#काल्पनिककृष्णसुभद्राकथा
काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ९
नारद गात आहेत, एकतारी वाजवत आहेत आणि काळही डोलत आहे.
मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेऊन झाला आणि त्यानंतर कौटुंबिक गप्पा झाल्या. सुभद्रा अनेक दिवसांनंतर दोन्ही बंधूंना एकत्र बघत , भेटत आणि बोलत आहे. कारण मधल्या काळात युद्ध, राजकीय अस्थिरता या सर्व धामधुमीत जिथे नीट भेट पण होऊ शकत नव्हती तिथे गप्पा खूप लांबची बाब होती . पण खूप काळानंतर हा योग सुद्धा जुळून आला होता.
हे सर्व चालू असतानाच प्रतिहारी संदेश घेऊन आला की दिपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मथुरेतील मुख्य चौकात खास कार्यक्रम जस नाचगाणी इत्यादी ठेवले आहेत. अर्थातच बलरामदादा कृष्ण आणि सुभद्रा हे दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा मुख्य समारंभासाठी खास अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहेत.
सुभद्रा या संदेशाने हर्षभरीत झाली. चला आता संध्याकाळ पासूनचा समय किती मजेत आणि आनंदात जाणार. त्यासाठीची तयारी करण्यास्तव सुभद्रा लगबगीने आपल्या कक्षाकडे निघून गेली. कृष्ण आणि दादा दोघेसुदधा त्याच तयारी प्रित्यर्थ आपापल्या महालाकडे निघून गेले.
इकडे मथुरेत आधीच यमद्वितीया साजरी करण्याची पूर्ण तयारी सुरू आहे. ती तयारी करण्यासाठी सामानाची जमवाजमव करणं, मांडव उभारणी करणं , पताका लावणं, देवळाच्या आवारात दिपमाळा लावणं, मंदिरात दिव्याची रोषणाई करणं, येणाऱ्या मंडळींसाठी बसण्याची व्यवस्था करणं, यात खासे मंडळींना बसण्याची खास व्यवस्था करणं, त्यांच्या मानानुसार उंचीवर बसण्यासाठी तश्या बैठका खास तयार करून घेणं, मांडवाला व एकूणच सर्व परिसराला सुशोभित करण्यासाठी माळा, तोरणं, विशेष अतिथींसाठी हार व श्रीफळ या सर्वांच्या तयारीत अनेक माणसं गुंतली होती. अर्थातच एका विस्तीर्ण मोकळ्या पटांगणात आचारीवर्ग भोजनव्यवस्था चोख करण्यात गुंतला होता. जिलबी, रसमलाई, रबडी, गुलाबजामुन इत्यादी शाही गोड पदार्थ व इतर अन्नपदार्थ तयार करण्यात, खास करून बोलावण्यात आलेले आचारी पूर्ण तयारीनिशी गुंतले होते.
कोणालाही उसंत नव्हती. किंबहुना प्रत्येकाला हा कार्यक्रम आपल्या लाडक्या राजाच्या कुटुंबाबरोबर साजरा करण्याची व तो उत्तम करण्याची नशा चढली होती. प्रत्येकजण आपलं काम इतरांपेक्षा उत्तम व्हावं या चढाओढीत होता. इतकी माणसं कामाला लागली असूनसुद्धा प्रत्येकाच्या कामात एक सुसूत्रता होती. कोणाचं काम आधी व कोणाचं त्यानंतर याची जणू रंगीत तालीम घेऊन मगच काम सुरू केलय, इतक्या सुयोग्य पद्धतीने काम सुरू होतं आणि तेही चोख.
अश्या प्रकारच्या कार्याला लागणारे नियोजन हा मथुरेचा खास गुणविशेष होता. गावा गावांचे प्रमुख, महाजन, वाड्या वस्त्यांचे मुखींया यांचा एकमेकांशी संवाद व ताळमेळ सुरेख होता आणि सुसूत्रता एक प्रकारे सुरेल होती. म्हणूनच अश्या कार्यात लागणार नियोजन, कार्यव्यवस्थापन, तयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात मथुरावासीय वाकबगार व चोख होते. तयारी तर जवळ जवळ होत आली होती. या सर्व तयारीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी महालातून वा मुख्य कारभाऱ्यांपैकी कोणी यावं असं सर्वांनाच वाटत होतं. हा विचार अनेकांच्या मनात आला आणि इतक्यात राजगृहा कडून निघालेला एक रथ मुख्य चौकाकडे येताना दिसला. सर्वांना हायस वाटलं. चला आपलं काम परस्पर झालं यात सर्व समाधानी दिसले. रथ चौकातील विष्णुमंदिरापाशी थांबला.
जय श्रीकृष्ण
क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
१६/११/२०१८
Comments
Post a Comment