श्रीराम श्रीकृष्ण संवाद १४
जणू कलियुगाचा सर्व पटच श्रीकृष्ण समोर उलगडून दाखवत होते आणि सर्व श्रोते अचंबित होऊन पहात होते.
श्रीशंकर : आपण इतक्या सहजतेने हे सर्व चित्र सुस्पष्ट स्वरूपात मांडत आहात. आम्हाला अचंबा वाटतो की हे चित्र आपण सृष्टीस्वामी म्हणून बघत आहात की एक द्रष्टा म्हणून हा उलगडा होत नाहीये.
श्रीकृष्ण : भोलेनाथ आपण म्हणता त्याचं उत्तर मी देतो. आम्ही श्रीकृष्ण जन्मात जस जसे मोठे होत गेलो तस तसे द्वापारयुगाच चित्र पालटत गेलं.
देवी पार्वती : अर्थात
श्रीकृष्ण : देवी अस बघा की आता त्रेतायुग संपून द्वापार सुरू झालं. त्या वेळी, सर्व सुरळीत होत असा भाग नाही. म्हणजे देवशक्तीना दानवी शक्ती वचकून असत. परंतु हे सर्व हळू हळू बदलत गेले जसा काळ पुढे सरकत गेला. ज्यावेळी हे सर्व सुस्पष्ट होत गेलं की, आता देवाची भीती राहिली नाही वा राहणार नाही. भक्तीचा क्षय होईल वा होत जाईल त्यावेळी आम्हाला प्रवेश घ्यावा लागला. धर्मावर म्हणजेच सत्यावर वा चांगुलपणावर विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हावा याकरता.
असुरवंशशक्ती ज्या पूर्वी निज स्वरूपात होत्या. तसच ज्या स्पष्ट कार्यरत होत्या, त्या मानवी रुपात प्रकट होऊन येऊ लागल्या. पूर्वी असुर घरात जन्म घेणाऱ्या या शक्ती आता अगदी उच्च कुळी सुद्धा जन्म घेऊ लागल्या. दुसरं जे मुख्य कार्य सुरू झालं ते म्हणजे त्यांचं प्रसंगोपात एकत्रीकरण हे सूत्रबद्ध होऊ लागलं. पूर्वी हे असुर अगदी रावणासह सारे पुण्यवान माणसाला वा शक्तींना भिऊन असत. म्हणून तर लक्ष्मणरेषा पार करण्याची हिंमत तो करू धजावला नाही. याच महत्वाच कारण म्हणजे सूरशक्ती वा पुण्यात्मे हे आपलं अस्तित्व राखून होते. त्यांना त्यांच्या त्यांच्या शक्तीरूपात वावर करण्यास वाव होता.
आम्ही प्रवेश केला त्यावेळी हे चित्र धूसर होतं. असुर आता मानवी रुपात येऊन साधुसज्जनांना त्रास देऊन उच्छाद मांडू लागले. त्यासाठी त्यांनी थेट घरात प्रवेश केला होता. एकाच बापापोटी संत व दुर्जन जन्म घेऊ लागले होते. यावर प्रतिबंध करणं शक्य नव्हतं. त्यावर उपाय एकच होता तो म्हणजे अश्या शक्तींचा नायनाट करणं. त्यांना पूर्णपणे संपवण.
याचसाठी आम्हाला त्यांना कधी स्वतः, तर कधी पांडवरूपात संपवण भाग पडलं. त्यासाठी ज्या युक्त्या प्रयुक्त्या वापरण शक्य होत, त्या सर्व आम्ही यशस्वीपणे वापरल्या. प्रसंगी माघार घेतली. वेळ पाहून , सावधगिरीने कार्य केले. ज्या वेळी ज्याचा मृत्यू लिहिला असेल त्यावेळीच त्याला वधाव लागलं. ज्याचा योग नव्हता त्याला सोडावं लागलं. प्रतीक्षा करावी लागली. जी आम्ही केली शिशुपाल, जरासंध आणि अगदी दुर्योधनाच्या मृत्यू साठी सुद्धा.
देवी रुक्मिणी : एक प्रश्न आहे की असुर वा दानवी शक्ती या नेहमी शेवटापर्यंत बलवान भासतात आणि पुण्यवान कमी शक्तशाली वा कमी बलशाली भासतात. जो काही भेद असेल तो समाप्तीला समजतो वा स्पष्ट होतो. परंतु तोपर्यंत पारडे अधमाचे जड का भासत, याच सविस्तर उत्तर आपण द्यावं.
श्रीकृष्णांनी स्मितवदन शून्यात दृष्टी लावली, काही क्षण आणि उत्तर देण्यास आरंभ केला.
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment