श्रीराम श्रीकृष्ण संवाद १०
श्रीशंकर जे स्वतः त्रिगुणातीत आहेत ते स्वतः प्रश्न करते झाले.
श्रीशंकर : गुणात्मक वा गुणातीत म्हणजे काय यदुवीर.
श्रीकृष्ण : सांगतो. गुण म्हणजे उत्तम गोष्ट, जी आपली पातळी उंचावते. अश्याच उत्तमोत्तम गोष्टी आयुष्यात मिळवत गेलं तर आयुष्य हे समृद्ध होतच पण जीव पुढे पुढे जात रहातो. उत्तम गुण असलेल्या गोष्टी अंगीकारत गेलं की, त्याचे गुणधर्म मनाला चिकटतात व त्याचा परिणाम उत्तम विचार करण्यावर होतो. उत्तम विचार हे सर्वात उत्तम धन आहे.
देवी रुक्मिणी : धनापेक्षाही उत्तम धन ?
श्रीकृष्ण : अर्थातच. मनुष्य उत्तम विचारधन असलेला असेल, तर कोणत्याही परिस्थितीत पुढे आणि वरच्या वर्गाकडे जाण्याचा प्रयत्न करेल. आज उत्तम परिस्थितीत असलेला प्राणी कालांतराने व कर्मफल संयोगाने विपरीत परिस्थितीत अडकला तरीही कधीही हीन दर्जाचा वा नकारात्मक विचार करणार नाही.
जस स्वतः श्रीराम आणि देवी जानकी किती विपरीत परिस्थिती आली तरीही त्यांनी कधीही नकारात्मक विचार वा आपल्या दर्जापेक्षा खाली नेणारे वा जाणारे निर्णय घेतले नाहीत. यालाच गुणात्मकता म्हणतात.
आता हीच गुणात्मकता मनातून अंतरातम्यात उतरली की प्राण्याची गुणात्मक प्रगती होते. जस भौतिक जगात हीच गुणात्मक वाढ मानवाला भौतिक प्रगती घडवते. तद्वत ज्या वेळी याच गुणात्मकतेचा वापर अंतरातम्यातून परामात्म्याकडे अर्थात ऐहिक सुखाविपरित पारमार्थिक ज्ञान, भक्ती यांच्याद्वारे चिरंतन चेतनाशक्तीच्या स्रोताकडे जाण्यासाठी वापरला जातो, त्यावेळी आत्मोन्नती ही शाश्वत सत्य होते आणि त्या प्राप्तीच्या मार्गावरील मार्गस्थ भक्त होतो.
याच प्रवासात प्राणी आपल्या अनेक जन्मातील पातकांचा लीलया अंत करू शकतो. नव्हे ती पापं आणि त्याचे दोर एक एक करून तेंव्हा सुटण्यास सुरवात होते, ज्यावेळी भक्त आणि भगवंत चिदानंदात एकरूप होत जातात. या एकरूप होण्यासाठी भक्तीची अजोड अशी किमया भक्ताला घडवावी लागते.
श्रीदेवी रुक्मिणी : इथे दोन शंका आहेत. अनुमती असावी
श्रीकृष्ण : बोल भार्ये.
देवी : प्रथम भक्तीची अजोड किमया म्हणजे काय , ती का घडवावी लागते हे वदावे. तदपश्चात मी दुसरा प्रश्न विचारीन. या शंकेच समाधान व्हावं ही इच्छा आहे.
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment