भोग आणि ईश्वर ६१२ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)
शरण आणि स्मरण या दोन मार्गांनी कोणतीही व्यक्ती, निश्चितपणे, सन्मार्गाला वाटचाल करायला सुरुवात करू शक्ती. यामधे श्रद्धा आणि विश्वास यांचा हात धरला तर नक्कीच सामान्य माणूस, आपल्या संचीतातील एक एक पदर सोडवून घेऊ शकतो. ईश्वराच्या स्मरणात इतकी प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे की, त्यापुढे ब्रम्हांडातील कोणतीही शक्ती नक्कीच निष्प्रभ आणि शक्तिहीन होऊ शकते.
अर्थात म्हटलं तर हे सोपं आहे आणि म्हटलं तर कठीण आहे. म्हणजे कसं हे पाहूया. आपण आपल्या प्रापंचिक व्यापात असताना सुद्धा, ज्या ईश्वराने अर्थात परम पित्याने, आपल्या सर्व पुत्रांना या भूलोकी धाडून, संसार, जगरहाटी, भुलोकीचा वास, करण्यास पाठवून, इथून पुन्हा परत त्या परम पित्याकडे,. जाण्याची वाट वा मार्ग धरण्याची इच्छा, उत्पन्न होण्यासाठी, या जगताची अशाश्वत व्यवस्था निर्माण केली, त्याचं परम पित्याला विसरून, मायेचा हात हातात घेऊन, अनेक जन्माच्या मुक्कामाची सोय, त्याचेच पुत्र, स्वकर्माने करतात, त्या आपल्या पुत्राच्या स्थितीकडे पाहून, त्याचं ईश्वराची अवस्था काय होत असेल, याची कल्पना आपल्या सारख्या सर्वसामान्य जनांना येणं शक्य नाही.
कारण या ब्रम्हांडाची निर्मिती करताना, ही व्यवस्था, तात्पुरती अर्थात कायमस्वरूपी नाही, हे ईश्वराने अनेक पद्धतीने दाखवून दिलं आहे. म्हणजे जन्म आणि मृत्यूची व्यवस्था, जे या जगात आलं, ते नष्ट होणारच, ही व्यवस्था बालपण तारुण्य आणि वृद्धावस्था यातून, बदल आणि शेवटाकडे जाणारा नश्वर देह किती कवडीमोल होण्याची स्थिती, या जगतातील प्रत्येकाला शेवट आहे ही नैसर्गिक व्यवस्था, इत्यादी अनेक गोष्टींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की, ईश्वराला प्रत्येक अवस्थेत, माणसाला पदोपदी हा संदेश दिला आहे की, तुझ्या इतकी नाशवंत गोष्ट या जगतात नाही.
तरीही हा देह, या नश्वर गोष्टीत, माणूस जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्या देहाचा, त्याच्या असण्याचा, आपल्या कर्तृत्वाचा, कार्याचा, संपत्तीचा, मायेचा, क्रोधाचा, कामाचा अहं बाळगून, स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कस्पटासमान मानून, देह असेपर्यंत, हा अहं, हा दुराग्रह, हे सर्व पूर्वग्रह यामध्येच आपला जन्म आपलं आयुष्य, त्या छोट्याश्या आयुष्यातील सर्व क्षण वाया घालवतो. यातून या जन्मात काहीच मिळत नाही. हे माहीत असूनही, सुधारणा होत नाही.
बरं यामधे फक्त या जन्माचीच वाट लागते असही नाही. तर पुढील अनेक जन्म त्याचेच परिणाम भोगावे लागतात. पण प्रत्यक्ष परिणाम भोगाच्या रुपात समोर आले की, पुन्हा ईश्वराला दोष देऊन मोकळा होतो. म्हणजे मी केलेल्या कर्माचाच हिस्सा माझ्यासमोर येऊन उभा राहिला असताना, मी ते परिणाम भोगण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही. कारण परम दयाळू ईश्वराने, ते अपराध, दोष पोटात घेऊन, मला मोठ्या उदार मनाने, क्षमा केली पाहिजे.
या व अश्याप्रकरच्या अनेक भ्रमाबद्दल उद्याच्या भागात चर्चा करूया. पण तोपर्यंत माझा नामाचा नेम मी चुकू देणार नाही, हे ध्यानात ठेवून नाम घ्या.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment