गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी २
‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे।
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे।
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे।
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे।
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके
संपूर्ण विश्वाचा चालक , ब्रह्मांडाचा नायक, निर्गुण निराकार वा सगुण साकार हा विश्व निर्माण करून त्याबाहेर दशांगुळे उरलाय, हे वैश्विक सत्य आहे. नाकारायच कारण नाही. कारण माझ्या जन्माआधी करोडो वर्ष सृष्टी होती आणि माझ्या नन्तरसुद्धा करोडो वर्ष ती असणार आहे. माझा यात सहभाग नगण्य आहे, म्हणून कोणाचाच नाही हे म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. विश्वात सर्व गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाहीत. पण म्हणून त्या नसतातच हे अतिशयोक्त आहे.
तार्किक आधारावर , विश्वाच्या पसऱ्यावर आणि ब्रह्मांडात} जिथे जिथे चेतन वा अचेतन अस्तित्वात आहे, त्या सर्वांचा निर्माता असणारच. कारण आधुनिक शास्त्र असच सांगत की, प्रत्येक गोष्टीला कारणमीमांसा असतेच असते. कोणतीही गोष्ट या विश्वातली अकारण नाही म्हणून त्याच आधारावर हे निःसंशय म्हणता येईल की, तो आहे, ती शक्ती आहे, त्याच अस्तित्व आहे. जे या विश्व निर्मितीला कारणीभूत आहे.
आता हा पसारा ज्याने निर्माण केलाय त्याने या सर्वांची निर्मिती मुळात एकटेपणा दूर करण्यासाठी केली. म्हणजेच कुठेतरी त्याला निर्मळ आनंद हवा होता. हाच आनंद त्याने संपूर्ण विश्वात निर्माण करून उल्हसित आणि आनंदी जगण्याचा मूलमंत्र दिला. विधात्याच्या याच इच्छेचा आदर व सन्मान करत गीतकार पाडगावकर सांगतात समस्त विश्वात हाच आनंद हेच चैतन्यमय तत्व भरून राहील पाहिजे आणि ते राहावं यासाठी लिहिलेली ही प्रार्थना आहे असं माझं मत आहे.
अश्या उस्फुर्त आनंदाच्या लहरींनी गे समस्त विश्व भरून राहू दे, हे परम ईश्वरा. समस्त विश्व म्हणजेच अवघं ब्रह्मांड जे तीन लोकांत व्यापल आहे ही वेदोत्पन्न कल्पना, कारण त्यांचे अनेक प्रकार अनेक ठिकाणी वाचावयास मिळतात. सप्त स्वर्ग वा सप्त लोक वा सप्त पाताळ. पण हे उपप्रकार पाहिले तर मूळ संकल्पनेतील लोक तीनच आहेत मुख्यतः स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ.
यात पृथ्वी हा खूप व्यापक अर्थाने वापरला गेलेला शब्द असावा. जे स्वर्ग म्हणजेच मर्त्य मानवाला मिळालेल्या चक्षुनी दिसत नाही ते सर्व स्वर्ग व पाताळ या प्रकारात येत असावं हा माझा कयास. बाकी जे जे दिसू शकेल वा इथून पुढे अनंतापर्यंत विज्ञान शोधून काढेल ते सर्व पृथ्वी या प्रकारात येत असावं.
तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.
ll जय सर्वसाक्षी सर्वभूतेशु जगदीश्वर ll
क्रमशः
© संकलन व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment