भाऊबीज म्हणून काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ३
सुभद्रा : असा कसा रोष होईल. त्यातही आपण पदरचे थोडीच सांगणार आहात. त्यामुळे आपण निश्चिन्त रहा. काही उलट सुलट घडल्यास आम्ही आपल्या बाजूने उभे राहू. पण आपण सांगावे.
नारद पुढे सांगू लागतात.
नारद : वासुदेव बाहेर आधीच अनेक समस्यांमध्ये गुंतून आहेतच. पांडव आणि दुर्योधन आदी बंधूंमध्ये बेबनाव आहेच. तिकडे महाधूर्त आणि कपटी जरासंध, कंस वधाचा सूड उगवण्यासाठी प्रयत्नशील आहेच , विदर्भात देवी रुक्मिणी यांच्याशी, श्रीकृष्णांनी, बंधू रुक्मि यांच्या अनुमतीविना शुभविवाह केल्यामुळे रुष्ट आहेत आणि योग्य संधीच्या प्रतीक्षेत आहेतच, तिकडे शिशुपाल देवी रुक्मिणी यांच्याशी आपले ठरलेले स्वयंवर होऊ न शकल्यामुळे जरासंध दुर्योधन आदींच्या संपर्कात आहेच.
सुभद्रा : दुर्योधन का ?
नारद : देवी आपण जाणता कि आपला विवाह बलरामदादा यांना दुर्योधनाशी करून द्यायचा होता. पण अर्जुनाच्या त्रिदंडी सन्यास योगामुळे तो योग धुळीस मिळाला. यात यदुवीरांचा काही हात नाही हे जग मानायला तयार नाही. म्हणजेच आपण दोघांनी परस्पर हे घडवून आणले हे संभवत नाही.
सुभद्रा : इश्श्य. कृष्णाच्या संमतीनेच, जे घडले ते घडले. हे आपण जाणता. कारण आपण त्रिकाल ज्ञानी आहात.
नारद : नारायण नारायण, हे मी जाणतो. पण सांगण्याचा उद्देश हा कि, फक्त दोन विवाह आणि एक वध या तीन गोष्टींमुळे किती शत्रू निर्माण केलेत वासुदेवानी. नव्हे तर सर्व शत्रुंना एकमेकांच्या संपर्कात येण्याची संधीच दिली आहे. या सर्व घडामोडींमध्ये घरात तरी शांती हवी का नको. असो. कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण . म्हणजे आपण सर्वज्ञ आहात. मी अधिक उणे काय सांगू. आपण समजाल. नाहीतर नाव माझं यायचं, कळ मी लावली म्हणून. नाहीतरी एक उपाधी आहेच आम्हाला, कळीचा नारद. उद्देश वेगळा असतो आणि घडते भलतेच.
सुभद्रा : आम्ही जाणतो. बघतो आम्ही काय ते. निदान आता काही दिवस आम्ही आहोत तेंव्हा तरी भाऊची काळजी घेऊ आम्ही. आपण चिंता करू नये.
नारद : परंतु या सर्वात या नारदांचे नाव कुठे येऊ नये. इतकच
सुभद्रा : आपण काळजी करू नये. निश्चिन्त असावे.
नारद : नारायण नारायण , येतो आम्ही. शेवटी भगिनीसच चिंता असते हो भावाची.
नारद अंतर्धान पावतात आणि सुभद्रा कृष्णाच्या महालाकडे जायला निघते. कृष्णाला या गोष्टीचा अंदाज आलेला आहे कि, नारदांनी काहीतरी कान भरणी केली आहे. ते पुढील प्रसंगाच्या प्रतिक्षेतच आहेत आणि सुभद्रेचे आगमन त्यांच्या कक्षात होते.
कृष्ण : ये सुभद्रे. आज भाऊबीजेचा काय कार्यक्रम आहे.
सुभद्रा : कृष्णा तू खरंच जगाची चिंता करतोस आणि तुझं स्वतःकडे अजिबात लक्ष नाहीये हे लक्षात आलय माझ्या. म्हणूनच आता जितके दिवस मी आहे, निदान तितके दिवस तरी मी स्वतः तुझ्या प्रकृतीकडे लक्ष देणार आहे. मी असे पर्यंत तरी तुला नजरेसमोरून कुठेही जाऊ देणार नाही. खरं तर हे कार्य विवाहापश्चात धर्मपत्नीचं असत. पण असुदे. तुला आठ असल्यामुळे प्रत्येक जण हा विचार करत असेल. मी नाही बघितलं तर काय फरक पडतो दुसरी राणी बघेल आणि असं करता करता तुझ्याकडे कोणीच लक्ष देत नसेल.
कृष्ण : हे तुझं अनुमान झालं. खरतर माझ्याकडे जास्त लक्ष दिल जातं. म्हणूनच कधी कधी लांब जातो युद्ध व तत्सम काही काम वा काही उद्धिष्ट ठेऊन. इतकंच.
सुभद्रा : मला खात्री आहे कि हि सारवा सारव असावी.
कृष्ण : भगिनी इतकं प्रेम करतेस माझ्यावर कि, तुला हे सुद्धा लक्षात आलं नाही कि तुला अजून एक बंधू आहेत . आणि ते आपल्या दोघांहून ज्येष्ठ आहेत. तस्मात त्यांच्याकडे जास्त लक्ष पुरवणे गरजेचे आहे. तुझा हा एकांगी दृष्टिकोन आणि एकांगी प्रेम, ज्येष्ठ बंधू बलरामदादा यांच्या रोषास पात्र ठरू शकेल.
सुभद्रा : मी आताच ज्येष्ठ बंधू बलरामदादा यांच्या महाली जाऊन आले आहे आणि त्यांची पूर्ण चौकशी केली आहे.
कृष्ण : आणि त्यांनी जे सांगितलं त्यावर मी विश्वास ठेऊन आले. खरं ना. सुभद्रा तुझं लग्न मी तुझ्या मनाजोगत्या वीराशी करून दिलं असल्यामुळे, तुझा स्नेह माझ्याप्रती जास्त आहे हे मान्य करून सुद्धा तुझं बलरामदादा यांच्या प्रति असलेला कर्तव्य कनिष्ठ कस ठरत. मला असं वाटत कि, आपण सारेच ज्येष्ठ बंधू बलरामदादा यांना गृहीत धरून चाललो आहोत कि, ते पूर्ण समस्यारहित आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष पुरविणे फार गरजेचे नाही. म्हणून तू एक काम कर. आधी तुझ्या महाली जा, शांतपणे विचार कर माझ्या बोलण्याचा आणि तुला मिळालेल्या इतर माहितीचा. मग ठरव. कि, कोणाकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल.
संभ्रमात पडलेली सुभद्रा विचारमग्न अवस्थेत आपल्या महाली निघून जाते. इकडे कृष्ण आपण एक हल्ला यशस्वी परतवून लावला, या समाधानात आहे. तर दुसरीकडे नारद पुन्हा सुभद्रेच्या महाली, विचारमग्न सुभद्रेच्या समक्ष, प्रकट होतात.
क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
१०/११/२०११
१०/११/२०११
Comments
Post a Comment