श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग ३
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता। अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान कीलकम। श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः।
श्रीबुधकौशिक ऋषी, ज्यांनी श्रीरामरक्षा हे स्तोत्र लिखित
स्वरूपात आपल्याला प्रदान केलं, ते मूळ भगवान श्रीशंकर यांनी स्वप्नात दृष्टांत
स्वरूपात श्री बुधकौशिक ऋषींना विवेचित केलं. तदनंतर प्रातःकाली उठून ऋषीवरांनी
भूर्जपत्रावर हे लिहून लोककल्याणार्थ जगाला समर्पित केलं. भगवान शिवशंकर यांनी
देवी पार्वती यांना एका कथनात श्रीरामनामाचा महिमा सांगताना म्हटलंय कि, रामनाम हे
विष्णुसहस्त्रनामइतकंच पुण्यप्रभावी व फलदायी आहे. स्वतः भगवान शंकर हे रामनामाचाच
जप करतात हे सर्वश्रुत आहे.
रामरक्षेच्या सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे
श्रीरामरक्षास्तोत्र हा एक मंत्र आहे. जो श्रीबुधकौशिक ऋषींनी आपल्याला पोचवला
आहे. याचे मूळ रचयिता भगवान शंकर आहेत. कोणताही मंत्र म्हटलं कि त्याची सिद्धी आणि
त्या सिध्दीने प्राप्ती हे ओघानेच आलं. त्याचबरोबर त्याच्या नित्य पठणाने निश्चित
लाभ काय, हा एक विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे त्याविषयी जाणून घेणं
नक्कीच क्रमप्राप्त आहे. कारण एखादा मंत्र हा का म्हणायचा हे निश्चित माहीत असेल
तर तो विचार मनात दृढ करून मनातील श्रद्धा वृद्धिंगत होऊ शकते.
मंत्र म्हटलं कि त्याला काही निश्चित अशी अंग असावी
लागतात, ज्याद्वारे तो मंत्र सिद्ध होतो. ती अंग आहेत.
१ ऋषी - अर्थातच त्याचे रचयिता. लौकिक
अर्थाने श्रीरामरक्षेचे रचयिता हे श्रीबुधकौशिक ऋषी आहेत. अंग एक सिद्ध
झालं.
२. छंद - कोणत्याही मंत्राला म्हणण्याची
एक विशिष्ट लय असावी लागते. तरच तो मंत्र त्याच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचतो. त्या लयीतून त्या मंत्राच्या लहरी त्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचतो. कारण हे समस्त जगत फक्त आणि फक्त लहरींवर चालतं. छंद
म्हणजे त्या देवाचा मंत्र म्हणण्याची पद्धत. यात दोन गोष्टी आहेत. एकतर त्या
देवतेला आवाहन करताना सतत एका विशिष्ट पद्धतीने त्या मंत्राचा जाप केल्यास तो
मंत्र वा त्या मंत्राचे सूत्र आपले कार्य करण्यास सिद्ध होते. एखाद्या व्यक्तीला
बोलावताना प्रत्येक वेळी एका समान पद्धतीने आपण त्याला बोलावत गेल्यास त्याला
समजते कि, ही आपल्याला बोलावण्यासाठीची साद आहे. श्रीरामरक्षेचा छंद अनुष्टुप
आहे. अंग दोन सिद्ध झालं.
कोणताही मंत्र हा सिद्ध करून घ्यावा लागतो. तरच तो आपले कार्य करण्यास सज्ज होतो. एकप्रकारे मंत्र सिद्ध करणं म्हणजे त्या मंत्राला कार्यसिध्दीचा आदेश देऊन मग पठणास सुरवात करावी. श्रीरामरक्षा आपल्या कार्याला सिद्ध करण्यास
त्याचे अनुष्ठान करून पठण करावे म्हणजे त्यानंतर ते इच्छित प्राप्ती देईल असे शास्त्रवचन
आहे. त्याचा विधी असा आहे. चैत्रातील वा अश्विनातील प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत
अर्थात श्रीरामनवमी वा शारद नवरात्र समाप्तीची नवमी या नऊ दिवसात श्रीरामरक्षेचं
११ वेळा पठण करून श्रीरामरक्षा सिद्ध करतात. त्यात पहिल्या वेळी अस्य श्रीरामरक्षा
........ पासून राम रामेती रामेती या श्लोकापर्यंत एक पठण करून तदनंतर चरितम
रघुनाथस्य पासून ........ राम रामेती रामेती या श्लोकापर्यंत दहा वेळा
पठण करावे. अश्या प्रकारे अकरा वेळा पठण झाल्यानंतर अकराव्यांदा इति श्रीरामरक्षा स्त्रोत्रं संपुर्णम पर्यंत केल्यास
अकरा पारायणं पूर्ण होतात. अश्या प्रकारे नऊ दिवस केल्यास श्रीरामरक्षा सिद्ध
होते असं शास्त्रवचन आहे.
हा श्रीरामरक्षेचा मंत्रजप कोणासाठी करायचा तर श्रीरामचंद्र यांची कृपाप्राप्त करण्यास्तव. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रमंत्र जपे विनियोगः हेच या श्रीरामरक्षेचे उद्देश्य अर्थात बीज आणि फलित आहे. कारण प्रभुकृपा प्राप्ती झाल्यानंतर पुढे काही मागायची गरज आहे असे वाटत नाही. एकदा प्रभूकृपावंत झाले कि, सर्व आपदा आणि विपदा यातून प्रभू आपल्या भक्ताला सुखरूप बाहेर काढतात आणि तसे त्यांचे ब्रीद आहे. प्रभूंची तशी ख्याती आहे कि ते आपल्या ब्रीदाच्या रक्षणार्थ काहीही करू शकतात. त्यामुळे त्यापुढील चिंता हि आपली राहात नाही. हे नक्कि.
जय श्रीराम
!!!
भाग ३ .....
© ® संकल्पना आणि लेखन
: प्रसन्न आठवले
११/१०/२०२०
Comments
Post a Comment