भाऊबीज म्हणून काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा २
सुभद्रा निघाली आणि तडक बाळरामदादाच्या महालाकडे रवाना झाली. इकडे कृष्णाच्या महालात
नारायण नारायण असा नामघोष करत नारद प्रकट झाले. कृष्णाला मिश्कीलपणे म्हणाले
नारद : मथुरानरेश आज बहिणीला आपल्या बद्दल विशेष प्रेम उत्पन्न झालेलं दिसतंय. जरा बघून येतो, येऊ का, म्हणजे आपली अनुमती असेल तरच.
कृष्ण : देवर्षी आपण याआधी अनेक वेळा कार्य करून मग अनुमती घेतली आहे, तेंव्हा आता हा विनय कशास. एक विनंती आहे ,
नारद : आज्ञा वासुदेवा आज्ञा करा
कृष्ण : नको विनंतीच , काही चूक करून घोळ घालू नका, कारण तो निस्तरण अवघड असतं.
नारद : नाही यदुनाथ नाही, आपण कथील्यानुसारच होईल. चिंता नसावी.
यदुवीर मनात विचार करतोय की नारद जाणार हाच मोठा घोळ आहे अजून वेगळा नाही घातला म्हणजे मिळवलं. असा विचार यदुवीर करेपर्यंत नारद जशी आपली आज्ञा अस म्हणून नारायण नारायण करत अंतर्धान पावतात.
इकडे बलरामदादांच्या महालात सुभद्रा पोहोचते.
सुभद्रा : दादा कसे आहात आपण आणि आपली प्रकृती क्षेमकुशल आहे ना.
बलराम: ये ये सुभद्रे, ये. तू कशी आहेस आणि अर्जुनाला घेऊन नाही आलीस. त्याच्यासह समस्त पांडवांची आणि कुंतीमातेची प्रकृती स्थिर आहे ना.
सुभद्रा: आमच्याकडे सर्व सकुशल आहे , अर्जुन गेलेत त्यांच्या भगिनीकडे भाऊबीजेनिमित्त गेलेत बाकी मातेसह समस्त पांडव उत्तम आहेत आणि कृष्णाचं खास लक्ष असत सर्वांवर त्यामुळे, असो. पण दादा तुम्ही खरच खूप हटलात. अगदी रया गेली चेहऱ्यावरची तुमच्या. वहिनी नाहीत तर इतकं लावून घ्यायचं का मी म्हणते. आम्ही येतो की माहेरी पण तिकडे सर्वजण मजेत असतात. कोणाला काही फरक पडत नाही. तूच आपला झुरतोस.
अर्थात इतकं।स्पष्ट बलरामदादांना बोलण्याची हिम्मत प्रत्यक्ष कृष्णाची सुद्धा नव्हती. पण सुभद्रा , लाडकी बहीण. तीच एकटी बोलू जाणे बलरामदादांना.
बलराम : सुभद्रे मुळात तू बहीण तू प्रेमादराने पाहणार त्यामुळे तुला तस भासण साहजिक आहे. पण मी एकदम तंदुरुस्त आहे. तूच थोडी बारीक झालेली दिसतेस.
इतक्यात नारदमुनी तिथे प्रकटतात.
नारद : नारायण नारायण, बहीण भावाच्या प्रेमात व्यत्यय आणला नाही ना.
सुभद्रा : नाही नाही एकदम वेळेवर आलात आपण,
सुभद्रेच्या वाक्याने नारद चिंताग्रस्त होतात. पण सुभद्रा लगेच म्हणते.
सुभद्रा : माझ्या म्हणण्याचा मतितार्थ इतकाच की आपण त्रैलोकी संचार करता. त्यामुळे इकडील सर्व आपणास ठाऊक असेल, या अर्थाने मी म्हणाले. त्यामुळे आपणच सांगा काय आहे हालहवाल येथील.
नारद : इथली परिस्थिती सुस्थितीत आहे आणि बलरामदादा चुकीला चूक म्हणणारे आहेत त्यामुळे रेवतीदेवीच वचकून असतात दादांना. त्यांचा एकही शब्द खाली पडू दिला जात नाही. वासुदेव पडले जगमित्र आणि जगताला सांभाळून घेणारे व त्या नादात अनेक क्लुप्त्या योजणारे. त्यामुळे त्यांना अनेक नाती सांभाळावी लागतात, एखाद्याने चूक केली असो वा नसो. काय करणार.
सुभद्रा: दादा म्हणजे कृष्ण त्याच्याच प्रकृतीकडे स्वतः दुर्लक्ष करतोच वर इतर कोणी लक्ष देत नाही असं तर सुचवायचं नाही ना नारदाना.
बलराम : ते तू आणि कान्हा बघून घ्या. मी जिथे चूक वाटेल तिथे कान धरतो ज्याचे त्याचे.
सुभद्रा : मुनिराज आपणच जरा विस्तारपूर्वक व उदाहरण देऊन स्पष्ट करा.
नारद : नारायण नारायण, भगिनी आपण जाणता की मी महाविष्णूशब्दाबाहेर नाही आणि उगीच काही सांगून बसलो
तर रोष ओढवून घ्यायचो.
सुभद्रा : असा कसा रोष होईल. त्यातही आपण पदरचे थोडीच सांगणार आहात. त्यामुळे आपण निश्चिन्त रहा. काही उलट सुलट घडल्यास आम्ही आपल्या बाजूने उभे राहू. पण आपण सांगावे.
नारद पुढे सांगू लागतात.
क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
०९/११/२०११
Comments
Post a Comment