भोग आणि ईश्वर ६२४
काल आपण पाहिल्याप्रमाणे, मनाला शांत किंवा एकाग्र होण्यासाठी, कुठल्यातरी नादाचा, कल्पनेचा, स्वर सुर यांचा, आनंदात घालवलेल्या क्षणांचा, अश्या कुठल्यातरी माध्यमाचा धागा पकडावा लागतो. हे मानसशास्त्र सुद्धा सांगतं आणि धर्मशास्त्र सुद्धा सांगतं. यामध्ये एकाग्र होण्यासाठी हा शब्द मुद्दाम वापरला, कारण सुरवातीला, आपल्याला मनाला कुठेतरी गुंतवून शांततेचा आणि एकाग्रतेचा अनुभव द्यावा लागतो. म्हणजे एकदातरी या अनुभवाची गोडी घडवावी किंवा व्हावी लागते.
तरच मनाला, त्याचा आस्वाद जाणवतो आणि मन ती शांतता आणि एकाग्रता यांत,स्वतःला गुंतवून घेण्यासाठी सिद्ध किंवा तयार होतं. ही जाणिवेची जागृती, हाच जगतातील सर्व साधनांचा उद्देश आणि आत्मा आहे. नवविधा भक्तीचा, कर्मकांडाचा, ज्ञान, वैराग्य, सन्यास इत्यादी सर्व मार्गांचा, अंततः उद्देश मनाला त्या गोडीपर्यंत घेऊन जाणं हाच आहे. हेच अध्यात्मिक ज्ञानाचं सर्वात मोठं गुह्य आणि सार आहे.
एकदा माणसाच्या मनाला, याची गोडी, स्वाद, आस्वाद यांचा अनुभव आला की, मनच आपोआप त्याच्या प्राप्ती साठी मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न करतं. अशांत, अस्वस्थ, विचलित, सैरभैर, विखुरलेले मन हे नेहमी, याचं शांततेच्या आणि आनंदी अनुभवाच्या शोधार्थ अतृप्त असतं. ही अतृप्ती, मनाला, अनेक चुकीच्या, वाममार्गी , अहितकारक कर्म, चुका, प्रमाद इत्यादी करायला भाग पाडतं.
याचं महत्वाचं कारण, खरा आनंद, खरा उद्देश, खरी शांती, खरा आनंद हा देहाच्या आत मनात आणि अतरातम्यात दडलेला आहे. पण याची जाण नसलेले जीव उद्देश, त्यांच्या पूर्ततेचं स्थान आणि कार्य याचं ज्ञान नसल्याने, चुकीच्या गोष्टी करून, अनेक चुकीचे मार्ग धरून, संसारात, प्रवाहात भरकटत जातात. चुकलेल्या कर्माच्या फलासाठी, या किंवा पुढील अनेक जन्मात भोग किंवा उपभोग भोगून, पुन्हा पुन्हा प्रवाहपतित होत जातात.
सर्व धर्म शास्त्र, पुराणं, वेद वांगमय, संत महंत याचं कथन, सर्व ज्ञान हे याचं उद्देशापर्यंत मानवी मनाला घेऊन जाण्यासाठी आहेत. श्रीमद्भगवद्गीता, हेच ज्ञान देण्या साठी, भगवंतांनी स्वमुखे उधृत् केली. या उद्देशाला ओळखण्यातील अडचणी, अडथळे काय काय आहेत, याबद्दल उद्याच्या भागात जाणून घेऊया. ते जाणल्या नंतर, मनाचं एकाग्र न होण्यामागील, आपलं स्वतःचं काय कारण आहे आणि ते जाणल्यानंतर, मनाला कशा प्रकारे एकाग्र करायचं, यांचं तंत्र आपल्याला ज्ञात होईल. पण तोपर्यंत आपण नामाच्या आनंदात मनाला हरवून टाकण्याचा प्रयत्न करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/१०/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment