श्रीराम श्रीकृष्ण संवाद १५
श्रीकृष्णांनी स्मितवदन शून्यात दृष्टी लावली, काही क्षणच आणि उत्तर देण्यास आरंभ केला.
श्रीकृष्ण : असुर शक्ती या नेहमी तमोगुणाच्या प्रभावाखाली असतात. या तमोगुणात ऊर्जा प्रचंड असते. या ऊर्जा सुद्धा तामसी शक्तीच्या प्रभावात येतात. तमोगुण हा नेहमीच नकारात्मक असतो अस नाही. त्याचा वापर प्राणी कशा प्रकारे करतो यावर त्याचा सदुपयोग वा दुरुपयोग अवलंबून असतो.
सहसा असुर वा दानवी मानसिकतेच्या व्यक्ती या प्रभावात येतात. त्या उर्जेतील शक्तीच्या सहाय्याने प्राणी अनेक गोष्टी करताना दिसतो, अनेक बाबतीत बलवान आहे असं वाटत. हा भास असतो. हा तामसी प्रभावाचा फुगा फुटेपर्यंत आपल्या शक्तीचा हरप्रकारे प्रभाव दाखवणारच. हा असा प्रभाव किती काळ पर्यन्त राहील हे त्या शक्तीच्या आणि त्या प्राण्याच्या पूर्वपुण्याईवर अवलंबून आहे.
या तामसी शक्तीपूढे तप, पुण्य, सात्त्विकता या तेजाने उजळून निघालेला जीव उभा ठाकतो, त्यावेळी हा सामना सुरवातीस तामसच जिंकेल असाच भास होतो. किंवा तसच चित्र दिसायला लागतं. तसा तामसाचा प्रभाव अल्पजीवी असतो याच एक मुख्य कारण, या रागाच्या प्रभावाखालील व्यक्ती नेहमी चुकीची पावलं टाकते. चुकीच्या कर्मबंधात अडकलेली व्यक्ती , पूर्वपुण्याचा साठा संपेपर्यंत यशस्वी होईल असाच भास होतो.
पण जस कोणतंही कर्म आपलं फल दिल्याशिवाय शांत होत नाही, त्याचप्रमाणे याही बाबतीत होतं, नव्हे होणारच. ही तामसी ऊर्जा जितक्या लवकर तप्त होते तशीच व तितक्याच लवकर नष्ट होते. याविरुद्ध सात्विक ऊर्जेचा प्रभाव दिसायला मंद असतो, चालायला सावकाश वाटतो, व प्रकाश मिणमिणता वाटत असला तरीही त्यामागे ईश्वरी अधिष्ठान असते. तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व रुपात त्यामागे उभा असतो. त्यामुळे यामार्गाने जाणाऱ्याने निश्चय ढळू न देणे हे श्रेयस्कर असते. अन्यथा ज्या वाटेवर वा ज्या क्षणी ईश्वर सहाय्यासाठी सिद्ध असेल त्याक्षणी आपणच कष्ट करण्यात कसूर केली असेल, हे जाणवेल.
श्रीशंकर : सर्व काळी आणि सर्व वेळी ईश्वर कसा व कुठे कुठे पाठीशी उभा राहील व यासाठी प्राणीमात्राने काय करावे म्हणजे या सात्विक छायेच्या प्रभावात प्राणी सर्वकाळ राहील, हे कृपया विस्तृतपणे कथन करावे.
यावर श्रीहरी क्षणाचाही विचार न करता वदते झाले.
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment