी अशी व्यवस्था लावून रुक्मि रुक्मिणीच्या सर्वात जवळ चालत होता. या सर्वांमागे मुख्य भीती यादववीर आणि यादवसेना या कार्यात काही विघ्न निर्माण करतील ही होती.
रायाला आपली कन्या कृष्णास द्यावयाची होती हे सर्वश्रुत झाले असल्याकारणाने व कृष्ण बलभद्र तेथेच उपस्थित असल्यामुळे रुक्मि आधीच धास्तावला होता. त्यातही रुक्मिच्या मनात पराकोटीचा कृष्णद्वेष भरला असल्या कारणाने तो द्वेषापोटी अधिकच सावध झाला होता. कारण आपल्या मनात भीती असते तेंव्हाच आपण जरुरीपेक्षा जास्त सावध राहून काळजी घेतो, तद्वत.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०७/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment