श्रीराम श्रीकृष्ण संवाद २
श्रीकृष्ण : आपण स्वयं हे जाणता की त्यातील बारा विद्या आणि अठ्ठेचाळीस कला आपणाकडून प्रारब्धवश प्राप्त झाल्या.
श्रीराम : आपल्या वाग्चातुर्याबद्दल आपण ख्यात होतात , हे जाणून आहोत, पण आज प्रत्यय सुद्धा आला. तशी आपल्याला आपले चातुर्य हर एक क्षेत्रात दाखवण्याची संधी मिळाली. त्यावरही कडी म्हणजे आपण त्याचे सोनं केलंत.
श्रीकृष्ण : कदाचित हा काळाचा महिमा असेल. आपला काळ हा सत्ययुग संपून त्रेतायुग चालू झाल्याचा काळ. जडदेही मानवाच्या वासनारूपाचे पूर्ण प्रकटीकरण झालेच नव्हते. त्यामुळेच आपल्याला अति दुष्ट दानव पाहण्यास मिळाले. परंतु मानवी रुपात तश्या अभिव्यक्ती अपवादानेच आढळून आल्या असतील.
आमच्या युगात सर्व दानवी शक्ती मानवी रुपात प्रकट होऊन आल्या होत्या. त्यादेखील एकाच घरात. जस की सदाचारी वसुदेव आणि त्यांचा मेहुणा दुराचारी कंस. बर कंसाच्या घरात
पिता राजा उग्रसेन सुशील आणि सदवर्तनी. पण पुत्र कंस. सख्खे चुलत बंधू कौरव व पांडव, माझा आतेभाऊ शिशुपाल, रुक्मिणीचा बंधू रुक्मि, व पिताश्री राजा भीमक आणि सरते शेवटी महाभारत युद्धात प्रत्यक्ष पितामह भीष्म व त्या विरुद्ध त्यांचीच पतवंड असलेले पांडव हे एकमेकांविरुद्ध. म्हणजे एकूणच सतत परीक्षा. म्हणून या सर्वात हुशारीचा कस लागण अपेक्षितच होतं. म्हणूनच सतत चौकस पण बुद्धी स्थिर तरीही विचारचक्र सतत फिरत ठेवणं गरजेचं होतं. म्हणूनच ते जमवावं लागलं नव्हे जमवलं.
श्रीराम : त्यासाठी लागणारे सर्व डावपेच आखण्यात आणि शत्रूचे डाव ओळखून ते निष्प्रभ करण्याचं जे तंत्र आपण जन्माला घातलंत त्यालाच जन पुढे कृष्णनीती म्हणूनच संबोधू लागले.
श्रीकृष्ण : काळाची पावलं ओळखून आणि नितीशी तडजोडी न करता, पण डावपेचात्मक रचना योजून, त्याद्वारे दुष्ट व खल प्रवृत्तींचे निर्दालन म्हणजेच कृष्णनीती. बर ही नीती फक्त राजकारणातच उपयोगात आणावी अस काही नाही. अगदी रोजच्या जीवनात सुद्धा व व्यवहारात सुद्धा याचा उपयोग होऊ शकेल. कसा तो ज्याने त्याने माझ्या चरित्राचा अभ्यास करून ठरवावं.
श्रीराम : हे सुयोग्य वदलात.
क्रमशः
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment