Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १४

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १४

रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम्‌ ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम्‌ ।
वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥२६॥

इथे सविसाव्या श्लोकात भगवान श्रीराम यांचे काही गुणविशेष वा विशेषणं ऋषींनी कथन करून श्रीरामांना वंदन करण्यास सूचित केले आहे. त्याचा शोध घेऊ. 

लक्ष्मणं पूर्वजं म्हणजे सरळ सरळ अर्थ होतो लक्ष्मणाचे पूर्वज म्हणजे श्रीराम. वास्तविक ज्येष्ठ किंवा अग्रज हा शब्द वापरता आला असता, परंतु पूर्वजंचा मी असा अर्थ काढतो की शेषनाग अर्थात  लक्ष्मण हा रामावतारात प्रथम महाविष्णूं सोबत पृथ्वीवर मानवी रुपात अवतीर्ण झाला. त्याआधी महाविष्णूचे सहा अवतार झाले. त्यात श्रीमहाविष्णू एकटे अवतीर्ण झाले. त्याअर्थी पूर्वजं असा अर्थ असावा. 

रघुवरं म्हणजे रघु राजाच्या वंशात जन्मलेले असे श्रीराम. सीतेचे पती या अर्थी अजून एका नावाने श्रीराम प्रसिद्ध आहेत. सुंदरम् म्हणजे देहाने अर्थात शारीरिक सुंदरता आहेच. परंतु जे ऋषींवर भौतिक जगताच्या पार गेलेले असतात, ते या मर्यादित अर्थाने लिहितील असं वाटत नाही. म्हणजेच सुंदरम् म्हणजे मन आत्मा देह आणि लौकिक या अर्थाने देखील जे तत्व अलौकिक अतिसुंदर आहे असे श्रीराम. 

काकुत्स्थं म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे काकुस्थ नावाच्या रघुवंशातील एका महान राजाच्या वंशात जन्मलेले श्रीराम. करुणार्णवं. अर्णव म्हणजे महासागर, समुद्र. अर्थात करुणेचा दयेचा सागर असलेले असे श्रीराम. करुणा इतकी की सर्व समर्थ असूनही जानकीच्या परत देण्याच्या बदल्यात रावणाला जीवनदान देण्यास तयार असलेले आणि अंती त्या रावणाला मृत्यू देऊन पुनः मोक्ष प्रदान केलेले असे श्रीराम. याचं कारण मृत्यू शय्येवर असताना रावणाने प्रभूंना जाणून क्षमायाचना केली आणि प्रभूंची करुणा भाकली. 

गुणनिधीं. आपण एखाद्या गोष्टीसाठी पैसे वा मदत जमा करतो त्यावेळी त्याला निधी असा शब्द वापरतो. निधी म्हणजे संकलन, एकत्रितपणे, एकाच ठिकाणी जमा असलेली वा केलेली गोष्ट. अर्थात जगतपालक श्रीराम हे स्वतः सर्व गुणांची खाण आहेत, गुणांचा समुच्च संचय त्यांच्या ठायी झालेला आहे आणि तो त्यांनी आपल्या चरित्रातून प्रकट केला आहे.  विप्रप्रियं. विप्र म्हणजे गुणी, ज्ञानी, सज्जन, धर्मात्मा, सुजन, सहिष्णू, सन्मार्गी, साधू, वैराग्यवृत्तीचे असे जीव. अश्या मनोवृत्तीचे जन ज्यांना प्रिय आहेत असे श्रीराम. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, श्रीरामांना प्रिय होण्यासाठी आपल्या अंगी काय गुणविशेष असावेत. 

धार्मिकं. धार्मिक वृत्तीचा माणूस हा सज्जन सुशील आणि सन्मार्गी असतो,तो इतरजनांना समान वृत्तीने पाहणारा, सात्विक वृत्ती असणारा. धर्म या शब्दाचा एक अर्थ धारणा आहे. अर्थात ज्याने सत्य दया क्षमा शांती यांना  धारण केले आहे  अर्थात त्यावर ज्याचा श्रद्धा वा दृढविश्वास आहे असा. असे श्रीराम.  राजेन्द्रं. सर्व राजांचा राजा अर्थात ज्यांनी अश्या राजाचं सार्वभौमत्व मान्य केलं आहे, असा राजा म्हणजे राजेंद्र.  हे इहलोकीच्या अर्थाने आणि स्वर्गलोकी सर्व देवांचा राजा इंद्र तो देखील भगवंताचं प्रतिरूप या अर्थाने श्रीराम हे राजेंद्र. 

सत्यसंधं. सत्य म्हणजे जे मिथ्या नाही ते, जे परिस्थितीला धरून आहे ते, ज्यात असत्याचा अंश किंचितमात्र नाही ते. अश्या सत्याशी बांधलेले, त्या सत्याशी संधी केलेले,  सत्यावर श्रद्धा, विश्वास, आस्था, प्रेम, दृढनिष्ठा असलेले, असे श्रीराम. 

सव्हीसाव्या श्लोकातील पुढील गुणविशेष आपण पुढील भागात पाहू. 
 
 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग १४.....    
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
२४/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...