पुन्हा एक नवीन गीत आणि विश्लेषण
गीत रामा रघुनंदना याच विश्लेषण भाग १
गीत : ग दि माडगूळकर
संगीत : दत्ता डावजेकर
गायिका आशा भोसले
चित्रपट सुखाची सावली
रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल,
रामा रघुनंदना
मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन,
ही माझी साधना
पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ये जाताजाता
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
पुरेपणा जीवना......
गदिमांनी अजरामर केलेल्या गीताबद्दल लिहायचं म्हणजे साक्षात सूर्यावर लिहिण्याइतक कठीण काम. त्यांच्या प्रत्येक गीताचा जन्म हा फक्त आणि फक्त अजरामर होण्यासाठीच झाला. गीतरामायणानंतर साक्षात आधुनिक वाल्मिकी अस ज्यांचं नामाभिधान झालंय, त्यांच्या कडून प्रत्यक्ष शबरीच भक्तिमय कथन तेही गदिमांच्या व आपल्या आराध्याबद्दल ऐकणं म्हणजे स्वर्गसुखाची परमावधी. भक्तीच्या अतीव उंचीवर नेऊन ठेवलेल्या या गीताबद्दल माझे चार शब्द मी लिहितोय, पण प्रेरणा प्रत्यक्ष त्यांचीच. आपणच वाचून ठरवा.,
श्रीरामांच्या अनेक भक्तांमध्ये अत्युच्च श्रेणी जीने, आपल्या भक्तीने, प्राप्त केली ती म्हणजे शबरी. मातंग ऋषींची सेविका व शिष्या असलेली ही शबरी, मुळात एक राजकन्या होती. पण राज्याचा आणि संसाराचा मोह त्यागून मातंग ऋषींच्या सेवेत ती , प्रत्यक्ष राज्यपद त्यागून, रुजू झाली. अनेक वर्षे तिने आश्रमाची सर्व व्यवस्था बघण्यापासून ते अगदी मातंग ऋषींना त्यांच्या दैनंदिन कार्यात मदत करण्यापर्यंत सर्व काम निरपेक्ष भावनेने केली.
तिची मातंग ऋषींवर अपार श्रद्धा होती. याच श्रद्धेपोटी ती राज्य त्याग करून एक भिल्लींण बनून अर्थात आदिवासी बांधवांच्यात सामील।झाली. त्याच्याशीच एकरूप होऊन गेली, इतकी की तिचा उल्लेख , एक भिल्लींण नसूनसुद्धा, भिल्लींण म्हणून केला जाऊ लागला, नव्हे आजतागायत तसाच होतो. ही कदाचित तिच्या निष्ठेची पावती असावी. आपलं मूळ अस्तित्व स्वतःसुद्धा विसरून , ज्यांच्यासोबत राहात आहोत त्यांच्यातीलच एक होऊन राहायचं आणि त्यांनाही ते विसरायला लावून, त्यांच्यातील एक आहोत हे त्यांच्या मनावर ठसवायच , किती कठीण कार्य. पण शबरीने ते लीलया केलं.
जस जशी मातंग ऋषींची कृपा तिच्यावर होत गेली, तसतशी ती भक्तिमार्गात वर वर चढत गेली आणि हे इतकं सहज होत गेलं, जस फुल उमलावं तस, की ते शबरीलासुद्धा कळलं नाही. तिची निष्पाप वृत्ती तशीच शेवटपर्यंत टिकून होती. कदाचित त्यावेळच्या गुरुशिष्य परंपरेचा पायाच हा होता की, शिष्याला कळता कामा नये की तो एक एक पायरी, ज्ञानाची व भक्तीची चढत जातोय. हेच त्या परंपरेचं यश असावं, जे आज हरवून बसलोय आपण. असो. अजून एक गुण जो एक भक्त म्हणून तिच्यात जन्मापासून होता तो म्हणजे आपल्या आराध्याला उत्तम तेच आपल्याकडून वाहिलं गेलं पाहिजे.
तिने जी, श्रीरामाना उष्टी बोरं दिली, त्यावरून सिद्ध होतं. भिल्ल लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे तिला अनेक दुर्मिळ वनस्पती , फळ, कंदमूळ इत्यादींची म्हणजेच निसर्गदत्त औषधी व जीवनसत्व यांची उत्तम जाण होती. म्हणूनच तिला उत्तम बोरं कोणती आणि कनिष्ठ दर्जा असलेली बोरं कोणती हे ज्ञात होतं. त्यामुळेच तिने सर्वोत्तम बोरचं श्रीरामाना मिळतील याची विशेष काळजी घेतली.
क्रमशः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment