श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १८
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥
एखादं चरित्र जर आधी कोणी विस्ताराने अविस्मरणीय श्लोकांमध्ये युगानुयुगांची संपत्ती म्हणून मांडलं असेल आणि त्याच अलौकिक व्यक्तित्वावर आपण लिहीत वा बोलत असू तर ज्यांनी हे चरित्र मूलतः लिहून अजरामर केलं आहे अश्या महान व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे विनयशीलतेचं लक्षण आहे. कारण त्यांनी मांडलेल्या गुणविशेषांच्या आधारे आपण ते चरित्र पुनः मांडतो, पण मूळ व्यक्तित्वाचा गाभा तोच असतो. आपला सहभाग हा त्यातील काही विशेष पुनः लोकांसमोर मांडणं हा असतो.
इथे तर श्रीबुधकौशिक ऋषी, श्रीशंकरांच्या आज्ञेवरून, हा स्तोत्ररूपी मंत्र जनसामान्यांना पोचवत आहेत. तरीदेखील ज्या महर्षी वाल्मिकी यांनी हे अद्भुत श्रीरामचरित्र रामायण या रुपात प्रथम सादर केलं, त्या महर्षींचा उल्लेख कृतज्ञतापूर्वक करताना श्रीबुधकौशिक ऋषी अत्यंत विनम्रतेने लिहितात की,
या श्रीरामायणरुपी काव्यवृक्षावर कोकिळेसम रामायणाचं गुणगान करणाऱ्या वाल्मिकी ऋषींवरांना मी राम राम इति कुजन करून या स्तोत्ररूपाने वंदन करतो.
म्हणजेच या रामायणाच्या रामरूपाच्या रामनामाच्या महासागरात महर्षी वाल्मीकींनी जे महत्कार्य केलं आहे, त्यातील रामनामाचं कुजन करून, त्या सागरातील काही मोती वेचून मी महर्षी वाल्मीकीना वंदन करतो. याचा मतितार्थ असा की, वाल्मिकी महर्षींनी आपल्या काव्यप्रतिभेने प्रसारित केलेल्या रामनामाच्या अलौकिक योगदानातील रामनामरूप मोती वेचून ते या स्तोत्ररूपी सूत्रात बांधून मी माझं अंशतः योगदान करून, महर्षींना प्रणाम करतो. कारण त्यांच्याच प्रतिभाप्रेरणेने हे मी साध्य करू शकलो. ही ती विनम्रता हा तो विनय. भगवान श्रीशंकर यांना कथनाचं आणि महर्षी वाल्मीकींना या रामनामाच्या प्रसाराचं श्रेय देऊन श्रीबुधकौशिक ऋषी त्यांचे ऋणच फेडू इच्छितात.
आपदांचं हरण करण्याचं आणि सर्व संपदांसह विपदा निवारणाची शक्ती प्रदान करण्याचं सामर्थ्य असलेल्या आणि लोकांना सौख्य देणाऱ्या, लोकांचं कल्याण करणाऱ्या प्रभू श्रीराम यांना मी वंदन करतो. यात खरा गाभा हाच आहे की, या मंत्रपठणाने प्रसन्न झालेल्या श्रीरामांनी भक्तांच्या आपदांचं हरण करून, त्यांना सुयोग्य संपदा प्रदान करावी. कारण त्यासाठीचं सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे. या मंत्राचं पठण नित्य करणाऱ्यांना हे सर्व प्रभू प्रदान करोत. ह्या श्लोकाचं विस्तृत विवेचन भाग १ व २ अश्या दोन भागात केलेलं असल्यामुळे इथे संक्षिप्त स्वरूपात मांडलं आहे.
भवबीज. भव म्हणजे संसाररूप सागर, जन्ममृत्यूचा फेरा, कर्मबंधनाची शृंखला. बीज म्हणजे या सर्वांची निर्मिती करणारं बी. म्हणजेच सहा शत्रू काम, क्रोध,लोभ, मोह, मद आणि मत्सर. या प्रत्येकाची उपअंग वा उपप्रकार आहेत. जसे क्रोधातून इतर विकार, मद यातून अहंकार इत्यादी. या भवबीजांचं समूळ उच्चाटन करून आत्मोन्नती साधल्यास जन्ममृत्युच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकते. त्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. जसे अष्टांगयोग याग, भक्ती, कर्म, ज्ञान इत्यादी नऊ मार्ग शास्त्राने सांगितले आहेत. ज्यांचा अवलंब करून प्राणी मोक्ष, मुक्तीच्या मार्गाकडे क्रमणा करू शकतो. हे सर्व एकप्रकारचे यज्ञ आहेत जे ह्या भवबीजांना जाळून वा ज्ञानाने दूर सारून मार्ग सुकर करतात.
अश्या अनेकविध मार्गपैकी एकाचा अवलंब करून भवबीजातून आपली सुटका करून घेता येईल. या सर्व मार्गानी भवाचं हे बीज नष्ट करता येऊ शकतं. भर्जन म्हणजे
उष्णतेच्या सहाय्याने पदार्थामधील अशुद्ध तत्व बाष्परूपाने बाहेर काढून पदार्थ शुद्ध करणे. असे हे भवबीज भर्जन करण्याचं काम अनेक जन्मजन्मांतरीच्या पुण्याईच्या आधारे वा त्या जोरावर मनुष्य साध्य करू शकतो आणि अंती मोक्षप्राप्तीच्या मार्गाला जाऊ शकतो. हेच अनेक जन्माचं कार्य भवबीज भर्जन करण्याचं काम रामनाम साध्य करतं. इतकं अलौकिक महत्व या रामनामाच्या जपाला, स्मरणाला, चिंतनाला आहे.
छत्तीसाव्या श्लोकातील बाकीच्या भागाचं विवेचन पुढील भागात.
श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏
भाग १८.....
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२८/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment