Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग १

 

श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग १

आपदाम्-अपहर्तारम् दातारं सर्व संपदां

लोकाभिरामं श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ॥


मराठी मध्ये आपण आपदा आणि विपदा असे दोन शब्द बरेचवेळा एकत्र वापरतो. कदाचीत दोन्हीमध्ये तसा भेद  वाटत नाही तरीही यात मूळ भेद  आहे. आपदा म्हणजे नैसर्गिक संकटं जसं  पूर, भूकंप, वादळ इत्यादी. ज्याला शास्त्राच्या भाषेत अरिष्ट म्हणतात. जे पूर्णतः मानवी कर्म व प्रयत्न यांच्या पलीकडे आहे. म्हणजेच ज्यामध्ये मानव पराधीन असतो वा त्याला या संकटातून मार्ग काढणं व्यक्तिगत पातळीवर अशक्य असतं . विपदा म्हणजे व्यक्तिगत आयुष्यात घडणाऱ्या वाईट, चुकीच्या, अनिष्ट परिणाम करणाऱ्या, व्यक्तिगत क्षती पोचवणाऱ्या घटना. आपदा मुळातच सार्वजनिक प्रारब्ध वा निर्बल ग्रहशक्तीचा परिणाम असतो. म्हणजेच नीचतम ग्रह बलिष्ठ असतात आणि पुण्यकारक ग्रह हे निर्बल असतात. अश्यावेळी सार्वजनिक संकटं जसं पूर, वादळ, साथीचे रोग, युद्ध ,  भूकंप इत्यादी येतात. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. अश्यावेळी तुमच्या प्रारब्धात जितकी शक्ती असेल आणि तुमचं पुण्यबल जितकं प्रबळ असेल, त्याप्रमाणे याचे कमी अधिक परिणाम सर्वांनाच वा बहुतांशी लोकांना भोगावे लागतात. 


अश्या समाजनिक आपत्तीमध्ये तुमच्या स्वतःच्या प्रारब्ध योगामध्ये, आपत्तीत भोग भोगण्याचा क्षीण योग जरी असेल,  तरी त्याच्या परिणामाने तुम्हाला त्या आपत्तीतून जावं लागतं . उदाहरणार्थ पूर,  ज्यामध्ये निदान सर्व इमारतींमधील तळमजल्यावरील सर्वांच्या सर्व लोकांना क्षती अथवा मोठ्या प्रमाणात झळ पोचतेच. इथे क्षीण योग जरी असेल तरी कमी क्षती होऊन जीव वाचण्याचा योग येऊ शकतो. परंतु यात प्रारब्धबरोबर जर पुण्यसंचय असेल वा कोणाची कृपादृष्टी असेल तर या आपत्तीच्या वेळी नेमके तुम्हाला बाहेरगावी जाण्याची सुबुद्धी होते आणि तुमच्या भागातील संकटातून तुमची सुटका होण्याचा योग जुळून येऊ शकतो. 

मला एक घटना आठवते जी मी बरेच जणांना सांगतो. घटना डोंबिवलीत घडलेली आहे. पंचवीस एक वर्ष झाली असतील.  शिवमंदिर चौकातून आयरे रोड कडे जाताना वाटेत एक इमारत आहे.  ती संध्याकाळच्या सुमारास त्यावेळी कोसळली. त्यामध्ये माझा एक मित्र राहत होता. जो त्यावेळी अंबरनाथ येथे सहकुटुंब स्थलांतरित झाला होता. त्यामुळे तो वाचला. परंतु त्याच  इमारतीत त्यावेळी पहिल्या मजल्यावर एक महिला घरात होत्या. त्याच इमारतीच्या समोरील इमारतीत राहणाऱ्या एक महिला, ज्या या महिलेच्या ओळखीच्या होत्या, यांच्याकडे काही कारणास्तव यांच्या घरी आल्या.  


या घरातील महिलेला त्या समोरील इमारतीतील दुकानातून काही खरेदी करायचं होतं . वेळ दुकानं बंद होण्याची असल्यामुळे या महिला म्हणाल्या कि, मी जाऊन येते तुम्ही बसा (तेवढी ओळख असल्यामुळे वा येणंजाणं असल्यामुळे असेल). सदर महिला समोरील इमारतीतील दुकानात गेल्या आणि हि इमारत कोसळली आणि जी इमारत पडली त्या घरातील महिला समोरच्या दुकानात गेल्यामुळे वाचल्या आणि समोरच्या  इमारतीतील महिला या  इमारतीत त्याचवेळी गेल्यामुळे त्यांचा यात मृत्यू घडला. यात  मुद्दा असा कि, हि सार्वजनिक आपत्ती पण सादर महिलेचं क्षीण भाग्ययोग होता म्हणून त्यांना त्याचवेळी दुकानात खरेदीला जाण्याची बुद्धी झाली. म्हणजे काहीहि शारीरिक इजा न होता एका दुर्घटनेतून सुखरूप वाचण्याचा योग घडला. म्हणजेच सार्वजनिक आपदा अर्थात अरिष्ट म्हणजेच संकटं जी आपल्या हातात नसतात त्यातून वाचण्याचा सुयोग हा प्रारब्धाबरोबरच पुण्यकर्मावर अवलंबित असतो. 


मुळात सर्वच परिणाम वा फल हे कर्माधिष्टीत आहेच. परंतु जेंव्हा सार्वजनिक आपत्ती येतात त्यावेळी पापकारक ग्रहांची युती अथवा योग हा पुण्यकारक ग्रहांना थोपवून आपल्या ऊर्जेचा परिणाम घडवून मगच शांत होतो. अश्या काळात येणारी संकटं, क्षती, आपत्ती या ज्याच्यात्याच्या पूर्वपुण्याईचं फलस्वरूप प्राप्त होतं  आणि हे  फलस्वरूप प्राप्त करण्याचं कार्य अर्थातच तुमची कर्मच करतात. पूर्वपुण्यसंचय हा जमेस असेलच असं गृहीत धरणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे, ज्यासाठी कसबी धनुर्धर असणं जरुरी आहे. जो लाखात एखादा असतो. म्हणजेच सर्वसामान्य माणसाला आपलं पुण्यसंचयाचं कार्य सतत करत राहावं लागतं . ते करत राहणं किती गरजेचं आहे ते पाहू. 


मुळात अश्या आपत्तीत क्षती व्हावी असं  कधीही ईश्वराला वा जगनियंत्याला वाटत नाही वा वाटणारच नाही. त्याची इच्छा, सर्वांना साहाय्य करून सर्व जीवमात्र पुण्यमार्गावर जावून अंती मोक्षाला पोचावेत, हीच आहे. पण होतं काय कि, आपण आपल्या पूर्वकर्मात इतका कचरा जमा करून ते दूषित करून ठेवलेलं असतं  कि, ईश्वराची इच्छा असूनसुद्धा तिथपर्यंत तो पोचू शकत नाही. अन्यथा कोणत्या आईला आपलं लेकरू संकटात जावं, त्याचं नुकसान व्हावं, असं वाटेल. परंतु ईश्वराला आपल्या हृदयस्थ आसनापर्यंत पोचण्याचा मार्ग हा षड्रिपूंच्या मार्गाने जातो. आपणच आयुष्यभर त्यांचे गुलाम होऊन त्यांना बलशाली करून ठेवलेलं असतं, ज्यामुळे पुण्यसंचयाचा अत्यंत सुलभ मार्ग हा आपल्याच कर्माने आपण दुर्लभ केलेला असतो. प्रभुकृपा हि अत्यंत सुलभ गोष्ट आहे आणि अश्या सार्वजनिक आपत्तीत विशेष करून प्रभुकृपाच व्यक्तीला सुखरूप ठेवते.  


कदाचित कोणी म्हणतील एखादी व्यक्ती काहीही पुण्यकार्य न करता एखादया आपत्तीतून सुखरूप वाचते. यात माझा दृष्टिकोन असा कि, त्याचा पूर्वपुण्यसंचय हा अतीव असला पाहिजे. ज्यामुळे हे शक्य आहे, जर तो काही करत नाही असं गृहीत धरलं तर. कारण व्यक्तिगत पातळीवर कोण कश्याप्रकारे ईश्वरसेवा करतो हे शंभर टक्के आपण जणू शकत नाही. तरीही जर गृहीत धरलं तरी पूर्वपुण्याईवर अशा आपत्तीतून सुखरूप वाचण्याचा योग येऊ शकतो. पण ज्याप्रमाणे  कठीण काळात आपण, आपल्याकडे साठलेलं द्रव्य वापरलं, तर नंतर त्याचा संचय करण्याचं कार्य आपल्यालाच करावं लागतं. त्याप्रमाणे या व्यक्तींनाही ते करावंच लागणार, कुणी मान्य करो व न करो.  नाही केलंच तर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याची तयारी करावी. 

वरील श्लोकात प्रभूंच्या गुणवर्णाबद्दल सांगताना श्रीबुधकौशिक ऋषी  सुंदर शब्दात सांगतात कि प्रभूंचं ब्रीद आहे कि ते आपदांमध्ये धावून येतात. हा श्लोक श्रीरामरक्षेत शेवटी शेवटी आहे. अर्थात ज्याला कोणत्याही स्तोत्राची फलश्रुती म्हणतात त्या स्वरूपात असलेला हा श्लोक आहे. कारण फलश्रुतीशिवाय कोणताही स्तोत्र वा मंत्र हा अपूर्ण असतो आणि तो परिणाम करत नाही. म्हणून संपूर्ण श्रीरामरक्षास्तोत्र वाचत असताना त्याचा नित्य पाठ करत असताना, वा एकूणच यायोगे प्रभूचं नित्य स्मरण करत असताना इच्छित कार्य साध्य करण्यास हे स्तोत्र आणि यातील प्रभूंचा नाम हे कश्या प्रकारे कार्य करतं त्याचं महत्व यात विषद केलं आहे. 

आपण आपदा शब्दाचा विस्तृत अर्थ , त्याचा परिणाम पहिला आता त्याचं निवारण कसं होऊ शकेल त्याबद्दल थोडं जाणून घेऊ म्हणजेच श्रीबुधकौशिक ऋषींना काय अभिप्रेत आहे ते कळण्याचं मदत होईल. मुळात अपहरण म्हणजे एखादी गोष्ट पळवून नेणे . प्रभू आपल्या भक्तांच्या आयुष्यात येणाऱ्या आपदांचं  (अर्थात सार्वजनिक संकटं ) अपहरण करतात. म्हणजेच त्यांना पळवून लावतात.  अर्थात आपदा टाळणं हे प्रभुना अशक्य आहे कारण घडणाऱ्या गोष्टी टाळून निसर्गचक्राला भेदणे हे भगवंत कधीच करत नाहीत पंचमहाभूतांच्या ग्रहचक्राच्या कार्यात कधीही बाधा येईल असं कोणतही कार्य प्रभू करणार नाहीत. परंतु त्यांचं अपहरण म्हणजेच त्यांना भक्ताच्या आयुष्यातून दूर करणं वा भक्ताला त्यापासून लांब नेणं हे नक्कीच प्रभू करू शकतात. ते कार्य नित्य प्रभू कृपामाध्यमातून करतात. असाच याचा प्रामाणिक अर्थ आहे. अर्थात तो सशर्त आहे. जो भक्त आहे, जो नित्य स्मरण करून प्रभूला आपल्याजवळ बाहतो , जाणतो, इच्चीतो त्याला आपत्तीमध्ये सहाय्य करण्याचं आपलं ब्रीद प्रभू राखतात हे यातून ऋषीवरांना अभिप्रेत आहे. म्हणूनच  निजभक्तांच्या योगाचं क्षेमकुशल सांभाळणं हे भगवंताचं ब्रीद आहे. त्या ब्रीदाचं पालन जगत्पालक करतात. असा सार्थ विश्वास ऋषीवर आपल्याला देतात. परंतु यात आपला कर्मभाग हा महत्वाचा आहेच. 

श्लोकाच्या याच ओळीत पुढील भागात आलेला शब्द दातारम हा आहे. दाता, दातृत्व, दानी यांचे सर्वसामान्य अर्थ आणि दातारम याचा अध्यात्मिक पातळीवर अर्थ हे पुढील भागात समजून घेऊ. 


क्रमशः 

भाग १....  


© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 

१०/१०/२०२०



Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...