जगणं, आनंद
आणि आपण. !!
आजच एक जण
म्हणाला कि, कालच्या पेक्षा आजचा दिवस छान गेला. मी म्हटलं उद्याचा दिवस अजुन उत्तम
जाईल, फक्त तुलना आजच्या दिवसाशी नको करुस. कारण तुलना केली कि त्या आनंदातला आनंद
निघून जातो. कोणताही आनंद तुलनात्मकरित्या तपासला कि, त्यातील आनंद कमी वा जास्त वाटतो
वा भासतो. पण तो तसा असतोच असं नाही. म्हणून निर्भेळ आनंद् घ्यायचा असेल तर तुलना न
करता आताचा आनंद हा अतुलनीय आहे हे समजावं.
त्यामुळे
एकतर आहे तो आनंद योग्यरित्या जगता येतो आणि प्रत्येक आनंद हा हवाहवासा वाटतो. मन पुढच्या
प्रत्येक आनंदात तितक्याच उत्साहाने सामिल होऊन जगण्यातील गोडी टिकून राहाते. अन्यथा
होतं काय की एखाद्या सुमधूर गीतात मन अडकून राहातं आणि त्याआधीची वा त्या नंतरची कोणतीही
गाणी एकतर आवडत नाहीत आणि जर आवडली तर त्याइतकं नाही पण हे छान आहे असं मत मन बनवून
मोकळ होतं.
म्हणून तुलनात्मकरित्या
जगलेला आनंद , मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, मापात मोजला जाऊ शकतो. त्यानंतर मनाला
त्याच प्रकारच्या आनंदाचा शोध घेण्याचा मोह व व्यसन जडतं. त्यामुळे एकतर तसा आनंद मिळेपर्यंत
वा तसा क्षण जगण्यात येईपर्यंत. मन कुठेच गुंतत नाही वा कोणत्याही गोष्टीचा आनंद तुम्हालाही
मिळू देत नाही. कारण मनाला तशी सवय आपणच लावली आहे वा असते.
याबाबत एखादा
संगीतकार, कवी,संशोधक इत्यादींचं उदाहरण देता येईल. ते जर आपल्या एखाद्या कलाक्रुतीत
अडकले तर त्यांच्यातील स्रुजनशीलतेला ते मारक ठरेल. त्यामुळे आतील कल्पनेची उर्मि नाहीशी
होईल आणि पुढे कोणतीच नवीन कलाक्रुती वा संशोधन बाहेर पडणार नाही. तो कलाकार वा संशोधक
संपून जाईल.
मी माझंच
उदाहरण देतो. एखादी कविता, वा लेख लिहिल्यानंतर मी त्याकडे बघत सुद्धा नाही. खुप वेळा
माझ्या एखाद्या कवितेतील वा लेखातील सौंदर्य वाचक नजरेस आणून देतात. ती समजलेलं नसतं
असं नाही पण, त्यात न अडकता पुढे गेल्यामुळे नवनवीन कल्पना मनात आपोआप यायला मार्ग
मोकळा होतो. म्हणून जसं मी वर म्हटलं की प्रत्येक क्षण जगत असताना त्यातील आनंद घेत
पुढे जायचं तुलना न करता, त्याप्रमाणे मी डोक्यात कल्पना आली वा एखादं चित्र समोर दिसलं
कि लगेच त्यावर सुचणारे शब्द उतरवून ठेवतो. म्हणजे ती कल्पना टिपली गेली मन रिकामं
झालं. तेच मन पुन्हा नवीन कल्पनेच्या वा शब्दांच्या शोधात पुढे निघून जातं.
हे जसं कले
बाबत खरं आहे त्याचप्रमाणे जगण्याबाबत सुद्धा तितकंच खरं आहे. फक्त तशी दुर्ष्टी, ठेवणं
महत्वाचं आहे. कारण नजर तर सर्वांकडेच आहे, पण द्रुष्टी महत्वाची. द्रुष्टी असली कि
द्रुष्टीकोन येतो आणि द्रुष्टीकोन आला कि, आनंद येतो.
तेन्व्हा
प्रत्येक क्षण तुलना न करता स्वच्छ मनाने निर्भेळ आनंद घेत जगा. !! जगणं सुलभ होईल
आणि सहजसुद्धा होईल. !!!
© ®संकल्पना
व लेखन : प्रसन्न आठवले.
०६/१०/२०२०
२०:२०
Comments
Post a Comment