गीत रामा रघुनंदना याच विश्लेषण भाग २
गीत : ग दि माडगूळकर
संगीत : दत्ता डावजेकर
गायिका आशा भोसले
चित्रपट सुखाची सावली
रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल,
रामा रघुनंदना
मी न अहिल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन,
ही माझी साधना
पतितपावना श्रीरघुनाथा
एकदाच ये जाताजाता
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
पुरेपणा जीवना......
मातंग ऋषी आपल्या या शिष्येवर प्रसन्न असताना आणि तिच्या भक्तिमय निस्सीम सेवेची पावती देताना म्हणाले होते.
" हे शबरी तुझी परमेश्वर प्राप्तीची आस , जिद्द आणि तयारी ही याच जन्मो याच देही आणि याच डोळा पूर्ण होईल. प्रत्यक्ष जगतपालक महाविष्णू श्रीराम अवतारात जेव्हा या भूमीत येतील त्यावेळी तुला त्यांचं दर्शनच नव्हे तर सहवास लाभेल. तुझ्या भक्तीने ते अति प्रसन्न होतील. किंबहुना ते तुला भेटण्यासाठीच या आश्रमात येतील. तुझा अवघा जन्म सफल होईल. पण तुला त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. याकारणे तुझं प्रभुनामाचं अखंड चिंतन तू नित्य सुरूच ठेव. हे चिंतनच तुला तुझ्या ईश्वरापर्यंत, तुझ्या आराध्यापर्यंत घेऊन जाईल. अर्थात त्यांना तुझ्यापर्यंत घेऊन. "
हे ऐकल्यापासून शबरीने रामनामाचा ध्यासच घेतला, इतका की, तिला निजता, उठता , स्वप्नी, जागेपणी, नित्य कर्म करताना वा विश्राम करताना फक्त आणि फक्त रामनाम दिसू लागलं. स्वतःच अस्तित्व विसरणं म्हणजे काय याच उत्तम उदाहरण म्हणजे शबरीची भक्ती. त्या भक्तीची आर्तता सार्थ , परिणामकारक पण मोजक्या शब्दात मांडणं हे अत्यन्त दुरापास्त काम गदिमांनी लीलया केलय. अर्थातच शब्दमहर्षी होते ते.
श्रीरामाच्या अनेक नावांऐकी सर्वात उत्तम त्यांच्या कुळाचा आणि श्रीरामाचा गुणविशेष विशद करणारं नाव अर्थात रघुनंदन. कारण तसच आहे. मातंग महामुनींनी शबरीला प्रभुश्रीराम यांचं वर्णन करून सांगताना खास बाब सांगितली होती ती म्हणजे या समस्त भूतलावरील सर्वात उच्च असं इक्षवाकु राजाच्या कुळात रघुनावाच्या राजाच्या अनेक पिढ्यानन्तर म्हणजेच इक्षवाकु पासून ४२ वी पिढी ही श्रीरामाची आहे. (कदाचित म्हणून हे म्हणण्याची पद्धत पडली असावी की मागच्या ४२ पिढ्यात हे घडलं नाही किंवा ४२ पिढ्या नरकात जातील इत्यादी. त्या वंशाला रघुवंशी यासाठी म्हटलं जातं की प्रभुश्रीराम पिताश्री दशरथ यांच्या आधी महापराक्रमी व थोर राजा रघु होऊन गेले. त्यांच्या पराक्रम व आदर्श जीवनकार्याचाच प्रभाव पुढील अनेक म्हणजेच श्रीरामांच्या पिढीपर्यंत होता)
या उच्च कुळात जन्मलेले श्रीराम प्रत्यक्ष येऊन तुझा सर्वोद्धार करतील. हेच रघुनंदन नामाभिधान गदिमांनी आपल्या गीतात वापरून एक प्रकारे त्या कुळाचा उचित मान व मातंग ऋषींच्या उपदेशातील नाम यांचा सुंदर योग साधलाय.
आपलं आराध्य व आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीला एकेरी संबोधून बोलणं हा, त्या व्यक्तीचं आपल्या मनातील वा हृदयातील स्थान किती श्रेष्ठ आहे हे , सांगणं आहे. ( जस तो सचिन , तो सुनील, तो कपिलदेव अस आपण म्हणतो तेंव्हा त्यांचं आपल्या मनातील स्थान आपण दर्शवतो) त्यात शबरी या देही वयाने श्रीरामांपेक्षा ज्येष्ठ या नात्याने सुद्धा संपूर्ण गीत एकेरी भाषेत आहे.
क्रमशः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवल
Comments
Post a Comment