Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग २

  

श्रीरामरक्षा स्तोत्रातील एक श्लोक आणि त्याचा भावार्थ भाग २

आपदाम्-अपहर्तारम् दातारं सर्व संपदां

लोकाभिरामं श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ॥


श्लोकाच्या याच ओळीत पुढील भागात आलेला शब्द दातारम हा आहे. दाता, दातृत्व, दानी यांचे सर्वसामान्य अर्थ आणि दातारम याचा अध्यात्मिक पातळीवर अर्थ समजून घेऊ. दाता म्हणजे आपल्याकडील मिळकत व संपत्तीतील काही हिस्सा समाजासाठी, गोरगरिबांसाठी, पीडित जनतेसाठी, याचकांसाठी देणं  हे आपलं कर्तव्य समजून, त्याचा कोणताही मोह वा मद आपल्या मनावर चढू न देता, अत्यंत निरलसपणे, निष्काम वृत्तीने जो दान करतो तो खरा दाता . जो या दानाच्या बदल्यात समाज, ईश्वर वा अन्य कोणाकडूनही काहीही अपेक्षा मानसिक, आत्मिक वा शारीरिक ठेवतो तो दाता नसून एक व्यवहारी असतो. असा शुद्धवृत्ती दाता एकप्रकारे समाजाला वा ईश्वराला आपल्या ऋणात बांधून पुण्यसंचय करत असतो. 

इथे पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो कि, दान सत्पात्रीच असावं.का ?  कारण तसंच दान पुण्य संचय करतं. यात दोन शब्दांचा समावेश आहे. सत् आणि पात्री सत् ज्या शब्दाबरोबर जोडलं जातं, त्याचा अभिप्रेत अर्थ हा शुद्ध पवित्र असा मोजला जातो. सत् चित् आनंद म्हणजेच चित्ताची शुद्धता झाल्यानंतर मिळणार सात्विक आनंद. जो भक्तीने प्राप्त होतो, जो योगाने प्राप्त होतो, जो कुंडलिनी जागृतीने प्राप्त होतो, जो परोपकार केल्याने प्राप्त होतो, जो दानाने प्राप्त होतो.  म्हणजेच सत् म्हणजे शुद्ध, पवित्र. पात्री म्हणजे ज्याची पात्रता आहे. पात्री याचा हा अर्थ प्रत्यक्ष नसून सध्या केलेला अर्थ आहे. म्हणजेच अप्रत्यक्ष. 


पात्री शब्द अर्थाने ज्याच्या पात्रात भिक्षा वा दान दिले जाते तो ते पात्र.  म्हणजेच याचकाने आपल्यापुढे धरलेल्या पात्रात. यात शास्त्राला अभिप्रेत असलेला अर्थ जो खऱ्या अर्थाने याचक आहे तो. आता हि याचकता शारीरिक असू शकेल वा मानसिक. एखादा खऱ्या अर्थाने गरीब असेल ज्याला खरंच काही मिळवणं शक्य नसेल किंवा जो आपल्या ज्ञानाद्वारे भगवंताच्या भक्तीचा प्रसार करून त्याचा मोबदला न घेता ते निजकर्तव्य समजून ते करतो. परंतु परिस्थितीमुळे भिक्षापात्र हाती घेऊन फक्त पोटासाठी काही मागून जगतो. असे योग्य पात्रता असलेले याचक हे निव्वळ गरजेपोटी याचक झाले आहेत. कारण त्यांना देहत्याग करणं पटत नाही वा शास्त्रसंमत वाटत नाही. परंतु यापेक्षाही भिन्न याचक असू शकतात. जे मानसिक याचक आहेत. म्हणजेच ज्यांना कितीही मिळालं तरी सर्वात सोप्पा  उपाय म्हणजे हात पसरून मागणं . हे मानसिक याचक. 

परंतु अश्याना सत् पात्री म्हणता येणार नाही. कारण पात्रता हि मागण्याची वृत्ती यातून नसून ती परिस्थितीमुळे ठरते. यात परिस्थितीने झालेले याचक आणि ज्ञानी परंतु प्राप्त परिस्थितीमुळे ज्ञानाचं कार्य करूनसुद्धा पोटापेक्षा जास्त स्वीकारत नाहीत अश्याना दान दिल्याने ते दान अनमोल ठरतं. कारण सत्पात्री म्हणजे जो याचक या व्याख्येस पात्र आहे आणि त्याची पात्रता सत्यस्थिती आहे. अश्या याचकाने निर्मळ मनाने, मिळालेल्या दानामुळे, दिलेले आशीर्वाद दात्याला नककीच पुण्यप्राप्ती करून देतात. अर्थात देताना दात्याचं मन हे वृत्तीरहित असावं. म्हणजेच दिलेल्या दानाचा कोणताही तरंग त्याच्या मनःपटलावर उमटता कामा नये. 


श्रीबुधकौशिक ऋषींनी भगवान श्रीराम यांच्या दुसऱ्या गुणाचं वर्णन करताना आणि रामरक्षेच्या पठणाने मिळणाऱ्या फलश्रुतीबद्दल सांगताना  सांगितलं कि प्रभू हा दातार आहे. आता वरील दाता  या अर्थाचा अन्वयार्थ इथं लावला तर प्रभू अपात्री दान देईल असं संभवतं का ? तर नाही. पण मग प्रभू श्रीराम हा दाता आहे म्हणजे काय. तेही पाहू. शास्त्रवचनं, जी स्वतः विश्वनिर्मात्याने, ब्रह्मदेव श्रीवेदव्यास इत्यादींच्या माध्यमातून, आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत. अर्थातच  स्वतः भगवंत त्याचं पालन करायला वचनबद्ध आहे हे नक्कीच. म्हणजेच  भगवंत दाता आहे, पण सत्पात्री दान देणार हे नक्की. कृपावंत दाता हे अजून एक विशेषण भगवंताला प्राप्त आहे. अनेक उदाहरणातून दृष्टान्तातून भगवंताने आपली हि ओळख सार्थ ठरवली आहे.   

म्हणजेच श्रीबुधकौशिक ऋषींना अभिप्रेत असणारा,  प्रभू श्रीराम यांचा  दातृत्व हा गुणविशेष, भक्त या सत्पात्री याचकांसाठीच आहे. प्रभूवरील आपल्या भक्तीने भक्त प्रल्हाद, बाळ ध्रुव, भक्त पुंडलिक, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम यांनी भगवंताला दर्शन देण्यास व  कृपा करण्यास बाध्य  केलं. म्हणजेच आपली याचकता त्यांनी सप्रमाण सिद्ध केली.  त्यामुळे भगवंताला त्यांच्या दर्शनार्थ, इच्छा पुरवण्यास्तव  येऊन सिद्धी द्याव्या लागल्या, प्रमाण द्यावं लागलं.  ज्या त्यांनी लोककल्याणार्थ वापरल्या. 

आपदांचं निवारण करणारा, त्यांना पळवून लावणारा, त्यांचं  अपहरण करणारा  असा हा भगवंत ज्यावेळी कृपावंत होतो, त्यावेळी तो सर्व संपदा दान करतो. संपदा म्हणजे आपदाच्या विरुद्ध आपदा म्हणजे संकट, अरिष्ट आणि संपदा म्हणजे जे संपादन केल्याने अर्थातच जे प्राप्त केल्याने कधीही न संपणारा, ज्याचा संचय अविरत वृद्धिंगत होईल, असं वैभव देणारा. परंतु इथे खरा अभिप्रेत असलेला अर्थ वेगळाच आहे. संपदा म्हणजे जे पद सन्मार्गाला लावतं , जे प्राप्त झाल्याने अजून काहीही मागण्याची इच्छा वा जरुरी राहात नाही, असं सन्मार्गाला लावणारं पद. असं पद म्हणजेच भगवंताच्या मनात कायमस्वरूपी अढळ पद. कारण संपत्ती हि भोग वाढवणारी आणि त्यायोगे प्राण्याला जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवून ठेवणारी असते. त्यामुळे तशी ती दात्याला अभिप्रेत नक्कीच नसेल. जे दिल्याने घेता जन्मकर्म बंधनाच्या पल्याड जाईल, तेच दान दाता म्हणून भगवंतालादेखील सत् चित् आनंद देईल. कारण आपले विकार वाढल्याने विधात्याला नक्कीच आनंद होणार नाही. 


म्हणजेच दातारम सर्व संपदाम म्हणजेच अशी संपदा जी कोणत्याही विपदेत प्राप्तकर्त्याला उपयोगी पडेल. कालच्या भागात आपण पहिले आपदा म्हणजे बाह्य संकट ज्यातून आपली कर्म आणि भक्ती आपल्याला पुण्यसंचयाच्या मार्गे बाहेर काढते.  परंतु भगवंताची खरी कृपा दातारम सर्व संपदाम यात आहे. कारण अशी संपदा जी विपदेत कामी येईल ती देणारा खरा दाता भगवंत आहे. विपदा म्हणजे आपल्या कर्मबंधनातून येणारी व्यक्तिगत संकटं. म्हणजेच एकूण या पूर्ण श्लोकाचा अर्थ आपदांचं अपहरण करून विपदांमधून आपल्याला मार्गप्राप्ती देणारा महान दाता प्रभू श्रीराम आहेत. याचा अजून एक पारमार्थिक अर्थ अभिप्रेत आहे, तो म्हणजे सम पद  म्हणजे प्रभू आपल्याला त्यांच्या सम पद प्राप्त करून देतील. त्यांच्या सम पद म्हणजे भगवंताच्या हृदयात स्वतःच्या समान स्थान देईल. अधिभौतिक अर्थाने  त्यांची भक्ती केल्याने आपदा आणि विपदा दोन्हींमधून आपली सुटका करणारे श्रीराम आहेत. परंतु त्या कृपेला पात्र  होण्यासाठी जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान असलेल्या श्रीरामाचं नाम सतत अहोरात्र, अष्टौप्रहर, अर्थातच श्वासागणिक घेतलं  गेलं पाहिजे. त्याचा निजध्यास लागला पाहिजे. त्यासाठी स्वतःला हरवून त्यावर प्रेम केलं पाहिजे. तरच या श्लोकात म्हटलेली श्रीरामांची कृपाप्राप्ती होईल आणि सर्व आपदामधून  प्रभू आपल्याला सुखरूप बाहेर काढतीलच, परंतु स्वतः-सम पद देऊन हृदयात स्थान देतील ज्यायोगे जीव धन्य होईल. हा दृढ विश्वास, नव्हे तशी ग्वाहीच श्रीबुधकौशिक ऋषी या फलश्रुतीत भगवंतांचा साक्षात्कार देऊन देतात. 


कालच्या पहिल्या भागाच्या अभिप्रायामध्ये खूप जणांनी संपूर्ण रामरक्षेवर विवेचन व्हावं हि इच्छा व्यक्त केली. त्यांच्या सद् इच्छेचा मान ठेवून लवकरच संपूर्ण रामरक्षेवर अर्थात त्यातील श्लोकांवर विवेचन करण्याचा संकल्प मी करत आहे. वाचक आणि स्वतः भगवंत मला बळ देण्यास समर्थ आहेत. 


तेंव्हा जय श्रीराम !!!


भाग २ व अंतिम   


© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 

११/१०/२०२०



Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...