श्रीरुक्मिणी स्वयंवर ३७
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
या ठिकाणी नाथमहाराज सुंदर शब्द वापरतात कृष्णआमोदर रस आणि पुढे लिहितात " नयनद्वारे करिती प्राशन करुनि हृदयी आणती कृष्ण सबाह्य पाहती समान समदृष्टी कृष्णाते." जनमानसाची इतकी उत्तम स्थिती वर्णन करणं अशक्य आहे. कृष्णाच्या रुपात स्वरूपाला पाहून हरवून सर्व विश्व समसमान देखून कृष्णमूर्तीचे ध्यान करत जनसामान्य अद्वैत समजते झाले. सर्व सृष्टी कृष्णमयी आणि कृष्णामध्ये सर्व सृष्टी ह्या वृत्तीचा अनुभव आणि अनुभूती सर्वांना होत होती, अर्थात जे जे भक्तिमय नजरेने आणि श्रध्दायुक्त अंतःकरणाने कृष्णास पहात होते, त्यांस हा अनुभव येत होता.
या रूपाचं दर्शन होऊन सर्वजण हाच विचार करत होते की काल शिशुपालाचे वऱ्हाडी पाहिले. त्यात कुठेही नवरेपणाची शोभा जाणवली नाही. ईर्षा , द्वेष , मत्सर आणि गर्व यांचं अभूतपूर्व प्रदर्शन मात्र दिसलं. पण आज मूर्तिमंत जगदीश्वर दर्शन देता झाला. या रुपाची मोहिनी जनसामान्यांना इतकी झाली की या तुलनेप्रत ते आले, की भीमकीसाठी योग्य वर श्रीकृष्णाव्यतिरिक्त अन्य तिसरा असूच शकत नाही या जगतामध्ये. जणू हेच दोघे एकमेकांसाठी जन्मते जाहले आहेत.
जनमानसातून प्रत्यक्ष विश्व मानस प्रकट होत होतं. प्रत्येकाच्या वंदनाचा स्वीकार करत करत श्रीकृष्ण स्थळी येऊन पोचले. राजा भीमकाने अगत्याने, अतिथी असलेल्या कृष्णाचा, यथोचित सन्मान केला. जल व क्षीर अर्थात दुग्ध यांनी त्यांचे पाय धुवून, कपाळी गंध लावून, यथाशास्त्र पूजाविधी पार पाडला. कृष्णासह संपूर्ण यादवसेनेचा यथाशक्ती आदरसत्कार करून झाला.
फक्त कृष्णास पुजले तर ते अगदीच वाईट दिसेल म्हणून रायाने आलेल्या सर्व मान्यवरांना पुनः एकवार विधिवत पुजले. मगध नरेश जरासंध , चैत्यराज शिशुपाल यांसह सर्व वऱ्हाडी कृष्णास पाहून मनात मत्सर करते झाले. विचार करत होते की , हा इथेपण आला आहे का आमचा पाणउतारा करायला. हा तर आमच्याशी वैरभाव ठेवून आहे हे सर्वश्रुत असताना इकडे येण्याची यास काय गरज व प्रयोजन. असो सध्या कार्य सिद्ध करून रुक्मिणीस वरून घेऊन जायचे आहे. ते कार्य एकवार पूर्ण होऊन गेले की मग याच्याकडे बघता येईल. तोपर्यंत सध्या शांत राहणे थोर.
हा सोहळा पार पडत असतानाच लग्नविधी करून घेण्याची समस्तांस घाई झाली होती. म्हणून रुक्मिसह सर्व लगबग करूया असे सुचवत होते. इतक्यात राणी शुद्धमती रायांस वदती झाली
" महाराज आपण घराण्याचा कुलधर्म व कुळाचार विसरलात वाटतं. आपल्या घराण्यातील चालीरीती प्रमाणे , लग्नाआधी नवरीमुलगी गावाबाहेरील अंबेचे दर्शन घेऊन येते. राजा त्यास रुकार देत असतानाच रुक्मि , रायाचा ज्येष्ठ पुत्र म्हणाला
" पिताश्री या बायकांचा विचार कसला थोर मानता, अश्या कुलविधींना धार्मिक आधार आहे कुठे आणि प्रथा आणि धर्म यात मूलतः फरक आहे. त्यामुळे उगाच विवाहविधी लांबवण्याची काय गरज आहे. याशिवाय स्रीसल्ला ऐकून कार्य करणे म्हणजे कार्यनाश करणे अश्या अर्थाचे शास्त्रवचन
आहेच. तेंव्हा या उपचार विधीत समय व्यर्थ वाया घालवणे उचित नाही. आपण आपले कार्य पुढे नेऊ. आपली बुद्धी उत्तम, त्याहून श्रेष्ठ गुरुबुद्धी, परबुद्धी वाईट आहे, परंतु सर्वात वाईट ही स्त्रीबुद्धीने वर्तणे."
रुक्मि असेच अजूनही बरळत होता.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०६/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment