श्रीराम श्रीकृष्ण संवाद ११
देवी : प्रथम भक्तीची अजोड किमया म्हणजे काय , ती का घडवावी लागते हे वदावे. तदपश्चात मी दुसरा प्रश्न विचारीन. या शंकेच समाधान व्हावं ही इच्छा आहे.
श्रीकृष्ण : जरूर कथन करतो, ध्यानपूर्वक ऐक. जीव परमेश्वरापासून विभक्त होतो तो पुन्हा मूळ स्थानी, म्हणजेच ईश्वरी तेजाकडे, जोडला जावा, यासाठी त्याच जीवाला पूर्णतः स्वतःहून यत्न करावा लागतो. हा यत्न एकप्रकारे आत्मिक यज्ञ आहे. कारण सर्व नियमांच्या पार स्व ला नेऊन तिथे स्व चा विसर करावा लागतो अथवा स्वतःला विलीन करावे लागते.
हे तेंव्हाच शक्य आहे, जेंव्हा आपण आत्म विसरून परमात्म तत्वाचा विचार करतो. त्याच वेळी आत्मज्ञानाने परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. ही लीनता, ही विनम्रता, ध्यासाने शक्य आहे. हा ध्यास म्हणजेच भक्ती.
निजध्यानी विसरून स्वतःला
परमध्यानी झोकून द्यावे
अनेक मार्ग प्रभूपदी नेती
परी भक्तिमार्गी सर्वस्व द्यावे
हरिहर रूपे एकच असती
भास दोन बीजे जरी ती
तुज ठावे ना, आम्हांसी ठावे
भज कोणा मजप्रत सर्व येती
रीत भक्तीची उफराटी बघ
द्यावे जितुके घेत जावे
मिळता सारे सुटतची जाते
भक्त होणे याची भावे
मोह सुटला जेंव्हा जाणा
नौका पार तयाची लागे
परी न हे पुरेसे आहे
जोड भक्तीची द्यावी लागे
अनेक मार्गी भेट प्रभूची
जरी अनेक उपाय असती
नाम तयाचे घ्यावे श्वासे
जन्मजन्मीची कर्मे पुसती
कर्मफलाचा करून त्याग
निजधर्माला उंचावे जनी
परी याहूनी श्रेष्ठ असे जगी
नाम प्रभूंचे असुदे मुखी
कर्मफलाचा हा फेरा चुकवण्यासाठी त्याहून श्रेष्ठ असे कर्म होणे गरजेचे आहे. कर्ममार्गी राहून जे साध्य होईल त्याला अनेक जन्म लागू शकतात, सर्व कर्मबंधन सुटण्यासाठी व त्यातून मुक्त होण्यासाठी. त्याचप्रमाणे इतर अनेक मार्गानी देहबंधनातून मुक्त होता येते. हे सर्व करण्यासाठी या मार्गावर देहाला मनाला व पर्यायाने आत्म्याला प्रवाहाविरुद्ध नेण्याची गरज आहे. म्हणून म्हटलं घडवाव लागतं. यात प्राणीमात्राची कसोटी लागते. यात एखादी चूक वा क्षणिक मोह हजारो वर्षांच्या तपसेवेचा विनाश करू शकतो.
हे सर्व कष्टदायक व कालापव्यय करणारे मार्ग आहेत. त्यांचं महत्व कोणत्याही कारणे कमी होऊ शकत नाही. पण यामध्ये योग याग यासारखे अष्टांगसिद्धी देणारे मार्ग बहुतेक वेळा देहबुद्धी वाढवण्याऐवजी देहबुद्धी वृद्धी करू शकतात. यातील काही प्रकार मृत्यू पुढे नेऊन देहाचा मोह वाढवू शकतात, नव्हे वाढतोच.
देवी रुक्मिणी : मग यावर उपाय काय. कारण मार्ग आहे, पण भरकटण्याची शक्यता सुद्धा तितकीच आहे, अश्या मार्गावर चालणे हे घोरच आहे, हे जाणून काही उपाय असेलच, तर तोदेखील वदावा योगेश्वर.
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment