गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ५ व अंतिम.
‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे।
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे।
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे।
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे।
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके
सृष्टीची निर्मिती करताना अनंत हस्ते मुक्तपणे उधळून दिलेल्या सौदर्य प्रतिकांना किती बरं वर्णाव. त्याचा किती स्तुती पाठ गावा या कोड्यात पडलेल्या पाडगावकरांना पृथ्वी, जल, तेज, या पंचमहाभूतातील ३ प्रतीकांचा मागोवा घेतल्यानंतर, चौथं तत्व म्हणजे जे आकाश त्याला गवसणी घालावीशी वाटली. अर्थात फक्त प्रतीकात्मक अन्यथा आकाश कवेत घेऊ शकेल अशी एकमेव शक्ती समस्त ब्रह्मांडाला व्यापून आहे हे तेही जाणतात. उत्तररात्र अर्थात जिथे ब्रम्हमुहूर्त सुरु होणार असतो त्या आधीची वेळ. हि नीरव शांततेची वेळ. अश्या वेळी आकाशाची म्हणजेच पंचमहाभूतातील जगतव्यापी तत्वाची उत्तुंगपणे व्यक्त होण्याची वेळ. या वेळी समस्त सृष्टी एका वेगळ्या समाधिस्त अवस्थेत असते अश्या वेळी आकाशात जणू देवाची रोजची दिवाळी चालू असते.
सूर्यनारायण हे पृथ्वीच्या वेगळ्या बाजूला असल्यामुळे पडलेल्या रात्री मूलतःच आकाशात अस्तित्वात असलेल्या नक्षत्रांचे वा त्यातील ताऱ्याचे दिवे लागत आहेत. जणू कोणीतरी अश्या सुंदर समयी अवकाशातून या दिव्याना प्रज्वलित करत आहे. अश्या हळू हळू साकार होत असलेल्या नक्षत्ररूपी दिव्यामुळे आकाश सुंदर रूपात सजलेलं आहे. आणि अश्याच वेळी सकाळी पूर्ण फुलून फुल होण्याच्या प्रक्रिये करता रात्रीतच कळ्या जागत आहे. मला स्वतःला असं वाटत हे कळ्या फुलून फुल होण्याच्या प्रक्रियेला पाडगावकर प्रतीकात्मक स्वरूपात वापरत असावेत. प्रत्येक सजीवाची निर्मिती प्रक्रिया या आकाशतत्व रुपी नक्षत्रांच्या माध्यमधून कवींना मांडावयाचे असावी , वा त्यांना अभिप्रेत असावी. अर्थातच जगाच्या व सजीव सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया हि खरं तर किती सुंदर आहे आणि त्यातूनच हे जग पुढे पुढे जात आहे. त्यात सौन्दर्य पण आहे आणि विधात्याचा जग चालवण्याचा संकल्पसुद्धा अधोरेखित आहे.
हे सर्व गुणवर्णन चालू असलेला भक्त हा आपल्या भक्तीच्या पातळीवर परम ईश्वराची आराधना करताना त्याच्या अत्युच्च बिंदूवर शेवटी या सर्वाला पौर्णिमेची उपमा देतो. कारण दिवसरात्रीच्या या खेळातील सर्वोच्च दिवस जो मानला जातो तो अर्थातच प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा. कारण त्या दिवशी चंद्र हा पूर्ण फुलून आलेला असतो. त्याच ते सुंदर साजिर रूप मनाला भावात आणि नेत्राना सुखद वाटत. अश्या या सुखमय आणि मनभावन समयी जिथे जीव शिवाची गाठ पडण्याचा योग असतो, तिथे माझं या तुझ्या सृष्टीच्या निर्मितीपर मी सुरु केलेलं गाणं गीत (इथे मला स्वतःला असं वाटत कि गीत हा शब्द पाडगावाकर प्रतीकात्मक वापरतात. भगवंताची स्तुती जी गीतेत , कवनात, आरती स्वरूपात, प्रार्थनेत, अर्चनेत , नामात, नुसत्या डोळ्यांनी परम ईश्वराला बघण्यात अश्या कोणत्याही स्वरूपात व्यक्त होऊ शकते.
तर ती मला व्यक्त करू दे. या परमोच्च क्षणी मला तुझ्या निर्मितीने नटलेल्या आणि अंतरबाह्य तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा पदोपदी दिसत असलेल्या या जागाच आणि तुझ्या स्तुतीच हे गीत वा हा स्तुतिपाठ तुला अर्पण करू दे, तुझ्या चरणावर वाहू देत. इथे स्वर हे व्यक्त होण्याचं माध्यम या व्यापक अर्थाने, पाडगावकर वापरत आहेत असा माझा कयास आहे. सर्वत्र तूच भरलेला व भारलेला असताना तुझ्याच निर्मितीबद्दल तुझं कौतुक मला करू देत.
ll जय सर्वसाक्षी सर्वभूतेशु जगदीश्वर ll
© संकलन व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment