Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ४

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ४

अथ ध्यानम
 
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं, पीतं वासो वसानं नवकमल दलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामांकारूढ़सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् ।

ज्या प्रभुरामचंद्रांच्या प्रित्यर्थ आपण हा स्तोत्रमंत्र म्हणणार आहोत आणि त्यांचं ध्यान करणार आहोत त्या  प्रभूंचं रूप स्वरूप कसं आहे, याची कल्पना आपल्याला पुढच्या श्लोकात ऋषींवर्य देत आहेत. एक लक्षात घ्या ही रामरक्षा प्रत्यक्ष भगवान शंकरांनी कथित केलेली आहे. म्हणजेच या रुपाचे साक्षीदार स्वतः भगवान शंकर आहेत. तरीही एक शंका मनात येते की, निर्गुण निराकार ईश्वराच्या या सगुण साकार रुपाला का भजायचं. 

त्याचं कारण असं आहे की, जगात कोणत्याही गोष्टीची कल्पना करता येते पण आईची कल्पना करता येत नाही. ती प्रत्यक्षात असावीच लागते आणि तिच्या प्रेमाचा अनुभव यावाच लागतो. तरच तिच्या प्रेमाची साक्ष पटते. मग इथे तर संपूर्ण विश्वाची जननी असलेल्या ईश्वराला ज्यांनी पाहिलंय त्यांनी केलेल्या गुण व रूप वर्णनावरून आपण नक्कीच विश्वासून पुढे जाऊ शकतो. मला इथे एक गाणं आठवतं. कशी होती रे माझी आई. खूप जुनं गाणं आहे. त्या गाण्यात आईला पाहिलेल्या आपल्या मामाला, आईला न पाहिलेला,  त्या मामाचा भाचा प्रश्न करतो आहे आणि मामा त्या आईचं वर्णन अद्भुत तऱ्हेने करतो.  तीच कल्पना ईश्वराबाबत आपण मनात ठेवू आणि श्रीबुधकौशिक ऋषींच्या कथनाकडे वळूया.

ऋषींवर पुढे म्हणतात की, ज्यांचं आपण आता ध्यान करणार आहोत ते प्रभू श्रीराम कसे आहेत तर अजानुबाहु आहेत. अजानुबाहू याचा अर्थ ज्यांचे हात अर्थात अंगुलीसह मनगटापासूनचा भाग गुडघ्याला टेकतो आहे, अश्या व्यक्तीस अजानुबाहु म्हटलं जातं. तर असे अजानुबाहु हात ज्यांचे आहेत, ज्यांनी शर आणि धनुष्य अर्थात धनुष्यबाण धारण केला आहे. 

हिंदू देवीदेवतांच एक वैशिष्ट्य आहे की शस्त्ररहीत एकही देव नाही. कारण रात्रंदिन जगताची, धर्माची, लोककल्याणाची चिंता वाहणाऱ्या आणि भक्त रक्षणाचं ब्रीद घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीने नेहमी सज्ज असलं पाहिजे. कारण वेळ, संकटं आणि शत्रू कधीही सांगून येणार नाही, हे देव नक्कीच जाणतात. शांततेची वार्ता करणाऱ्यांसाठी हाती कोमल सुशोभित फुल हाती घेतलेले देव दुसऱ्या हातात शस्त्र धारण करतात. 

याचाच अर्थ अष्टौप्रहर दुसऱ्याच्या चांगुलपणाच्या अपेक्षेत असलेल्या कोणीही वेळप्रसंगी त्याच व्यक्तीला धडा शिकवण्याची तरतूद केलेली असावी, हे कायम लक्षात ठेवावं. जेंव्हा जेंव्हा जनरक्षणाचं ब्रीद घेतलेल्या राजांनी अकारण बेसावधपणा दाखवला त्या त्या वेळी सर्वात कमजोर शत्रूनेसुद्धा विजय मिळवलाय. सोन्याचा धूर पाहिलेल्या भारताने अश्या चुकांची जबरदस्त किंमत सुद्धा मोजलेली आहे. 

तर ज्यांनी शर आणि धनुष्य अर्थात धनुष्यबाण धारण केला आहे , जे बद्धपद्मासन मुद्रेत आसनस्थ आहेत. पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्थात पितांबर ज्यांनी परिधान केलं आहे, ज्यांचे नेत्र आकाराने आणि दिसण्यात,  नुकत्याच उगवलेल्या कमलपुष्पाच्या पाकळ्यांशी स्पर्धा करत आहेत. खरतर हे उलट आहे म्हणायला हवं, ज्यांच्या नेत्राशी नुकतंच उगवलेलं कमलपुष्प  स्पर्धा करत आहे हे मला संयुक्तिक वाटतं. 

जे प्रसन्नचित्त आहेत. प्रसन्नता हा चित्ताचा गुणविशेष आणि अवस्था असेल तरच ती तशी चर्येवर नक्कीच दिसते. अशी चित्ताची प्रसन्नता ज्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे, ज्यांच्या वाम अर्थात डाव्या बाजूला देवी सीता स्थित आहे, त्या देवी सीतेच्या मुखाचं अवलोकन करण्यात ज्यांचे लोचन गुंतले आहेत, ज्यांची कांती जल भरलेल्या मेघसमान आहे,  जे नाना अलंकारांनी सुशोभित आहेत, त्या अलंकारांची प्रभा चहूकडे पसरली आहे, जे जटाधारी आहेत, अश्या प्रभूंच मी ध्यान करतो, त्यासाठी मन एकाग्र करतो. 

अश्या प्रभू श्रीरामांचं आपण ध्यान करणार आहोत. अथ ध्यानम. हे गुणवर्णन झाल्यावर ते म्हणतात इति ध्यानम. म्हणजेच अश्या गुणवर्णनांनी युक्त असे श्रीराम यांचं ध्यान आता आपण केलं. म्हणजेच अश्याप्रकारे ध्यान लावून ती मूर्त नजरेसमोर आली असेल तर त्यांच्या स्तोत्रमंत्राला आपण सुरवात करूया. असा या श्लोकांचा मतितार्थ. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग ४ .....    

© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१३/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...