#काल्पनिककृष्णसुभद्राकथा
काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ६
श्रीकृष्ण विचार करतो हे नक्कीच नारदांचं कारस्थान असणार. आता याला सरळ उत्तर द्यावं तर आपण अडकणार. जर नाही द्यावं तर सुभद्रेचा जो आक्षेप आहे की आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही, तो बळावेल. आता काय करावं हा विचार करत असतानाच दादा कामानिमित्त निघून जातात आणि मग कृष्ण आयताच कचाट्यात सापडतो. पण वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणतो
कृष्ण : सुभद्रे एक काम करूया याच उत्तर मी तुला दोन सप्ताहानंतर देतो. तोपर्यंत तू माझी बडदास्त तुझ्या पद्धतीने जशी ठेवू इच्छितेस तशी ठेव.
सुभद्रा विचार करते की काही दिवस तर आहेत, काही विशेष बदल संभवत नाही. असा विचार करून ती कृष्णाला म्हणते,
सुभद्रा : जशी तुझी इच्छा कृष्णा. चल मग मी तयारीला लागते. खूप काम आहेत.
कृष्ण : ठीक आहे हरकत नाही. मी माझ्या राज्यकारभारातील काही बाबी हातावेगळ्या करून येतो.
सुभद्रा आत निघून जाते. कृष्ण कारभाऱ्याना सांगून आपल्या दोन खास दूताना बोलवून घेतो आणि कारभाऱ्याना त्यांना अंतःपुरात पाठवण्यास सांगतो. तसा हा प्रकार विरळा असला तरी सध्याच्या युद्ध आणि डाव प्रतिडाव या धुमश्चक्रीत दुर्मिळ नसल्यामुळे कारभाऱ्याना फार वावगं वाटलं नाही. त्यांना हे सुदधा माहीत होतं की कोणत्या कामासाठी कोणते दूत पाठवायचे.
कृष्ण अंतःपुराकडे प्रस्थान करतो. काही काळा नंतर कृष्ण आणि दोन्ही दूत अंतःपुराबाहेर येतात. त्यानंतर थोड्याच वेळात दोन दूत सोबत दोन दोन घोडेस्वार घेऊन मथुरा सोडून दूर आपल्या लक्षाकडे निघून जातात. त्यातील एका दूताकडे पिवळ्या रंगाच्या मखमली वेष्टनात गुंडाळलेला आणि दुसऱ्याच्या हातात गुलाबी वेष्टनात गुंडाळलेला सुंदर लखोटा आणि त्यात कृष्णाचा संदेश आहे. ठरल्याप्रमाणे दोघे राज्याबाहेर पडून दोन वेगळ्या वाटेने निघतात.
दूताना त्यांचा त्यांचा निरोप दिल्यानंतर कृष्ण महालाबाहेर पडतो आणि राजप्रसादाबाहेर जाण्यास निघतो. त्याच्या अंदाजाप्रमाणे दादा आता शस्त्रगृहाकडे असणार म्हणून कृष्ण तिकडे जाण्यास निघतो.
कृष्णाच्या या वेगळ्या पावित्र्यामुळे पंचाईत मात्र देवर्षी नारदांची होते. कारण त्यांना अपेक्षित होत काहीतरी रोमहर्षक बघायला वा ऐकायला मिळेल. पण शेवटी कृष्ण तो कृष्ण. त्याच्या कोणत्याही कृतीचा अंदाज लागणं वा लावता येणं कठीण तर होतच, पण त्याचा माग काढता येणं त्याहून कठीण. त्यामुळे त्याची काय योजना आहे, हे कसं जाणून घ्यायचं याच विचारात देवर्षी कृष्णासमोरच जाऊन उभे राहतात.
नारद : नारायण नारायण. प्रणाम यदुवीर.
कृष्ण : प्रणाम देवर्षी. बोला काय समाचार आमच्या शत्रूंचा वा सख्यांचा. काही खास निवेदन करण्यास आला आहात का. की, जरासंधाचं पुढील आक्रमण वा राधेची काही बात आहे. निःसंकोच मनाने सांगा आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत.
कृष्णाच्या या अचानक प्रश्नांच्या भडिमारामुळे नारद गोंधळून गेले आहेत. हे बघून कृष्ण मात्र मिश्कीलपणे स्मित करतो आहे. मोठ्या ऐटीत आपली मुरली काढून त्यावर एक छान स्वरातरंग वाजवत शांतपणे उभा नारदांकडे बघतो आहे. नारद अजून कोड्यात पडतात. विचारात हरवून जातात.
कृष्णमनाचा पार न लागे
ज्याच्या पार कुणी नच लागे
ज्याला गवसे कृष्ण हाती रे
त्यालाही त्याचा पार न लागे
जय श्रीकृष्ण
क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
१३/११/२०१८
Comments
Post a Comment