भाऊबीज म्हणून काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा
आज भाऊबीजेनिमित्त खास काल्पनिक कथा कृष्ण बलराम आणि त्यांची लाडकी बहीण सुभद्रा यांची. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, त्यामुळे फक्त रसास्वाद घ्यावा . पुराणात शोधू नये. जरी हे तिन्ही अवतारी पुरुष असले तरीही ( सुभद्रेला श्रीकृष्णांची लाडकी बहीण होण्याचं भाग्य ज्याअर्थी मिळालं त्याअर्थी ती सुद्धा एक अवतार होती हा निष्कर्ष मी काढतोय) , शेवटी देहधारी मानव असल्यामुळे देहाचे व मनाचे खेळ आलेच, याच कल्पनेने ही कथा गुंफली आहे.
स्थळ कृष्णाचं मथुरेतील राजगृह आणि भाऊबीजेच्या प्रित्यर्थ सुभद्रा इंद्रप्रस्थाहून खास रथाने मथुरेला आली आहे आणि अर्जुन अर्थातच आपली चुलत बहीण म्हणजेच दुर्योधनाची सख्खी बहीण दुःशला हिच्याघरी भाऊबीजेला गेलाय. इकडे सुभद्रेच्या दोन्ही वहिनी अर्थातच रेवती वहिनी आणि रुक्मिणीदेवींसह सर्वच राण्या आपापल्या भावांकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे प्रथमच सुभद्रेला भावांशी हतगुज करण्यासाठी मोकळीक मिळालेली आहे.
कृष्ण अर्थातच चतुर असल्यामुळे हे जाणून आहे की, आज भगिनी काही आपल्याला सोडणार नाही आणि सर्व चौकश्या होणार. तर त्या टाळायच्या कशा याच विचारात असताना, अचानक सुभद्रेच आगमन कृष्णाच्या महालात होतं. आणि
सुभद्रा : कसा आहेस भाऊ
( इथे अजून एक कल्पना की, बालरामाला दादा म्हटल्या कारणे कृष्णाला काय म्हणणार म्हणून कल्पना की सुभद्रा कृष्णाला भाऊ म्हणत असेल)
कृष्ण : जसा तू अर्जुनाला ठेवलंयस तसच मला रुक्मिणीने आणि सत्यभामेने ठेवलंय, अर्थातच मजेत.
सुभद्रा : पण भाऊ थोडा रोडवलास तू, आधीपेक्षा.
कृष्ण : सुभद्रे हे तुझं प्रेम आहे, ज्यायोगे तुला मी रोडवलेला भासतोय. पण प्रत्यक्षात थोडा सुधारलोय मी, तुझ्या वहिनीच्या प्रेमामुळे.
सुभद्रा : राहूदे हां राहूदे , आठ आठ जणी आहेत पण तुझ्या कडे लक्ष कोणाचंही नसत. मला नको सांगूस तू.
जे कृष्ण टाळू इच्छित होता तोच विषय सुरू झाला. पण चतुर कृष्ण विषय बदलण्यासाठी म्हणतो.
कृष्ण : भगिनी आज माझं प्रबोधन की काय. आणि अर्जुनाच काय. त्याच्याकडे तुझं लक्ष असत ना, की तिकडे पण द्रौपदी भगिनीच बघते. बघ हो जास्त प्रेम तिकडे जाईल आणि तुझ्या वाट्याला काहीच येणार नाही.
सुभद्रा : कृष्णा तू विषय फिरवू नकोस. मला आधी सांग खाण्यापिण्याची आबाळ करत नाहीस ना.
कृष्ण : आबाळ नक्कीच नाही, कारण आठ आठ ताट येतात, कुठलं खाऊ ह्या समस्येत असतो, त्यामुळे थोडा रोडवलो असेन तर माहीत नाही. तुला आज भाऊबीजेनिमित्ताने हे काय सुचतय. जितकं आणि जस तू माझ्या अर्जुनाकडे लक्ष देतेस, तितकंच माझी सुदधा बडदास्त ठेवली जाते. बर ते राहू दे दादाला भेटलीस की नाही. तोच थोडा रोडवलाय , कारण रेवतीवहिनी खूप आधीच माहेरी गेल्यात.
सुभद्रा : का रे
कृष्ण : वहिनीच्या माहेरी भावाने एक कार्य काढलंय, एकादशी नन्तर. त्यामुळे वहिनी दसऱ्याच्यानंतर लगेचच माहेरी गेल्यात. त्यामुळे जरा दादांकडे लक्ष दे. मी छान आहे मजेत.
सुभद्रा : अस आहे काय बर येते मी दादांच्या महाली जाऊन येते. पण तुझी सुटका नाही
आपण सुटलो हा आनंद फार काळ टिकेल अस वाटलं होतं कृष्णाला , पण सुभद्रेच्या शेवटच्या वाक्याने तो आनंद फार टिकणार नाही हे कृष्णाच्या लक्षात आलं
क्रमशः उर्वरित भाग संध्याकाळी / रात्री
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
०९/११/२०११
Comments
Post a Comment