Skip to main content

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३
‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे।
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे।
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे।
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे।
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके

 तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला सूर लावू दे. गीत म्हणजे पारंपारिक गीत नसून, तुझी स्तुती , शब्दांनी, मनाने , कौतुकाने , चेहर्यावरील आनंदाने, उल्हासाने, व्यक्त करू दे. इथे गीत गाणं म्हणजे खरा अर्थ मला कौतुक करू दे. तू हे सर्व माझ्यासाठी निर्माण केलं आहेस. हे मी जाणत असल्यामुळे त्याच मला विशेष कोतुक आहे. त्याबद्दलची कृतज्ञता मला व्यक्त करू दे. त्या बद्दलचे माझे भाव मला जमतील त्या पद्धतीने व्यक्त करू दे आणि ते तू त्याच भावाने स्वीकार. 
या प्रार्थने नंतर पाडगावकर या सृष्टिकर्त्याने घडवलेल्या सृष्टीचं वर्णन पुढच्या चार कडव्यात करतात. पहिल्या दोन कडव्यात या पृथ्वीवरील निसर्ग,  त्याची शोभा , तो नजारा, त्याची शान याच वर्णन करतात तर पुढच्या दोन कडव्यात आसमंताला व्यापून उरलेल्या नभाला, या आकाशाला कवेत बांधून त्या माध्यमातून  विधात्याच कौतुक करतात आणि हे करताना त्यांची लेखणी विशेष बहार उडवून देते. 
या पृथ्वीच्या निर्मिती प्रक्रिये पासून अस्तित्वात असलेल्या आणि प्रलयानंतरसुद्धा अस्तित्व टिकवून असलेल्या, म्हणजेच एका अर्थी सजीव सृष्टीच्याही आधी असलेल्या सागराची विशालता त्याच सौन्दर्य नेमक्या शब्दात वर्णन करतात. आपण कधी कधी जेंव्हा किनार्यावर उभे राहून समुद्राला बघतो , त्यावेळी किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा खरंच मन वेधून घेतात. नव्हे खिळवून ठेवतात. अश्या लाटा एका मागे एक जेंव्हा येऊन किनाऱ्यावर आदळतात आणि पुन्हा मागे जातात तेंव्हा मागून येणाऱ्या लाटा वा लाट त्यांना पुन्हा किनाऱ्याकडे घेऊन जातात. मला स्वतःला ते जन्म मृत्यू चक्राप्रमाणे भासत. आपण कर्म गती टाळण्यासाठी प्रयत्न करतो आणि पुन्हा मागील एखाद्या कर्माची पुढे येणारी लाट आपल्याला परत जन्माच्या किनाऱ्याकडे घेऊन येते. हेच चक्र अव्याहतपणे , नित्य , निरंतर, अखंड सुरु आहे. प्राण्याच्या अस्तित्वापासून ते अगदी जगाच्या अंतापर्यंत आणि असेल सुद्धा असच. 
निळा रंग हा पवित्रतेच,शुद्धतेच प्रतीक समजलं जात. विशेषतः जलाच्या बाबतीत जे जितकं शुद्ध , निर्मळ तितकाच त्याचा रंग निळाशार असतो. आकाशाचा रंग सुद्धा ज्यावेळी ते निरभ्र असतं , तेंव्हा निळा असतो. अश्या शुद्ध सकस निर्मळ पाण्याच्या लाटा आणि त्या एकेमकांवर आपटून त्याचा निर्माण होणारा फेस जणू शुभ्र तुऱ्याप्रमाणे दिसतं. अत्यंत शुद्ध प्रेम निर्व्याज भक्ती आणि मांगल्य यांचं प्रतीक त्यातून प्रतिबिंबित होतं. अश्या शुभ्र तुऱ्याची माळ घालून आलेल्या लाटा किती निर्मळ दिसत आहेत. पवित्र जलतत्व हे सृष्टीच्या पाच तत्वांपैकी एक प्रतीक पाडगावकर मांडतात. निळ्याशार लाटा असलेल्या सागराच्या रूपात. 
ll जय सर्वसाक्षी सर्वभूतेशु  जगदीश्वर ll
क्रमशः
© संकलन व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...