#काल्पनिककृष्णसुभद्राकथा
काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा १०
रथ चौकातील विष्णुमंदिरापाशी थांबला. आतून एक उमदा, राजकुमार दिसणारा, सुंदर तरुण रथातून उतरला. चांगला उंचापुरा, लांब केस, डोक्याला मुकुट, कपाळावर उभं गंध, पाणीदार मोठे डोळे, तीक्ष्ण नजर , सरळ नासिका, राजबिंडा, गौर वर्ण, रुंद खांदे, अंगात आकाशी रंगाचा गर्भरेशमी अंगरखा त्यावर सुवर्णजडीत लोहाचे चिलखत, दंड मनगट यावर सुवर्णजडीत बाजूबंद गळ्यात सुवर्ण व मोत्याचे अलंकार , दोन्ही हातातील तीन तीन बोटात हिरे, माणक जडीत सुवर्णमुद्रा मनगटावर जाडसं सोन्याच कडं, कानात कुंडलं, कमरेला सुवर्णरत्नजडीत कमरपट्टा आणि रेशमी पितांबर.
रथ असा उभा होता की तो राजबिंडा तरुण लोकांकडे पाठ करून उतरला. कुठेही न बघता, सरळ नजर ठेवून मंदिरात गेला. सार्थयाला काही सूचना देऊन, मग त्याने पायऱ्या चढायला सुरुवात केली. एकूण सर्व पाहता अस वाटत होतं की हा राजपुत्र त्या मंदिरात नियमित येत असावा. कारण मंदिराच्या पायऱ्या चढतानाची त्याची सहजता तस दर्शवत होती.
त्या तरुणाला आत जाताना पाहून मंदिराचे पुजारी, जे खाली लोकांची चाललेली तयारी बघायला उतरले होते, लगबगीने मंदिराच्या दिशेने गेले आणि चपळाईने पायऱ्या चढून वर जायला लागले. त्यांना वर जाताना सर्वांनी पाहिलं. सर्वांची उत्सुकता शिगेला गेली होती. त्या सुंदर राजपुत्राला बघायला सारे जण उत्सुक झाले होते. एक मात्र खरं या हळू हळू कलत चाललेल्या दिवसाच्या कमी कमी होत चाललेल्या उजेडात त्या तरुणाच्या तेजामुळे जणू वेगळीच प्रभा आणली होती. त्याच्या अस्तित्वाची चाहूल जणू चराचराला लागली होती. परिसराला एक वेगळीच झळाळी आली होती.
प्रत्येक दृश्यमान वस्तू व जीव सजीव याच्या येण्याने हर्षभरीत झाले होते. जमलेला प्रत्येक मथुरावासीय अक्षरशः आ वासून बघत होता. कामाचा वेग मंद झाला आणि त्याला गती देण्यासाठी कोणीतरी त्याला ऊर्जा देणं गरजेचं होतं. पण या सर्वांची ऊर्जा नुकताच मंदिरात प्रवेश करता झालेला राजपुत्र घेऊन गेला होता. तरीही यावर उपाय करणं गरजेचं होतं. म्हणून मुख्य व्यवस्थापकांपैकी एक जण पटकन म्हणाले. चला रे तो राजपुत्र ज्यावेळी बाहेर येऊन खाली उतरेल त्यावेळी आपल्याला कळेलच. आता सर्वांनी काम सुरू करा. कारण कारभाऱ्यांना बोलावून सर्व तयारीची एकदा खातरजमा करून घ्यायची होती.
परत सर्व गर्दी पूर्ववत कामाला लागली. एका क्षणात सर्व चित्र पालटून गेलं. पुन्हा गुढ्या, तोरणं, हार तुरे, फुलं यांची देवघेव सुरू झाली. आचारी मंडळी जी जरा वेळासाठी थांबली होती, ती पुन्हा नव्या जोमाने खाद्यपदार्थ बनवण्याच्या मागे लागले. बांबूचे खांब इकडून तिकडे फिरू लागले. त्यांच्या उभारणीच काम पुन्हा उत्साहात सुरू झालं. या सर्व धामधुमीत लहान मुलं तर अगदी मोकाट जनावरांसारखी सैरावैरा पळत , खेळत, बागडत, खिदळत होती. कारण बहुतेक घरातील मोठी माणसं ही तयारीच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना बंधन घालणारं कोणीही नव्हतं.
या सर्वांचा हा उत्साह असा ओसंडून वहात असतानाच तो राजपुत्र मंदिरातून बाहेर येताना लोकांना दिसला.
जय श्रीकृष्ण
क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
१७/११/२०१८
Comments
Post a Comment