Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १०

 श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १०

एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठॆत्‌ ।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥१०॥

पातालभूतलव्योम चारिणश्छद्‌मचारिण: ।
न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥

रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्‌ ।
नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥

इथे रामबल हा शब्द आला आहे. खरतर हा शब्द बाकि कुठेही आढळत नाही. वा मला आढळला नाही. पण तर्काने आपण त्याच्या अर्थापर्यंत पोचू शकतो. आपण महाबली हनुमान हे हनुमंताचं विशेषण ऐकलं व वाचलं आहेच. हनुमंत स्वतः महाबली म्हणजेच सर्वात बलवान आहे. हनुमंताची सर्व शक्ती हि त्याच्या अखंड राम नामाची परिणती आहे. म्हणजेच सर्वकाळी सर्वशक्तिमान हनुमंत आपल्या शक्तीचं श्रेय रामनामाला देतो, जे सुयोग्यच आहे. 

त्यामुळे त्या शक्तीचं उगमस्थान असलेलं प्रभूंचं नाम किती बलवान असेल आणि त्या बलवान नामाच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडलेलं श्रीरामरक्षास्तोत्र हा मंत्र किती परमशक्तीशाली असणार याची कदाचित आपल्याला कल्पना येणार नाही. पण त्या निष्ठेने, श्रद्धेने आणि प्राणपणाने आपण म्हणून ते जाणू शकतो. . 

अश्या प्राणपणाने आणि निष्ठा व श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो याचं पठण करेल त्याच्या रक्षणाचं उत्तदायित्व या स्तोत्राच्या  मंत्रात स्थित असलेलं रामबल करेल. रामरक्षा पठणाचं हे कार्य शुभ कार्य, धर्माचं कार्य, आहे असं समजून जाणून जो श्रद्धापूर्वक करेल त्याला हे  रामबल नक्कीच अनेक प्रकारचे लाभ देईल. हे लाभ म्हणजे दीर्घ आयु: , तो सर्वात सुखी होईल. तो पुत्रवान होईल, तो विनयशील होईल व राहील. 

इथे सुखी शब्दाचे बाह्य आणि अंतर्गत असे दोन अर्थ निघतात. बाह्यर्थाने सुखी म्हणजे सर्वसामान्यापणे ऐश्वर्य , समृद्धी हा होतो. पण जो अर्थ शास्त्राला अभिप्रेत आहे तो म्हणजे मानसिक सुखशांती व आत्मिक समाधान, आणि सन्मार्गाने आलेली धनधान्य समृद्धी  जी आपल्याबरोबर पुण्यकारक योग आणेल असं सुख या स्तोत्रातून येणाऱ्या रामबलाने पठणकर्त्याला प्राप्त होईल. 

पाताळ आणि भूमी यांचा तळ सापडतो वा तिथपर्यंत पोहोचता येतं म्हणून त्यासंदर्भात पाताल व भूतल  हा शब्द योजला आहे. इथे अजून एक शब्द आला आहे व्योम. व्योम म्हणजे आकाश पण ज्याचा ठाव सापडत नाही वा ज्याचा ठाव पार स्वर्गापर्यंत जातो ते आकाश. अश्या पाताल भूतल आणि आकाश या तिन्ही ठिकाणी वास करणाऱ्या व वावरणाऱ्या छद्मी शक्ती. छद्मी म्हणजे कपट कारस्थान करणाऱ्या शक्ती, वाममार्गी शक्ती. 

अश्या शक्ती या मानवी देहातील मनात देखील असू शकतात. तर अश्या छद्मी शक्ती वा शक्तीनीयुक्त जीव, हे श्रीरामरक्षेचं कवच परिधान केलेल्या, रामनामाचं बीज धारण केलेल्या, या स्तोत्राचं श्रद्धेने नित्य पठण करणाऱ्या जीवाना, पाहू सुद्धा शकणार नाहीत. म्हणजेच अश्या छद्मी शक्तींचा काहीही प्रभाव श्रीरामरक्षेचं नित्य चिंतन करणाऱ्या जीवावर पडणार नाही. हे कवच त्यांचं रक्षण करेल.  

इति म्हणजे या. राम , रामभद्र, रामचंद्र या नामांनी असा याचा अर्थ आहे. राम शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातील सर्वात सुंदर अर्थ यश देणारा, कीर्ती देणारा, भाग्य देणारा, समृद्धी ऐश्वर्य देणारा. इथे एक प्रश्न खरतर पडतो की असा ऐश्वर्य समृद्धी व सुख देणारा स्वतः का वनवासी झाला. याचं कारण त्या अर्थातच आहे. श्रीराम हे सुख ऐश्वर्य, समृद्धी देणारा आहे, भोगणारा नाही.

म्हणजेच स्वतः वनवासात राहून, सर्वसंगपरित्याग करून सुग्रीवाला व विभीषणाला राज्यपद, जांबुवांतला पुढील जन्मी कन्या वरून घेण्याचा वर, नलनील यांना सेतुबांधनात कायमस्वरूपी सन्मान, अंगदाला काका सुग्रीव यांच्या राज्यात  सुयोग्य ते स्थान, भक्त शबरी या भील्लींणीला मोक्ष, सती अहिल्येला शापमुक्ती आणि पुनः सन्मान, माता कैकयीला क्षमा, रावणासारख्या असुराला स्वहस्ते मारून मोक्ष असा दातारं श्रीराम आहे. 

भद्रा शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी शक्ती. श्रीराम हे स्वयंभू पुण्यकारक नाम आणि कल्याणकारी शक्ती आहे. समस्त विश्वाचं मंगलमय आनंदमय करण्यासाठी जन्मलेले प्रभू श्रीराम म्हणजेच रामभद्र. रामचंद्र म्हणजे क्षमाशील सत् चित् आनंद, समाधान, शांती तुष्टता. अश्या शुभकारी, कल्याणकारी, आनंददायी, मंगलमय प्रभू श्रीरामांच्या नामचं नित्य स्मरण, ध्यान, जप करणाऱ्या जीवांना पाप स्पर्शू शकत नाही. ते इहलोकी सर्व सुखोपभोग घेऊन अंती मोक्षप्राप्तीच्या मार्गाला जातात. इतकं हे नाम प्रभावशाली, बलशाली आणि समृद्धमय आहे. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग १० .....    
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१९/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...