(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ५३
शब्द थिटे पडती तेथे
वैराग्य वाचे बोलते
कृष्ण राधा एकजीव हे
देही जरी मग भिन्न दिसे
अश्रू नयनी आनंदाचे
भेटे भक्ती भगवंताते
हा क्षण सोन्याचा आहे
हरी राधेला भेटे जेथे
उधळीत रुपेरी तेज शशी
गगनी पाही या दृश्याते
नारद शारद शब्दा वेचुनी
प्रसन्न वदने करी कवनाते
अश्रू नयनी श्रीहरीच्या
ऐसे दृश्य न कमलेच्या
बघण्या आले नजरेच्या
भाग्या आले परी राधेच्या
असा हा हृद्य सोहळा स्वये नारद, काळ आणि देवी शारदा प्रत्यक्ष पहात आणि समाधान पावत होते. भक्ताचं रक्षण करण्याचं आपलं ब्रीद प्रभुनी राखलं आणि भगवंत भक्तासाठी धावून येतो, हे राधेने सिद्ध करून दाखवलं होतं.
या अपार स्नेहमय सोहळ्यानंतर दोघेही भानावर आले, सावरले. कृष्णाने राधेला आधार देऊन बसवलं. आपण स्वतः साखरपाणी घेऊन आला, बाजूला बसला आणि राधेला स्वतः ते पाणी प्यायला दिलं. राधा साश्रु नयनांनी यास नकार देत होती. शेवटी मग कृष्णाने रागे भरून विचारलं
" हे घ्यायचं नाही तर मग काय विचार आहे राधे. जगायचं नाहीये का ? "
"कृष्णा तुझ्याशिवाय , तुझ्या दर्शनाशिवाय जगणं हे जगणं आहे असं तुला वाटत का रे ? मग तुझ्यावीण श्वास घेतले वा न घेतले एकच आहे रे. अश्या विरही जगण्यात मृत्यूपेक्षाही भयंकर यातना आहेत. यात एकच शक्यता जास्त श्रेयस्कर आहे आणि ती म्हणजे मृत्यू."
"राधे या अश्या वेदना देतेस त्याही विरहापेक्षा भयंकर आहेत. तूझ्या अस्तित्वात माझं अस्तित्व आहे. हे सर्व जगत जाणत. तुझा प्रत्येक श्वासाचा प्रत्येक ठोका, माझ्या हृदयात वाजतो आणि तुझी प्रत्येक वेदना माझ्या काळजाचा ठाव घेते. हे तू सुद्धा जाणतेस. या जगात माझ्यावर निष्पाप, निष्कलंक आणि निरपेक्ष प्रेम जर कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त या राधेने. जगात जिथे जिथे अश्या प्रकारचं प्रेम कोणी करतं ,माझ्यावर, तेंव्हा तेंव्हा त्याच्या हाकेला प्रतिसाद द्यावाच लागतो मला."
" कृष्णा तू माझ्या हृदयी आहेस हे मी आणि तू जाणतो. पण माझं स्थान तुझ्या चरणी असेल तरी मी धन्य मानते स्वतःला. तुझ्या हृदयात माझं स्थान आहे तर ते मला कायमस्वरूपी असावं असं वाटतं."
" अर्थात "
" अर्थात तुला प्राणप्रिय ही मुरली जेंव्हा जेंव्हा वाजेल, ज्या ज्या वेळी ही तुझ्या ओठातून अवीट गोडीचे सूर वाजवेल, त्या त्या वेळी ते स्वर मला माझ्या हृदयात ऐकू यावेत. ही एकच इच्छा आहे आणि श्वासाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत ही साथ असावी तुझ्या स्वरांची. एवढी एकच मागणी आहे."
" याने काय साध्य होईल राधे"
" हे सुद्धा माझ्याकडून वदवून घे. याने एकच साध्य होईल की ज्या वेळी तू मुरली वाजवशील त्या प्रत्येक क्षणाला तुला ज्ञात असेल की राधा हे ऐकत आहे.म्हणजेच त्या त्या प्रत्येक वेळी तुला मुरली बरोबरच माझीही सय येत राहील आणि ही सय तुला माझ्यासाठी मुरली वाजवायला भाग पाडेल. या व्यतिरिक्त मला काहीही नको. अजून एकच मागणं आहे आता मला ही मुरली ऐकायची इच्छा झाली आहे."
" राधे अग आता कशाला. वाजवीन नन्तर पुन्हा केंव्हाही."
" केंव्हाही मग आता का नको. काही समस्या आहे की मुरली आणली नाहीस तू."
"तस कस होईल मुरली आहे पण...."
" पण काय"
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment