भोग आणि ईश्वर ६०९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनाच्या या स्थितीला आपण स्वतःच जबाबदार असतो हे एकदा लक्षात आल्यावर, आपण सुधारून, निदान इथून पुढे नीट वागून, मनाची सद्यस्थिती योग्य पदावर आणली पाहिजे. असं खरतर सहज व्हायला हवं. पण असं हित नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. म्हणजे आपला स्वतःचा सुद्धा स्वतःबद्दल नक्की हेच म्हणू की, आपण जरी एखादी गोष्ट समजलो, तरी त्यानुसार तसे वागतोच असं नाही.
याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे माया. जी माया वास्तविक ईश्वराची छाया आहे, तीच या जगतातील प्रत्येक जीवाला, इश्वरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. कदाचित हे विभ्रम, आभास, अहं, न्यून, इत्यादी सर्व ही मायेच्या माध्यमातून भगवंतांचीच योजना असेल. प्राणी मात्रांना विषयात,क्रोधात,भावनेत,अज्ञान अधःकारात आपल्या चुकांच्या फेऱ्यात फिरत असताना, आपल्या चुकांची कुठेतरी जाणीव होऊन, मार्ग शोधण्यासाठी तरी, आजूबाजूला बघेल, शोधेल, विचार करेल.
या विचारातून, त्याला चिंतनाची गोडी लागेल, त्या चिंतनातून, माणसं हा विचार करतील की, हे असं का घडतंय, आपण कधीतरी केलेल्या चुका, पुढे आपल्याला त्रास देतात. तर मग यातून, निदान पुढच्या घडणाऱ्या किंवा घडू शकणाऱ्या चुका प्रमादाच्या स्वरूपा पर्यंत जाणार नाहीत. त्यातून आपल्या समोर येणाऱ्या फलांच्या स्वरूपात न येता,त्या भिन्न स्वरूपात येतील.
मुळात ही जाणीव झाली की, मनाच्या माध्यमातून भावभावनांचे हे खेळ, माया करते आणि करवून घेते, की आपण सावध असायला हवं, सावध व्हायला हवं. कारण सुधारण्याची सुरवात, माणूस केंव्हाही करू शकतो. कारण एक गोष्ट माणूस कधीही डोक्यात घेत नाही की, या सर्व खेळाचा सूत्रधार स्वतः ईश्वर असल्याकारणाने, प्रत्येक गोष्टीचा शेवट आज ना उद्या त्याच्या पाशीच होणार आहे. काळ कितीही लागो. यामुळे जर आपण आज चूक केली, तरी कर्मागतीनुसर त्या कर्माचं उचित फल आपल्याच पदरात, पडणार आहे.
मग जे कर्म करून, नंतर भोगच भोगायचे असतील, तर कर्म टाळलेल बरं. कारण कर्म करून, पस्तावा होण्या पेक्षा, ते कर्मच टाळणं जास्त हितकारक आहे. या सर्वांचा सारासार विचार करूनच. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी मनाला समजावून सांगणारे,मनाला योग्य वळण लावणारे आणि मनाला, प्रसंगी दरडावून सांगणारे, मनाचे श्लोक लिहीले. कारण समर्थ जाणत होते की, मन कसं चंचल, हट्टी, दुराग्रही, कठोर, बेशिस्त आहे.
त्यामुळे त्या मनाला समजावून सांगताना काय काय योजना योजव्यात, कशाप्रकारे, या मनाला शिस्त, नियम यांचं महत्व, अधोरेखित करून, सांगितलं पाहिजे. याचं मनाला ईश्वराकडे कसं वाळवावं. त्याची आवश्यकता आणि महत्व, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. पण नामाचं बोटं न सोडता.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment