Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १६

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १६

 माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी,
रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं,
जाने नैव जाने न जाने ॥30॥

तिसाव्या श्लोकापर्यंत येताना एकोणतीसाव्या श्लोकात सर्व समर्पण करून शरणागती पत्करल्यानन्तर, आता प्रभू हेच माझं सर्वस्व ही भावना भक्तांच्या हृदयात स्थित व्हायला पाहिजे. परंतु माझं सर्वस्व म्हणजे नक्की काय याचा उलगडा करताना ऋषींनी चार नातेसंबंधांचा उल्लेख केला आहे.

माता पिता स्वामी आणि सखा. थोडं खोलात गेलं तर काही गोष्टींचा बोध होऊ शकतो. माता म्हणजे जन्मदात्री अर्थात लौकिक अर्थाने जन्मदात्री ही भिन्न आहे.  पण इथे अध्यात्मिक भक्तीच्या मार्गात आता प्रभू श्रीराम यांनी मला पुत्र वा पुत्री म्हणून स्वीकारून, मला मातेसमान ममत्व देऊन भक्तीमार्गात पुढे न्यावं. इथे ही अपेक्षा नाही तर हट्ट आहे वा असावा. कारण असा हट्ट आईकडेच करता येतो. माझे आजपर्यंतचे अपराध, कर्माचे दोष पोटात घेऊन पुढील मार्गात मातेसमान मार्गदर्शन करावं.

परंतु हे करत असताना काही चुका कर्माचे दोष पुढेसुद्धा होऊ शकतात. अश्यावेळी काही क्षणी काही वेळा प्रसंगोपात पित्याची कठोरता ठेवून मला पुन्हा मार्गावर आणावं. पिता हा काहीसा कठोर वागला तरीही पुत्रांना त्याचं बाह्यांगी रूप मनाविरुद्ध वाटू शकतं, परंतु अंतरंगी त्याचा हेतू पुत्र वा पुत्री  सन्मार्गी होऊन, ध्येयपूर्तीसाठी कार्यरत राहावेत,मार्गात भटकू नयेत असाच त्यामागचा उद्देश असतो. हे मर्म जाणूनच मी प्रभूंना पित्यासमही मानतो. माझे ते माता आणि पिता आहेत.

स्वामी म्हणजे मालक वा नोकर या अर्थातील स्वामी हा लौकिक अर्थ झाला. तो अर्थ इथे आहेच. कारण खरा स्वामी हा कर्मचाऱ्यांच्या निर्वाहाची काळजी घेतो, अडीअडचणीच्या वेळी गरजेपुरते सहाय्य करतो.  तसे सहाय्य गरजेसाठी प्रभूंनी करावे हे अपेक्षित ठेवले तरीही,  इथे स्वामी म्हणजे भक्तिमार्गातील स्वामी हा अर्थ खऱ्या अर्थाने अभिप्रेत असावा. कारण श्रीमहाविष्णू अवतारी जगतपालक या समस्त जगताचे स्वामी आहेत. त्यांच्या भक्तीची आस धरलेले त्यांचे दासच आहेत. 

म्हणून त्या अर्थाने माझ्या भक्तीतील न्यूनत्व मान्य करून, ते जसे आहे तसे स्वीकारून, माझ्या भक्तिमार्गात ज्या कमतरता राहतील त्याची पूर्तता योग्यवेळी मार्गदर्शन करून, तुम्हीच भरून काढायची आहे आणि या अर्थाने आपला मी दास आणि आपण माझे स्वामी आहात. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करून तुम्हीच मला घडवा, हीच इच्छा असावी. 

सखा हे कोणत्याही नात्यापेक्षा अत्यंत वेगळं नातं आहे. सखा हा निरपेक्ष असतो. खरा सखा हा हृदयाच्या सर्वात निकट असतो. काही गोष्टी नात्यात सांगता येत नाहीत संकोच वाटतो, मोकळेपणा वाटेलच असं नाही. तसा मोकळेपणा नात्यात असेलच तर त्या गोष्टींपुरतं ते नातं सखा म्हणूनच गणलं जावं. अन्यथा काही गोष्टी सखा म्हणून आपण मित्राशी हक्काने बोलू शकतो त्याला सांगू शकतो. 

त्या अर्थाने श्रीराम हे माझे सखा आहेत. माझ्या ज्या काही गोष्टी मी माता पिता आणि स्वामी रूपातील श्रीराम यांना सांगायला संकोच करत असेन, त्या मोकळेपणाने सखा श्रीराम यांना सांगेन आणि असे हे श्रीराम मला योग्य मार्गदर्शन करून चुकीच्या मार्गापासून वेळीच परावृत्त करतील. योग्य ठिकाणी सखा म्हणून माझं कौतुकसुद्धा करतील.  म्हणून श्रीराम हेच माझे सखा आहे. 

असे हे माता पिता स्वामी आणि सखा असलेले, दयाघन, दयाळू  श्रीराम हेच माझं सर्वस्व आहे. आता इथून पुढे मी त्यांनाच जाणतो त्यांनाच मानतो. त्यांच्याशिवाय या जगतात मी दुसरं काहीही जाणत नाही. इथे आपली भूमिका ही बाल्यावस्थेतील असावी, जिथे ते मूल आई सोडून अन्य कोणाचेही ऐकत नाही, किंवा इतर कोणीही काहीही सांगितलं,  तरी कृतीसाठी आईकडे पाहून आईने हो म्हटलं तरच पुढे कृती करतं, तोच भाव इथे अपेक्षित आहे. 

इथे आणखी एक गोष्ट गृहीत धरावी की मला मिळालेले नकारात्मक अनुभव, घडलेल्या वाईट गोष्टी, मन खिन्न उदास करणारे प्रसंग हे मातेने मारलेल्या रट्याप्रमाणे समजावेत.  मातेने मारलेला रट्टा मुलांना शिकवून जातो पण मनाला लागत नाही. त्याप्रमाणे या घडणाऱ्या, घडलेल्या व घडतील त्या गोष्टी आहेत, असे समजावे. म्हणजे त्याचा त्रास न होता मन पुढील मार्गाने जाईल, दुःखाला धरून बसणार नाही. कारण प्रारब्ध संचित हे आपण जाणत नाही ते जाणतात. त्यामुळे त्याचे भोग जितके भोगून संपतील तितके भक्तिमार्गासाठी ,पुढील जीवनासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी आपण सक्षम होऊ. हेच परम सत्य मानावं.

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग १६.....    
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
२६/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...