Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १७

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १७

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम्‌ ॥३१॥

लोकाभिरामं रनरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्‌ ।
कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥

यस्य म्हणजे ज्यांच्या. अर्थात ज्यांच्या दक्षिण दिशेला लक्ष्मण उभा आहे, तर  वाम म्हणजे उत्तर दिशेला जनकाची आत्मजा म्हणजे देवी सीता उभी आहे आणि ज्यांच्या पुढ्यात, पुरतो, समोर, पायाशी साक्षात मारुतीराया आहे, अश्या रघुनंदन श्रीरामांना मी वंदन करतो. आपण ज्यावेळी पूर्वेकडे मुख करून उभे राहतो, त्यावेळी उजवीकडे अर्थातच दक्षिण दिशा येते आणि डावीकडे उत्तर दिशा येते. ओघानेच आले की श्रीराम देवी सीता आणि लक्ष्मण पूर्वाभिमुख उभे आहेत. कारण त्या अनुषंगाने दिशा स्पष्ट केल्यात. 

लोकाभिरामं म्हणजे एक अर्थ समस्त लोकांत अति सुंदर आणि दुसऱ्या अर्थाने समस्त लोकांना सुखदायक असणारे, रणांगणी धीरोदात्त, धीराने वागणारे, धीर म्हणजे हिम्मत असणारे (अजून एक अर्थ संकट समयी भक्तांना धीर देणारे), राजीव म्हणजे कमळासारखे नयन असणारे, रघुराजाच्या वंशातील नायक, नाथ, कारुण्याचं मूर्तस्वरूप, नुसतं कारुण्य स्वरूपच नाही तर शरण गेलेल्याला अंती करुणेने वागवून उच्चपदी नेणारे, किंवा करुणेचा दयेचा अंत, म्हणजेच अंतःकरणापासून इच्छा करणाऱ्याला अंतिम क्षणी योग्य मार्ग दाखवून पुढे नेणारे असे जे श्रीराम आहेत त्यांना मी सर्वसमर्पण करून शरण जातो.  

या इथे आता पुढे फलश्रुती वा रामनामाचं फलित सांगण्या आधी ऋषीवर हनुमंताचं स्मरण गुणवर्णन करून हनुमंताला प्रणाम करतात. याच मुख्य कारण आपण या स्तोत्ररूपी नाममंदिराच्या शेवटाकडे आलो आहोत. तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या भागात आपण पाहिलं की श्रीरामरक्षा स्तोत्राच्या शक्तीचं  ऊर्जेचं किलक म्हणजे पिन, कोड, चावी ही हनुमंत आहे. 

सुरवातीला आपण चावी उघडून आत आलो.  आता त्या चावीचा उपयोग करून या स्तोत्राचा मुख्य कार्यभाग म्हणजे त्याचं फलित आपल्याला लाभावं म्हणून ज्याला भगवान शंकरांनी किलक म्हणून नेमलय, त्याचं स्मरण करून, या स्तोत्राचं फलित मला प्राप्त होवो म्हणून त्याला नमन, प्रणाम करणं जरुरी आहे. म्हणून हनुमंताची स्तुती गरजेची आहे, स्मरण म्हणून. अजून एक अर्थ, जशी स्तोत्रपाठ उघडताना चावी वापरली, तशीच ती बंद करताना  वापरून पुढील पठणासाठी पुन्हा स्मरण करूया. 

ज्याची गती मनाच्या गतीहून कित्येक पट जास्त आहे, ज्याचा वेग वाऱ्याच्या वेगाहून जास्त आहे, ज्याने सर्व इंद्रियांना जिंकलेलं आहे म्हणजेच ज्याच्या नियंत्रणात सर्व इंद्रिय आहेत, जो बुद्धिवंतांमध्ये श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे, वात अर्थात पवन याचा जो आत्मज म्हणजे पुत्र आहे, जो वानर युथाचा म्हणजे वानर गणांचा मुख्य आहे, अश्या श्रीरामदूत हनुमंताला मी नमन करतो. इथे एक लक्षात घ्या स्वामीचं स्मरण न करता दासाचं स्मरण करणं किंवा दासाचं स्मरण न करता स्वामीचं स्मरण करणं हे दोघांनाही म्हणजेच एकमेकांना आवडणार नाही. म्हणूनच श्रीरामांबरोबर हनुमंताचं आणि हनुमंतासोबत श्रीरामांचं नाम घेणं क्रमप्राप्त आहे. 

याचा अजून एक अर्थ असा निघतो की, श्रीरामांच्या हृदयाचा मार्ग हनुमंताच्या हृदयातून आहे अथवा सुलभ आहे. इथे अजून एक तर्क मी मांडतो पटला तर बघा. युथ या संस्कृत  शब्दाचा अर्थ समूह किंवा जथ्था असा आहे आणि समूहात ऊर्जा,  ताकद, चैतन्य, सळसळ असते. त्यामुळे अशी सळसळ वा चैतन्य ज्या वयात असतं ते वय, म्हणूनच इंग्रजीत युथ ( youth) म्हणत नसतील ना. कारण भाषा कशा विकसित झाल्यात याचं फार कमी ज्ञान आज आपल्याकडे आहे. एक तर्क म्हणून मांडला.
  
 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग १७.....    

© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
२७/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...