श्रीरुक्मिणी स्वयंवर ५८
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
तिकडे वक्रदंताने सात्विकाला आव्हान दिले.
" अरे सात्विका तू तर तपस्वी लोकांच्या समूहातच शोभतोस. कारण तुझे नावच सात्विक आहे. तुझे या युद्धभूमीवर काय कार्य. तू येथून पळ काढ. कारण मी जर कोपलो तर तुझी सात्त्विकता पार पाताळात जाईल. त्यामुळे तू इथून निघून गेलेला बरा."
त्याचे हे बोल ऐकून सात्विक संतप्त होऊन म्हणाला
" हे वक्रदंता माझी सात्त्विकता, फक्त सात्विक आणि पुण्यवान लोकांसाठीच आहे. तुझ्यासारख्यासाठी माझी सात्त्विकता युद्धभूमीवर येण्याआधी मी उतरवून येतो. तुझ्या नावा प्रमाणेच तुला वक्र करून तुझे दात पाडण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे. तुला घावही न लागता तुझे प्राण हरण करण्याची क्षमता देखील माझ्यात आहे. त्यामुळे तू माझ्या सात्विकतेची चिंता न करता आपली चिंता कर"
या सात्विकाच्या बोलानंतर वक्रदंत खवळून उठला त्याचा तमोगुण जागा झाला. सात्विकाचा सात्विक संताप जागा होऊन त्यानेही युद्धास्तव अस्त्रांना हात घातला. सात्विक जो बोध-कवचामध्ये सुरक्षित होता. वक्रदंताने अवगुणांच्या धनुष्यास विषमतेचा खुंटला जोडून षड्रिपुंची अस्त्रे असलेले बाण सोडले.
प्रथम कामांतक बाण सोडला, जो सात्विकाने सत्व बाणांनी परतवून लावला. मग वक्रदंताने क्रोधाचा परीघ बाण फेकून मारला जो शांतीबाणाने सात्विकाने निष्फळ केला. मग वक्रदंताने लोभाची गदा उचलली आणि सात्विकाचा हृदयभेद करण्यासाठी फेकली. ज्याला वैराग्यबाणाने सात्विकाने चुर्णीत केले. गदा तुटल्यानंतर मोहाची ढाल एका हातात आणि गुप्त शस्त्र हृदय भेदण्यासाठी दुसऱ्या हातात घेऊन वक्रदंत पुढे आला. याला विवेकाच्या तिखट बाणाने परास्त करताच वक्रदंत मागे गेला. तत्पश्चात वक्रदंत वासनेचे वज्र अहंकाराच्या वेष्टनात घेऊन अत्यंत वेगात सात्विकाचा जिव्हार भेदण्यासाठी पुढे धावला.
सात्विकाने आपल्या सात्विक तेजाच्या तिखट माऱ्याने वज्र विंधले आणि त्याचे चूर्ण केले. यानंतर वक्रदंत चारी मुक्तीची वाघनखे घेऊन सात्विकाच्या हृदयाचा वेध घेण्यासाठी त्या रोखाने धावला. सात्विकाने मग शस्त्र खाली टाकून लत्ता प्रहार करून वक्रदंताला पाडून वाघनखे ध्वस्त केली. सात्विकाने मग वक्रदंताला गर्जून आव्हान दिले आणि ते पाहून वक्रदंत देहलोभाच्या भीतीने अर्थात देहाच्या मोहापायी पळाला. पळताना अभिमानाचा मुकुट पार गळून पडला. वक्रदंत उलट्या पावली पळाला. अर्थात सात्विक पळणाऱ्याच्या पाठी लागणारा नव्हताच म्हणून सात्विकाने त्याला पळून जाऊ दिले.
(वरील दोन्ही परिच्छेद नाथांच्या शब्दात जसेच्या तसे मांडलेत. यामध्ये सात्त्विकतेची वा समस्त परामार्थातील साधकांची वा एकूणच संसारातील सर्व सामान्य जनांची परीक्षा जेंव्हा जेंव्हा षड्रिपु घेतात, तेंव्हा प्रत्येक रिपूशी वा अवगुणांशी कोणकोणत्या शस्त्राने कसे लढावे आणि षड्रिपुना कसे परतवून लावावे याचे सात्विक आणि वक्रदंत यांच्या दृष्टांत माध्यमातून सुंदर रित्या नाथांनी मांडलंय. )
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२९/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment