Skip to main content

नवरात्रात नववी माळ


आज नवमी व दशमी एकत्र असल्यामुळे आईचं वीर रसात्मक असुर मर्दन रुपाचं गीत

रणी युद्ध पेटले आज 
आली भवानी त्वेषात 
मातला महिषासुर जगात
हरले तिन्ही लोक त्याच्या त्रासास जी ... जी जी जी जी जी

महिषासुर मस्तवाल  झाला होता, वर ब्रम्हदेवांचा मिळवून माजला होता . समस्त जगताला त्याच्या दुष्ट कारवायांचा त्रास झाला होता

तिन्ही देव हताश झाले
ब्रम्हा वर देऊन पस्तावले
पुरुष नाही मारू शकले  
कारण वरच तैसा देऊन बसले  जी ... जी जी जी जी जी

वरच तसा दिला होता त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन स्वये ब्रम्हदेवांनी.  त्यामुळे श्रुष्टी पालक दशावतार धारी श्री महाविष्णू आणि त्रिनेत्र धारी त्रिशूळ, परशु धारी स्वयं श्री महादेव सुद्धा हतबल  हताश होते. आणि 

महिषाचा जन्मच तापाला
दैत्य कुळात कली आला
ताप देण्या समस्त जगताला
आला हा मानव प्राणी नाशाला  जी ... जी जी जी जी जी

तेहेतीस कोटी देव, स्वतः स्वर्गाधिपती देवेंद्र, वरुण, यांसह संपूर्ण देव सेना याने परास्त केली. स्वर्ग, सप्त पाताळ, प्रथ्वी, यासह संपूर्ण ब्रह्मांड त्याने जिंकून घेतले. आता मला कोण मारू शकेल. याचा एक मोठा समज असा होता की स्त्री ला हा अबला मानायचा, स्त्री या जगात , त्रिखंडात माझं काहीही वाकडं करू शकत नाही, म्हणून वर मागताना फक्त पुरुष मारणार नाहीत कोणत्याही रुपात असाच वर याने मागितला.

आईकडे टाहो पोचला
त्रास तिने जगाचा देखिला
रणांगणी उतरून यायला
तिला महिषाचा राग आला  जी ... जी जी जी जी जी

आईच ती जगासाठी आणि भक्तांसाठी काहीही करू शकणारी. शक्ती रूप नव्हे स्वये शक्तीच ती.

आई रूप शक्तीचे स्वतः
देखिले जगा त्राही होता
तापले जग या महिषाला 
आणि आईने निर्णय घेतला  जी ... जी जी जी जी जी

आईच होती ती. तिला रणांगणी उतरलेल पाहून महिषासुर प्रचंड हसला जणू भूकंप येईल असा. म्हणाला अग एक स्त्री तू काय माझ्याशी लढणार, तू तर अबला.  आई म्हणाली, मी आणि  अबला तू विसरलास की जेंव्हा मुलावर संकट येत तेंव्हा त्यांच्या रक्षणार्थ त्याच आईमध्ये बारा हत्ती, अठरा सिंह आणि छत्तीस वाघांचं बळ येतं.  आईला पुत्रासाठी तिन्ही देव पण हरवू शकत नाहीत त्यावेळी.  आणि 

आई झाली कालरूपीनी
रणचण्डि दुर्गा कात्यायनी
कालिमाता होऊन भवानी
विजेचे तेज घेऊन आली  जी ... जी जी जी जी जी

आईच्या त्या रुपाचं वर्णन करायला देवी शारदेकडे शब्दच नव्हते. श्रीगणेश सुद्धा आईच हे रूप बघून हरकुन गेले, स्वये श्रीमहेश्वर थक्क झाले आणि तिन्ही लोक बघायला जमले. 

आली अष्टभुजा  नारायणी
त्रिशूळ धनुष्य खड्ग परजूनी
परशु गदा वज्र हाती घेऊनि
उतरली साक्षात शक्तीरूपिणी  जी ... जी जी जी जी जी

साक्षात महाकाली अक्राळविक्राळ रूप धारण करून आली. आईला पाहून असुर महिषाचा माज अजून वाढला म्हणाला दाखवतोच या महिषाची कमाल आता. 

आईला देऊनी आव्हान
दश दिनी युद्ध करून
थक्क झाले देवही बघून
भ्यायले रूप आईचे  पाहून  जी ... जी जी जी जी जी

आईने दहा दिवस महिषाला खेळवला. आव्हानाला प्रतिआव्हान , शस्त्राला प्रत्युत्तर , अस्त्राला प्रतिअस्त्र याप्रमाणे दहा दिवस युद्ध झालं. सर्व असुर सेना आणि विरुद्ध बाजूला आई महाकाली अक्राळ रुपात एकटी.  आईने आतापर्यन्त शक्तीरूपात सुद्धा शक्ती न वापरता युद्ध केलं होतं.  शेवटी आईने शक्तीचा वापर करून महिषाला 

रणी लोवळून महिषाला
भवानी पेटली इरेला 
आता संपवूच याला
खूप संधी दिली याला
म्हणून निर्णय घेतला 
त्रिशूळ छातीस मारला
खड्गाने घाव घातला
उचलले हाती मुंडक्याला
रक्ताचा पाट तो वाहिला
महिषा  पातला धरणीला
जगाचा ताप दूर झाला
आईचा विजयघोष झाला
महिषाचा माजही उतरला
महाकालीचा गजर झाला
आईचा विजयघोष झाला
तोच हा दशमी दिवस आला
विजयादशमी म्हणती याला  जी ... जी जी जी जी जी

आईने दुष्ट दानवी दैत्य असुरनरेश महिषाला पार धुळीला मिळवला.  तेंव्हापासून स्रीरूपाला अबला म्हणण्याचं धाडस करणारांना अद्दल घडणार याच भान मी मी म्हणणाऱ्याना ठेवावं लागेल, हेच आईने दाखवून दिलं. 

आई महाकाली नमोनमः
आई कात्यायनी नमोनमः
आई कालरात्री नमोनमः
आई भवानी नमोनमः
आई महालक्ष्मी नमोनमः
आई योगेश्वरी नमोनमः
आई रणदुर्गा नमोनमः
आई रेणुकामाता नमोनमः
आई विंध्यवासींनी नमोनमः
आई वज्रेश्वरी नमोनमः
आई सप्तशृंगी नमोनमः
आई सर्व रूपिणी नमोनमः

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

© कवनकर्ता : प्रसन्न आठवले
अश्विन शुद्ध नवमी व  विजयादशमी शके १९४०
१८/१०/२०१८
चुकभुल असल्यास क्षमस्व 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...