श्रीराम श्रीकृष्ण संवाद १२
देवी रुक्मिणी : मग यावर उपाय काय. कारण मार्ग आहे, पण भरकटण्याची शक्यता सुद्धा तितकीच आहे, अश्या मार्गावर चालणे हे घोरच आहे, हे जाणून काही उपाय असेलच, तर तोदेखील वदावा योगेश्वर.
श्रीकृष्ण : अनेक उपाय अनेक मार्ग असतानाच चूक होण्याची शक्यता जास्त असते, आणि यातील काही मार्ग हे कठोर परिश्रम करायला लावणारे आहेतच, पण त्यात यशस्वी होण्याची शाश्वती देता येणार नाहीच, याउलट अपयश आलंच तर जीव अनेक जन्म मागे जाऊ शकतो.
म्हणूनच सर्व काळी सर्व वेळी सर्व प्राणीमात्रांना सहज सुलभ असं एकमेव साधन सर्व साधू सज्जनांनी, ऋषी मुनी, संत यांनी हा मार्ग मानवास चालण्यास अगदी सुकर करून दिला. मानवाला नरापासून नारायणापर्यन्त आत्मोन्नतीचा साधा सरळ उपाय हाती दिला आहे.
भगवंतानी सर्व जग निर्मिले आणि स्वयंप्रेरणेने जगास स्वचालीत केले. यात सर्व प्रकारे एकमेव साध्य अर्थातच मोक्ष, मुक्ती म्हणजेच भागवतप्राप्ती. वेद पुराण या माध्यमातून अनेक उपाय पराशक्तीला प्राप्त करण्यासाठी योजून देण्यात आले. पण कालानुरूप त्यांचे महत्व व त्यासाठी करावे लागणारे कष्ट असाध्य होत जातील. हे देखील त्यांनी जाणले होते.
कदाचित हे संत महंत ऋषी मुनी यांनीसुद्धा जाणले असावे. याच दृष्ट्या लोकांनी एक असा उपाय मानवास सांगितलाच नव्हे त त्यावर स्वतः चालून उदाहरण घालून दिले, की या उपायाने काय साध्य होऊ शकते. यात त्यांना अर्थातच भगवंतानी नेहमी साथ दिली.
भगवंतांना सर्वात प्रिय अशी एकमेव गोष्ट जी त्यांच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही रुपात त्याचे अस्तित्व दर्शवते ते म्हणजे भगवंतांचे नाम. नामाचे स्मरण नाम घेणाऱ्याला साधकाचा दर्जा प्राप्त करून देतं. जे सहज साध्य आणि साधन एकाच वेळी दोन्ही आहे ते म्हणजे नाम.
याच नामाच्या आधारावर प्रल्हाद, ध्रुव, हनुमंत, नारद, विभीषण असे अनेक भक्त भगवंतांच्या सानिध्याला प्राप्त झाले. भगवंताच्या नामावर हे देखील निर्गुण रुपात अमरत्व प्राप्त करते झाले. यांनी आपल्या नामावरील निष्ठेच्या जोरावर
भगवंताला आपल्या हृदयात विराजमान करून दाखवले. यांनी नामाच्या निष्ठेच्या आधारे अनेक संकट व दुर्धर परिस्थितीलादेखील आपल्यासमोर झुकवून दाखवलं.
भगवंत स्वतः नामाचा महिमा स्वमुखे सांगत होते आणि भगवंत स्वतः श्रोता होऊन श्रवणभक्तीचा आनंद घेत होते.
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment